विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स.
१९८८">इ.स. १९८८) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.
विराट कोहली | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | विराट प्रेम कोहली | |||
उपाख्य | चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली | |||
जन्म | ५ नोव्हेंबर, १९८८ | |||
दिल्ली,भारत | ||||
उंची | ५ फु ९ इं (१.७५ मी) | |||
विशेषता | फलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
क.सा. पदार्पण (२६८) | २० जून २०११: वि वेस्ट इंडीज | |||
शेवटचा क.सा. | १ जुलै २०२२: वि इंग्लंड | |||
आं.ए.सा. पदार्पण (१७५) | २२ डिसेंबर २००८: वि श्रीलंका | |||
शेवटचा आं.ए.सा. | १७ जुलै २०२२: वि इंग्लंड | |||
एकदिवसीय शर्ट क्र. | १८ | |||
आं.टी२० पदार्पण (३१) | १२ जून २०१० वि झिंबाब्वे | |||
शेवटचा आं.टी२० | १० नोव्हेंबर २०२२ वि इंग्लंड | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
२००६-सद्य | दिल्ली | |||
२००८-सद्य | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | आं. टी२० | प्र.श्रे. | |
सामने | १०२ | २६२ | ११५ | ११८ |
धावा | ८,०७४ | १२,३४४ | ४,००८ | ९४८९ |
फलंदाजीची सरासरी | ४९.५३ | ५७.६८ | ५२.७३ | ५३.९१ |
शतके/अर्धशतके | २७/२८ | ४३/६४ | १/३७ | ३४/३० |
सर्वोच्च धावसंख्या | २५४* | १८३ | १२२* | २५४* |
चेंडू | १७५ | ६४१ | १५२ | ६४३ |
बळी | ० | ४ | ४ | ३ |
गोलंदाजीची सरासरी | - | १६६.२५ | ५१.०० | ११२.६६ |
एका डावात ५ बळी | - | ० | ० | ० |
एका सामन्यात १० बळी | - | ० | ० | ० |
सर्वोत्तम गोलंदाजी | - | १/१५ | १/१३ | २/४२ |
झेल/यष्टीचीत | १०२/- | १३८/- | ४१/- | ११३/- |
१७ नोव्हेंबर, इ.स. २०२२ |
दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
२०१२ मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेन्द्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोनिने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे. २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे. विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हटले आहे.
कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. २०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. स्पोर्ट्सप्रो (SportsPro), नावाच्या एका इंग्लंडच्या मासिकाने २०१४ मध्ये कोहलीला दुसरा सर्वात उल्लेखनीय खेळाडू म्हणून उल्लेखले आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट कोहली सिने अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाहबद्ध झाला.
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे. त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.
कोहली उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले. १९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकँडमीची
स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता. “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले. अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळला. नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. खेळा शिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत.
मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं आहे." कोहलीने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता, "माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण होते."
कोहली प्रथम ऑक्टोबर २००२ मध्ये पार पडलेल्या २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांखालील दिल्लीच्या संघातून खेळला. या स्पर्धेत ३४.४० च्या सरासरीने त्याने सर्वांत जास्त १७२ धावा केल्या. २००३-०४ पॉली उम्रीगर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.. त्या स्पर्धेत पाच डावांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ७८ च्या सरासरीने ३९० धावा केल्या. २००४ च्या उत्तरार्धात तो २००४-०५ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला. त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ११७.५० च्या सरासरीने ४७० धावा केल्या, त्यात नाबाद २५१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. २००५-०६ विजय मर्चंट ट्रॉफी, १७ वर्षांखालील दिल्लीच्या संघाने जिंकली, ज्यात कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या. फेब्रुवारी २००६ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाविरुद्ध दिल्लीकडून लिस्ट अ सामन्यामध्ये पदार्पण केले, परंतु त्याला फलंदाजी मिळाली नाही. जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले . सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. कोहलीने पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघा विरुद्ध कसोटी मालिकेत ५८ तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या. ऑक्टोबर मध्ये दिल्ली १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने विनू मांकड ट्रॉफीमध्ये १५ च्या सरासरीने आणि कुचबिहार ट्रॉफीमध्ये ७२.६६ च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघामध्ये निवडला गेला, ज्यामध्ये त्याने दोन सामन्यांत २८ च्या सरासरीने धावा केल्या.
मी ज्याप्रकारे खेळाला सामोरा गेलो, त्यामुळे तो दिवसच बदलला. माझ्या मनात एकच गोष्ट होती – की मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे आणि माझ्या वडिलांसाठी ते स्वप्न जगायचं आहे.
कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले, आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली. त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.
एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले. त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या.
तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो.
फेब्रुवारी-मार्च २००८ मध्ये कोहली मलेशिया मध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार होता. ४थ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ६ सामन्यांमध्ये ४७ च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या, आणि सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले. स्पर्धेमध्ये शतक झळकावणाऱ्या तीन फलंदाजांपैकी तो एक होता. वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्धची त्याच्या ७४ चेंडूंतील १०० धावांच्या खेळीला ESPNcricinfo ने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळी म्हणून संबोधले आहे.. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध भारताने ५० धावांनी विजय मिळविला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. कोहलीला सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली परंतु इंग्लंड १९ वर्षांखालील संघाविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी तो वेळेत बरा झाला. न्यू झीलंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध विजयात त्याचा खूप मोठा वाटा होता. त्या सामन्यात त्याने २७ धावांत २ गडी बाद केले आणि लक्ष्याचा तणावपूर्ण पाठलाग करताना ४३ धावा केल्या, या सामन्यातही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने १९ धावा केल्या, हा सामना भारताने डकवर्थ/लुईस पद्धतीनुसार १२ धावांनी जिंकला. ESPNcricinfo ने त्याने स्पर्धेत अनेकदा केलेल्या गोलंदाजीतील बदलांची प्रशंसा केली.
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोहलीला ३०,००० अमेरिकी डॉलर्स किंमतीत करारावर विकत घेतले. जून २००८ मध्ये कोहली आणि त्याचे १९ वर्षांखालील संघमित्र प्रदीप संगवान व तन्मय श्रीवास्तव या तिघांनाही बॉर्डर-गावस्कर शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीअंतर्गत तिघांनाही ब्रिस्बेन येथे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी मान्यता देण्यात आली. जुलै २००८ मध्ये, सप्टेंबर २००८ दरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ३० जणांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव सामील करण्यात आले. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुळ खेळाडूंच्या स्पर्धेसाठी भारतीय उदयोन्मुख खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने ४१.२० च्या सरासरीने २०६ धावा केल्या..सर्वात चांगला कॅप्तैन आहे.विराट कोहली याला २०१८ या वर्षीच्या इंडियन प्रेमियर लीगसाठी १७ कोटी रुपयाला राँयल चलेन्जेर्स बंगलोर या संघाने रिटेन केले आहे.
ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता. त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले. श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौऱ्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली. वयाच्या १९ व्या वर्षी पदार्पणाच्या एकदिवसीय लढतीत तो फक्त १२ धावांवर बाद झाला. मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने ५४ धावा काढून तो सामना व मालिका जिंकण्यात योगदान दिले इतर तीन सामन्यांत त्याने ३७, २५ आणि ३१ धावा केल्या. भारताने मालिका ३-२ अशी जिंकली. हा भारताचा श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत पहिलाच मालिका विजय होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली. दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या. त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. सामना अनिर्णित राहिला परंतु एसएनजीपीएलचा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर ट्रॉफी जिंकली. ऑक्टोबर २००८ मध्ये कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय अध्यक्षीय XI संघाकडून चार दिवसीय सामना खेळला. त्याने ब्रेट ली, स्टुअर्ट क्लार्क, मिचेल जॉन्सन, पीटर सीडल, जॅसन क्रेझा अशा दिग्गज गोलंदाजांचा सामना करत १०५ आणि नाबाद १६ धावा केल्या..
नोव्हेंबर २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली, परंतु तेंडुलकर आणि सेहवागच्या संघातील समावेशामुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. डिसेंबर २००८ मध्ये बीसीसीआयच्या वार्षिक करारांच्या यादीत त्याला ड दर्जाचा करार देण्यात आला, ज्यामुळे तो १५ लाख रुपये मिळण्यास पात्र ठरला. त्यानंतर जानेवारी २००९ च्या श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत होणाऱ्या दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले.
जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या. त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या. भारताने तो सामना १७ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या शेवटी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत कोहलीच्या कामगिरीवर खूष होऊन म्हणाले, "मला सांगावसं वाटतंय, सलामीवीर विराट कोहली खूपच छान खेळला. त्याने खेळलेल्या काही फटकेच त्याची क्षमता सिद्ध करतात." कोहलीच्या मते ही स्पर्धा म्हणजे त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा क्षण होता.
कोहलीने नंतर श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेत जायबंदी गौतम गंभीरची जागा घेतली. २००९ आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफीमध्ये जायबंदी युवराज सिंगच्या जागी ४थ्या क्रमांकावर कोहलीने फलंदाजी केली. फारसे महत्त्व नसलेल्या गट सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध १३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना त्याने नाबाद ७९ धावा करीत पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार मिळवला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मायदेशी होणाऱ्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची एक आरक्षित फलंदाज म्हणून निवड झाली, त्यापैकी दोन सामन्यांत तो दुखापत झालेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीर ऐवजी खेळला. डिसेंबर २००९ मध्ये मायदेशी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज सिंगने तिसऱ्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणाऱ्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले. गौतम गंभीरने त्याच्या सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.
जानेवारी २०१० मध्ये झालेल्या बांगलादेश मधील त्रिकोणी मालिकेसाठी तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली, त्यामुळे कोहलीला भारताच्या सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध पराभव झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या, परंतु त्यानंतरच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ५१/३ अशी कोसळली असताना त्याने ९१ धावांची खेळी करून भारताला विजय प्राप्त करून दिला. पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद ७१ धावा केल्या, त्यामुळे भारताने केवळ ३३ षटकांत २१४ धावांचा पाठलाग करून बोनस गुण मिळवला. पुढच्याच दिवशी त्याने बांगलादेशविरुद्ध त्याचे दुसरे शतक झळकावले आणि भारताने तो सामनासुद्धा जिंकला. भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि सुरेश रैना नंतर तो तिसराच फलंदाज. या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली, प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा. श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या, परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.
पहिला पर्याय असणाऱ्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणाऱ्या श्रीलंका आणि झिंबाब्वे विररुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या, परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या. नंतर त्याच महिन्यात २०१० आशिया चषकासाठी कर्णधार धोणी आणि उपकर्णधार सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पूर्ण ताकदीचा संघ निवडला. संपूर्ण मालिकेमध्ये कोहलीने ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि १६.७५ च्या सरासरीने ६७ धावा केल्या. त्यानंतर ऑगस्ट २०१० मध्ये पार पडलेल्या श्रीलंका आणि न्यू झीलंड विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमध्ये सुद्धा त्याला सूर गवसला नाही. त्या मालिकेत तो फक्त १५ च्या सरासरीने धावा करू शकला.
खराब कामगिरीनंतरसुद्धा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. विशाखापट्टणम् येथील दुसऱ्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता. २०१० च्या शेवटी न्यू झीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले. गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या. भारताने मालिकेत न्यू झीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कोहली एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या मालिकेत आणि सर्वच्या सर्व पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला. टी२० सामन्यात भारताचा विजय झाला. या सामन्यात त्याने २८ धावा केल्या, परंतु एकदिवसीय मालिकेत भारताचा २-३ असा पराभव झाला. एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या. एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
विश्वचषकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैनाऐवजी ऐन भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला. पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने २४ धावा केल्या, आणि पाकिस्तान विरुद्ध उपांत्य सामन्यात तो ९ धावा काढून बाद झाला. भारताने दोन्ही सामने जिंकून मुंबईतील श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात २७५ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सात षटकांमध्ये दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि गंभीरने तिसऱ्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली, ज्यात कोहलीने ३५ धावा केल्या. ही भागीदारी म्हणजे "सामन्याचा एक टर्निंग पॉईंट होता". भारताने सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला आणि १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला.
जून-जुलै २०११ च्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताने खूपच अनुभवी संघ निवडला, ज्यात तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली आणि गंभीर व सेहवागला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कसोटी संघामध्ये पदार्पण करण्याऱ्या तीन खेळाडूंपैकी एक कोहली होता. एकदिवसीय मालिका कोहलीसाठी यशस्वी ठरली. त्याने ३९.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या. ही मालिका भारताने ३-२ अशी जिंकली. त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली ती पोर्ट ऑफ स्पेन मधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातली. भारताने सामना ७ गडी राखून जिंकला, त्यात कोहलीने ८१ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला. कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्स कडे झेल देऊन बाद झाला. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला. आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.
जुलै आणि ऑगस्ट २०११ दरम्यान पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतून सुरुवातीला वगळण्यात आलेल्या कोहलीला, दुखापतग्रस्त युवराजच्या जागी पाचारण करण्यात आले, परंतु त्याला मालिकेत एकाही सामन्यात खेळता आले नाही. त्यानंतर पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये माफक यश मिळाले, त्याने ३८.८० च्या सरासरीने धावा केल्या. चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५५ धावा केल्या, त्यानंतर पुढच्या तीन सामन्यांत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या सामन्यात, कोहलीने आपले सहावे एकदिवसीय शतक साजरे करताना राहुल द्रविड सोबत तिसऱ्या गड्यासाठी १७० धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ९३ चेंडूंत १०७ धावांचा होता. राहुल द्रविडचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता, ज्यात भारताने मालिकेत पहिल्यांदा ३०० पेक्षा जास्त धावा केल्या. त्या सामन्यात कोहली हिट विकेटने बाद झाला. त्याचे शतक हे संपूर्ण मालिकेतील दोन्ही संघांकडून एकमेव शतक होते. त्याची "मेहनत" आणि "कष्ट" यामुळे त्याची खूपच प्रशंसा झाली. परंतु तरीही इंग्लंडने डकवर्थ/लुईस ने सामन्यात आणि मालिकेत ३-० असा विजय मिळवला
ऑक्टोबर २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मलिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ही मालिका भारताने ५-० अशी जिंकली. कोहलीने मालिकेत एकूण २७० धावा केल्या. दिल्लीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९८ चेंडूंमध्ये ११२ धावा केल्या आणि गंभीरसोबत नाबाद २०९ धावांची भागीदारी केली, आणि मुंबई मध्ये ८६ धावा केल्या. दोन्ही सामन्यांत भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला. या एकदिवसीय मालिकेतील यशामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ दरम्यान मायदेशी झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी रैना ऐवजी कोहलीची निवड करण्यात आली. युवराज सिंग बरोबर सहाव्या गड्यासाठी त्याची स्पर्धा होती, ज्यामध्ये तो फक्त शेवटच्या कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली. सामन्यात त्याने दोनही डावांत अर्धशतक केले आणि याआधीची स्वतःची ३० धावांची सर्वोच्च कामगिरी मोडीत काढली. त्याच्या पहिल्या डावातील ५२ धावांच्या खेळीमुळे भारताला फॉलो-ऑन टाळता आला. सदर सामना अनिर्णितावस्थेत संपला, पहिल्या दोन सामन्यांतील विजयामुळे भारताने मालिका २-० अशी जिंकली. त्यानंतरची एकदिवसीय मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला, ज्यात कोहलीने ६०.७५ च्या सरासरीने २४३ धावा केल्या. मालिकेदरम्यान कोहलीने विशाखापट्टणम मध्ये त्याचे आठवे एकदिवसीय शतक केले, ज्यामध्ये २७१ धावांचा पाठलाग करताना त्याने १२३ चेंडूंत ११७ धावा केल्या. त्याच्या ह्या खेळीमुळे त्याला "ॲन एक्सपर्ट ऑफ द चेस" (पाठलाग तज्ञ) असा नावलौकिक मिळाला. ३४ सामन्यांत चार शतकांसह ४७.६२ च्या सरासरीने १३८१ धावा करणारा कोहली सन २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
डिसेंबर २०११ च्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या कसोटी संघामध्ये कोहलीची निवड झाली. युवराज सिंगला कसोटी संघातून वगळण्यात आले, याचा अर्थ सहाव्या क्रमांकासाठी त्याची स्पर्धा आता कसोटी पदार्पणासाठी उत्सुक असलेल्या रोहित शर्माशी होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय XI संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात कोहलीने सर्वाधिक १३२ धावा केल्या, आणि बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्वतःचे स्थान बळकट केले. मेलबर्न येथील पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीची निवड झाली, परंतु सामन्यात त्याचे बचावतंत्र उघड झाले. बेन हिल्फेनहौसने त्याला पहिल्या डावात ११ धावांवर तर दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद केले. सिडनी मधील दुसऱ्या कसोटीतही त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागला, त्याने २४ आणि ९ धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना, त्याने दर्शकांकडे पाहून मधले बोट दाखवले, त्यासाठी त्याला सामनाधिकाऱ्यांनी त्याच्या सामना शुल्कापैकी ५०% रकमेचा दंड ठोठावला. याघटनेबाबत ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत कोहली म्हणाला: "मला मान्य आहे की क्रिकेट खेळाडूने जशास तसे उत्तर देऊ नये. जमावाने तुमच्या आई आणि बहिणीबद्दल अपशब्द काढले तर काय. मी खूप वाईट ऐकलं." (sic). पर्थमधील तिसऱ्या सामन्यात भारताने सलग दुसऱ्यांदा डावाने शरणागती पत्करली, तरीही दोन्ही डावांमध्ये ४४ आणि ७५ धावा करून कोहली भारतातर्फे सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. ॲडलेड मधील चवथ्या आणि शेवटच्य सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने पहिले शतक साजरे केले, त्याने ११६ धावा केल्या; भारतीय फलंदाजांतर्फे संपूर्ण मालिकेमधील हे एकमेव शतक होते. भारताने मालिका ४-० अशी गमावली आणि मालिकेमध्ये भारताकडून कोहलीने सर्वात जास्त धावा केल्या. त्याला उद्देशून "द लोन ब्राइट स्पॉट इन ॲन अदरवाईज नाईटमेयर विजीट फॉर द टूरिस्ट" (पाहुण्यांच्या दुःस्वप्नातील एकमेव तेजस्वी ठिपका) असे वर्णन करण्यात आले.
कसोटी मालिकेनंतर, भारतीय संघ ऑसट्रेलियामध्ये दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. १-१ अशा अनिर्णितावस्थेत संपलेल्या टी२० मालिकेमध्ये कोहलीने २२ आणि ३१ धावा केल्या. त्रिकोणी मलिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्यात कोहली ३१ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पर्थ येथील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या आणि भारताने सामना चार गडी राखून जिंकला. पुढील पाच सामन्यात त्याने १८, १५, १२, ६६ आणि २१ धावा केल्या. भारतीय संघाला सात सामन्यांमध्ये फक्त दोन विजय आणि एक बरोबरी प्राप्त करता आली याचा अर्थ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी, होबार्ट मधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात संघाला बोनस गुणासहीत विजयाची गरज होती. श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले. त्याने लसिथ मलिंगाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, " महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे." परंतु तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले. पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे मार्च २०१२ दरम्यान बांगलादेशमध्येपार पडलेल्या २०१२ आशिया कप स्पर्धेसाठी कोहलीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत पत्रकांशी बोलताना म्हणाले, "कोहली ज्याप्रकारे खेळला त्याबद्दल त्याला सलाम. आपण आता भविष्याकडे पहायला सुरुवात करायला हवी. कोहली भविष्यात कर्णधार होऊ शकतो असं निवड समिती आणि मंडळाला वाटतं" स्पर्धेदरम्यान कोहली खूपच चांगल्या भरात होता. ११९ च्या सरासरीने ३५७ धावा करून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अग्रभागी होता. त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात १०८ धावा केल्या आणि भारताचा ५० धावांनी विजय झाला. दुसऱ्या सामन्या मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला, ज्यात त्याने ६६ धावा केल्या. गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता. त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली. भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.
जुलै-ऑगस्ट २०१२ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीने दोन शतके झळकावली, हंबन्टोटा येथे ११३ चेंडूंमध्ये १०६ आणि कोलंबो येथे ११९ चेंडूंत नाबाद १२८- या दोन्ही खेळींमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आणि मालिकेमध्ये सर्वाधिक धावा केल्यामुळे कोहलीला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर झालेल्या एकमेव टी२० सामन्यात त्याने ४८ चेंडूत ६८ धावा केल्या, हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० अर्धशतक, आणि त्याला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला. कोहलीने बंगळूरमध्ये त्याचे दुसरे कसोटी शतक झळकावले ते न्यू झीलंडच्या भारत दौऱ्यामध्ये आणि त्याच सामन्यात त्याला पहिल्यांदाच कसोटी मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारताने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली, आणि कोहलीने तीन डावांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह १०६ च्या सरासरीने २१२ धावा केल्या. त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात त्याने ४१ चेंडूंत ७० धावा केल्या, परंतु भारताचा अवघ्या १ धावेने पराभव झाला आणि मालिका न्यू झीलंडने १-० अशी खिशात टाकली. त्याची हा फॉर्म श्रीलंकेत झालेल्या २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ मध्ये सुद्धा तसाच राहिला, ५ सामन्यांत त्याने ४६.२५ च्या सरासरीने १८५ धावा केल्या. त्याने स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली, अफगाणिस्तानविरुद्ध ५० आणि सुपर आठ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ७८*, दोन्ही सामन्यांमध्ये त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला.
इंग्लंडच्या भारत दौऱ्यामध्यल्या पाहिल्या तीन कसोटी सामन्यांपर्यंत कोहली फारशी चमक दाखवू शकला नाही. पहिल्या तीन सामन्यांत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली होती आणि कोहलीची सर्वोच्च धावसंख्या होती २०. नागपूर मधल्या शेवटच्या सामन्यात मंद आणि चेंडू खाली राहणाऱ्या धावपट्टीवर त्याने चिकाटीने आणि शांतपणे खेळ केला आणि २९५ चेंडूंत १०३ धावा केल्या. ESPNcricinfoने कोहलीची प्रशंसा करताना म्हटले "संघाला ज्या प्रकारच्या खेळीची गरज होती तशीच खेळी करून त्याने त्याच्यातली वाढती परिपक्वता दाखवून दिली",. त्याचवेळी कोहली त्याच्या खेळीचे वर्णन "अ लर्निंग इंनिंग्स" (एक शिकवणारा डाव) असे करतो. सामना अनिर्णित राहिला आणि इंग्लंडने २८ वर्षांनी पहिल्यांदा भारतात कसोटी मालिकेमध्ये विजय मिळवला. त्यामागोमागची टी२० मालिका १-१ अशी अनिर्णित राहिली, ज्यात कोहलीने २१ आणि ३८ धावा केल्या. जानेवारी २०१३ च्या इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेआधी, भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा पाहुणचार केला, ज्यात दोन टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात आली. टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी गमावली. दोन्ही मालिकांमध्ये कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसला, त्याची टी२० मध्ये सरासरी होती १८ आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ४.३३. जलदगती गोलंदाजांनी कोहलीला त्रस्त केले, विशेषतः जुनैद खान, त्याने कोहलीला तीनही एकदिवसीय सामन्यांत बाद केले. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मलिका कोहली साठी शांततेत गेली, ज्यात त्याने ३८.७५ च्या सरासरीने १५५ धावा केल्या. अपवाद होता तो रांची मधील तिसरा एकदिवसीय सामना, ज्यात त्याने नाबाद ७७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली.
"मला विराट कोहलीची फलंदाजी पहायला खूप आवडतं. तो मला माझ्या अंतःव्यक्ति सारखा वाटतो. मला त्याची आक्रमकता आवडते, आणि गंभीर भावना जी माझ्यात असायची. तो मला माझी स्वतःची आठवण करून देतो. "
फेब्रुवारी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी झालेल्या कसोटी मालिकेमधल्या चेन्नईतील पहिल्या कसोटीमध्ये कोहलीने १०७ धावा करून आपले चवथे कसोटी शतक साजरे केले. तो म्हणाला, आधीच्या दोन मालिकांमधील अपयशानंतर "मला ह्या मालिकेची भूक लागली होती" आणि शंभर धावा केल्यानंतर लगेच बाद झाल्याने तो निराशही झाला. भारताने मालिका ४-० अशी जिंकली, आणि चार दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणारा पहिला संघ ठरला. कोहलीने मालिकेमध्ये ५६.८० च्या सरासरीने धावा केल्या आणि कसोटी संघातली आपली जागा मजबूत केली.
६ ते २३ जून २०१३ दरम्यान इंग्लंड मध्ये पार पडलेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीची निवड झाली. ही स्पर्धा भारताने जिंकली होती. कोहलीने सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकून देणारी १४४ धावांची खेळी केली. स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात, लोन्वाबो त्सोत्सोबेच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूल करण्याच्या नादात तो ३४ धावांवर बाद झाला, आणि पुढच्या सामन्यात सुनिल नारायणने त्याला २२ धावांवर बाद केले. पाकिस्तान विरुद्ध भारताच्या शेवटच्या गट सामन्यात तो २२ धावांवर नाबाद राहिला, आणि भारत एकही सामना न हरता उपांत्यफेरीसाठी पात्र झाला. कार्डीफ येथे खेळवल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला, ज्यात कोहलीने नाबाद ५८ धावा केल्या. बर्मिंगहॅम येथील इंग्लंड विरुद्ध भारत अंतिम सामना पावसामुळे उशिरा सुरू होऊन २० षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या. कोहलीने ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या, तो सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने रविंद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ३३ चेंडूंमध्ये ४७ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने सामन्यात ५ धावांनी विजय मिळवित सलग दुसरी आयसीसी एकदिवसीय स्पर्धा जिंकली.
वेस्ट इंडीज मधील त्रिकोणी मालिकेमधल्या पाहिल्या सामन्यादरम्यान धोणीला दुखापत झाल्याने कोहलीवर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. सामना भारताने १ गडी राखून गमावला आणि त्यानंतर धोणीला मालिकेमधून बाहेर पडावे लागले व राहिलेल्या सामन्यांमध्ये कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. कर्णधार म्हणून त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने, कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. पोर्ट ऑफ स्पेन मधील या सामन्यात कोहलीने केलेल्या ८३ चेंडूंतील १०२ धावांच्या जोरावर भारताने वेस्टइंडीज वर बोनस गुण मिळवून मात केली. पुढच्याच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही भारताने बोनस गुण मिळवून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आणि श्रीलंकेविरुद्धच अंतिम सामनास्याठी संघ पात्र झाला. अंतिम सामन्याआधी कोहली दुखापतीतून सावरला आणि कर्णधार म्हणून परतला. कोहली फक्त २ धावा करून बाद झाला, परंतु भारताने सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला. जुलै २४ ते ऑगस्ट ३, २०१३ दरम्यान खेळवल्या गेलेल्या झिंबाब्वे मधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या दौऱ्यामधून धोणीसह बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आणि पहिल्यांदाच संपूर्ण मालिकेसाठी कर्णधार पद कोहलीकडे देण्यात आले. हरारे मधील पहिल्या सामन्यात २२९ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याने १०८ चेंडूंमध्ये ११५ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा जिंकला. मालिकेमध्ये त्याने आणखी दोनदा फलंदाजी केली ज्यामध्ये त्याने १४ आणि नाबाद ५८ धावा केल्या. भारताने झिंबाब्वेला ५-० असे हरवले. परदेशातील एकदिवसीय मालिकेतील हा भारताने दिलेला हा पहिला व्हाईटवॉश होता.
"विराट कोहली सोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून माझ्या मनात नेहमी एक वेगळ्या प्रकारची भावना होती. सुरुवातीपासूनच, माझी खात्री होती की त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रतिभा आहे आणि तो एक महान खेळाडू होईल. मागील काही वर्षांत तो प्रंचड मोठा आणि प्रौढ झाला आहे. त्याला मोठं होताना पाहणं आणि त्या प्रक्रियेचा एक भाग असणं खूप आनंददायी आहे आणि त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो."
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांची एकदिवसीय मालिका कोहलीसाठी फलंदाजीच्या बाबतीत खुपच यशस्वी ठरली. पुण्यात झालेल्या पराभवामध्ये सर्वाधिक ६१ धावा केल्यानंतर, त्याने जयपुर मधल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजातर्फे सर्वात जलद शतक ठोकले. अवघ्या ५२ चेंडूंत मैलाचा दगड पार करताना त्याने रोहित शर्मासोबत फक्त १७.२ षटकांमध्ये नाबाद १८६ धावांची भागीदारी केली, कोहलीच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे भारताने ३६० धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आणि ६ षटके राखून पार केले. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता, ज्यात कोहलीचे शतक ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद आणि धावांचा पाठलाग करताना तिसरे जलद शतक होते. त्या सामन्यानंतर पुढच्या मोहालीमधल्या सामन्यातील भारताच्या अजून एका पराभवामध्ये त्याने ६८ धावा केल्या. त्याआधीचे दोन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. नागपूर मधल्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ६६ चेंडूंत ११५ धावा केल्या आणि भारताने ३५१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले. १०० धावांचा टप्पा त्याने ६१ चेंडूंत गाठला आणि भारतातर्फे तिसरे सर्वात जलद शतक ठोकले. तसेच सर्वात जलद १७ एकदिवसीय शतके करण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला. शेवटच्या सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला परंतु सामना जिंकून भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी खिशात घातली. मालिकेच्या शेवटी कोहली त्याच्या कारकिर्दीत प्रथमच आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.
वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते. यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला. सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे. मी आता फक्त २५ वर्षांचा आहे. त्यांच्या विक्रमाशी बरोबरी करणं चांगलं आहे पण तरीही मला अजून खूप पुढे जायचंय." विशाखापट्टणम मधील पुढच्याच सामन्यात रवि रामपॉलच्या गोलंदाजीवर हूकचा फटका मारताना तो ९९ धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. भारताचा दोन गडी राखून पराभव झाला परंतु कानपूर मधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताने मालिका २-१ अशी जिंकली. कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आले. ६८ च्या सरासरीने २०४ धावा करून कोहलीने मालिकेत पुन्हा एकदा सर्वाधिक धवा केल्या.
डिसेंबर २०१३ मध्ये भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. एकदिवसीय मालिकेमध्ये कोहली फक्त १५.५० च्या सरासरीने धावा करू शकला, ज्यामध्ये एकदा तो शून्यावर बाद झाला. जोहान्सबर्गमधल्या पहिल्या कसोटीत जी त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच कसोटी होती, तो पहिल्यांदाच चवथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला, त्या कसोटीत त्याने ११९ आणि ९६ धावा केल्या. त्याचे शतक हे त्या मैदानावरचे भारतीय उपखंडातील फलंदाजाचे १९९८ नंतर पहिलेच शतक होते. दक्षिण आफ्रिकेचा माजी तेजगती गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक ॲलन डोनाल्ड, कोहलीच्या शतकाबद्दल म्हणाला, "माझ्या मनात जो एकच शब्द येतोय तो म्हणजे जबाबदारी. मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला." सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा केल्या.
"[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा."
यानंतरच्या न्यू झीलंड दौऱ्यावर सुद्धा कोहलीच्या धावांचा रतीब सुरूच राहिला. त्याने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये ५८.२१ च्या सरासरीने धावा केल्या. त्याने नेपियर मध्ये १११ चेंडूंत १२३, हॅमिल्टन मध्ये ६५ चेंडूंत ७८, आणि वेलिंग्टनमध्ये ७८ चेंडूंत ८२ धावा केल्या. परंतु त्याच्या सर्व खेळी व्यर्थ गेल्या कारण भारताने मालिका ४-० अशी गमावली. त्यानंतरच्या कसोटीमालिकेमध्ये त्याने ७१.३३ च्या सरासरीने २१४ धावा केल्या. वेलिंग्टनच्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी केलेल्या त्याच्या नाबाद १०५ धावांच्या खेळीमुळे ती कसोटी अनिर्णितावस्थेत संपली.
आशिया कप आणि विश्व ट्वेंटी२० स्पर्धेसाठी भारतीय संघाने बांगलादेशचा दौरा केला. दुखापतीमुळे धोणीला आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि स्पर्धेसाठी कोहलीकडे कर्णधार पद सोपवण्यात आले. बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात २८० धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोहलीने १२२ चेंडूंत १३६ धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या गड्यासाठी २१३ धावांची भागीदारी केली. हे त्याचे एकूण एकोणिसावे आणि बांगलादेशविरुद्ध पाचवे एकदिवसीय शतक. ह्या शतकामुळे तो बांगलादेशमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीतील पराभावांमुळे भारत स्पर्धेतून बाद झाला, या सामन्यांत कोहलीने अनुक्रमे ४८ आणि ५ धावा केल्या.
दुखापतीतून सावरलेला धोणीने २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ साठी संघात कर्णधार म्हणून पुनरागमन केले आणि कोहली उपकर्णधार झाला. स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात, कोहलीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा करून भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला. पुढच्या वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात त्याने ४१ चेंडूत ५४ धावा केल्या आणि बांग्लादेश विरुद्ध ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या, दोन्ही सामन्यात भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला. उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या ४४ चेंडूंमधील ७२ धावांच्या जोरावर, भारताने १७३ धावांचा, सहा गडी आणि पाच चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला. ह्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, ज्याला तो "माझी सर्वोत्तम टी२० खेळी" असे म्हणतो. श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भारताने १३०/४ अशी धावसंख्या उभारली, ज्यात कोहलीचा वाटा होता ५८ चेंडूंत ७७ धावांचा, अखेरीस भारताने सामना सहा गडी राखून गमावला. कोहलीने स्पर्धेत १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या, आणि एका २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला, ज्यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
इंग्लंड दौऱ्याआधी बांगलादेश दौऱ्यासाठी, कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध पाहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर १-० अशी आघाडी घेऊनही भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. ३९ ह्या सर्वोच्च धावा करून १० डावांत कोहलीची सरासरी १३.४० इतकी खराब होती. मालिकेत सहा वेळा तो एक अंकी धावसंख्येवर बाद झाला. जास्तकरून तो ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूवर चाचपडताना दिसला, आणि कित्येकदा बॅटची कड घेणाऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक किंवा स्लीप मधल्या क्षेत्ररक्षकाकडून झेलबाद झाला. मालिकावीर जेम्स अँडरसनने कोहलीला चार वेळा बाद केले. विश्लेषक आणि माजी क्रिकेट खेळाडूंनी कोहलीच्या फलंदाजी तंत्राबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त केले. जेफ्री बॉयकॉट म्हणतात, "जिमी अँडरसनने त्याला नाश्त्याला खाल्ले. जेव्हा कोहली फलंदाजीला उतरत असे, त्याने फक्त ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, गोलंदाजी केली, आणि कोहली दरवेळी फसला. तो त्याच्या पॅडपासून खूप लांब बॅटने खेळत होता. त्याने त्याच्या तंत्राच्या चित्रफित पाहाव्यात आणि मूळ तंत्र सुधारण्यावर भर द्यावा". यानंतर झालेली एकदिवसीय मालिका भारताने ३-१ अशी जिंकली परंतु कोहलीला त्याचा सूर मात्र सापडला नाही, त्याने चार डावांत १८ च्या सरासरीने धावा केल्या. दौऱ्यातल्या शेवटच्या आणि एकमेव टी२० सामन्यात त्याने ४१ चेंडूत ६६ धावा केल्या. भारताने सामना तीन धावांनी गमावला, परंतु आंतरराष्ट्रीय टी२० आयसीसी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
ऑक्टोबर २०१४ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशी झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीला चांगले यश मिळाले. फेब्रुवारी पासून खेळलेल्या १६ डावांतील पहिले अर्धशतक त्याने, दिल्लीमधल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात. ६२ धावा करून झळकावले, आणि तो म्हणाला ह्या खेळीमुळे त्याला त्याचा हरवलेला "आत्मविश्वास पुन्हा मिळाला." धरमशाला येथील चवथ्या सामन्यात त्याने त्याचे २०वे शतक साजरे करताना ११४ चेंडूंत १२७ धावा फटकावल्या. भारताचा ५९ धावांनी विजय झाला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. नोव्हेंबर मधल्या श्रीलंकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी धोणीला विश्रांती देण्यात आली, ज्यामुळे कोहलीला पुन्हा एकदा संपूर्ण मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत कोहलीने चवथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांत त्याने २२, ४९, ५३ आणि ६६ अशा धावा केल्या. भारताने चारही सामने जिंकून मालिकेमध्ये ४-० अशी विजयी आघाडी घेतली. रांची मधील पाचव्या सामन्यात २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था १४/२ अशी झालेली असताना कोहली फलंदाजीला आला आणि त्याने १२६ चेंडूंत १३९ धावा करून श्रीलंकेला व्हाईटवॉश आणि संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा दुसरा व्हाईटवॉश होता. मालिकेदरम्यान त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. २०१४ मध्ये ५८.५५ च्या सरासरीने त्याने १०५४ धावा केल्या, आणि लागोपाठ ४ वर्षांत १००० धावा पूर्ण करणारा सौरव गांगुलीनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला...
ॲडलेड येथे डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोणीऐवजी कर्णधारपदाची सुत्रे कोहलीच्या हाती दिली गेली. सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ११५ धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चवथा भारतीय कर्णधार. दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. भारताची धावसंख्या २ गडी बाद ५७ असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशाने फलंदाजी करू लागला. त्याने मुरली विजय सोबत तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर २४२/२ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३१५ धावांवर आटोपला. १७५ चेंडूत १४१ धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. कोहली म्हणला, संघाने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, "मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी" असेही तो म्हणाला. कोहलीच्या दुसऱ्या डावातल्या शतकाचे ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच समालोचकांनी 'ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेली सर्वाधिक आकर्षक चवथ्या डावातील खेळी' असे वर्णन केले.
ब्रिस्बेन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात धोणी कर्णधार म्हणून परतला, ज्यात कोहलीने १९ आणि १ धावा केल्या आणि भारताचा चार गडी राखून पराभव झाला. मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताकडून दोन्ही डावांत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावात त्याने त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १६९ केली आणि रहाणेसोबत २६२ धावांची भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी भारताची दहा वर्षातली आशियाच्या बाहेरची सर्वात मोठी भागीदारी होती. दुसऱ्या डावातील पाचव्या दिवशी, कोहलीच्या ५४ धावांमुळे भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले. हा सामना संपल्यानंतर धोणीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली आणि सिडनीतील चवथ्या कसोटीपासून कोहली भारताचा नवा कसोटी कर्णधार झाला. संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करताना कोहलीने पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या. कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत तीन शतके झळकाविणारा कोहली हा पहिलाच फलंदाज. दुसऱ्या डावात तो ४६ धावांवर बाद झाला, आणि भारताने आणखी एक कसोटी सामना अनिर्णित राखला. चार कसोटी सामन्यांत कोहलीने ६९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजातर्फे ह्या सर्वाधिक धावा होत्या.
जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही. त्याला चार सामन्यांत एकदाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. कोहलीचा एकदिवसीय सामन्यातील सूर त्याला विश्वचषकाच्या सराव सामन्यांपर्यंत सापडू शकला नाही. सराव सामन्यांत तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे फक्त १८ आणि ५ धावा करू शकला.
ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला. उर्वरित चार गट फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने प्रत्येक वेळी दुसरी फलंदाजी केली आणि कोहलीने संयुक्त अरब अमिराती, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि झिंबाब्वे विरुद्ध अनुक्रमे ३३*, ३३, ४४* आणि ३८ धावा केल्या. भारताने सर्वच्या सर्व चार सामने जिंकून गट बच्या गुणफलकावर पहिल्या क्रमांकावर मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १०९ धावांनी विजय मिळवला, कोहलीला रुबेल हुसेनने ३ धावांवर बाद केले. मेलबर्न येथील उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून स्पर्धेतून बाद केले. कोहली १३ चेंडूत फक्त १ धाव करून मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला
जून २०१५ मधल्या भारताच्या बांगलादेश दौऱ्यावर कोहलीच्या धावा मंदावल्या. त्याने अनिर्णित राहिलेल्या एकमेव कसोटी सामन्यात फक्त १४ धावा केल्या आणि बांगलादेशने २-१ असा विजय मिळवलेल्या एकदिवसीय मालिकेत फक्त १६.३३ च्या सरासरीने धावा केल्या. कोहलीची कमी धावांची माळ तुटली ती श्रीलंकेच्या दौऱ्यावर. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात त्याचे ११ वे शतक साजरे केले, परंतु भारताने सामना गमावला. भारताने मालिकेत पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकून आणि मालिका २-१ अशी खिशात घातली. कोहलीचा कर्णधार म्हणून पहिला मालिका विजय आणि भारताचा चार वर्षांनंतर परदेशातला विजय
दक्षिण आफ्रिकेच्या भारताच्या दौऱ्यावर, कोहलीने टी२० मालिकेमध्ये २२ च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर त्याने दोन एकदिवसीय सामन्यात चवथ्या क्रमांकावर फलंदाजी केली परंतु त्याला त्यात चांगल्या धावा करता आल्या नाही. राजकोट मधील सामन्यात तो पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला आणि त्याने ७७ धावा केल्या. चेन्नई मधील चवथ्या सामन्यात त्याने सामना जिंकून देणारी १३८ धावांची खळी केली आणि भारताने मालिकेमध्ये बरोबरी साधली. मुंबईतील शेवटच्या सामन्याबरोबर भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी गमावली. कोहलीने मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या. भारताने कम बॅक करत पहिल्या क्रमांकावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असे पराभूत केले आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्याने मालिकेमध्ये ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या, ज्यात दिल्लीमधल्या शेवटच्या सामन्यातील ४४ आणि ८८ धावा होत्या.
15 जानेवारी 2022 रोजी, दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर त्याने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्याची घोषणा करून भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले.
कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला. कोहलीने नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० अशा तिनही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली, आणि दोन सामन्यांमध्ये सामनावीराच्या पुरस्कारासहित, मालिकावीराचा बहुमान सुद्धा मिळवला. त्यानंतर झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती, ज्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ८४ धावांचा पाठलाग करताना ४९ धावा केल्या, त्यामागोमाग दोन वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करताना श्रीलंकेविरुद्ध नाबाद ५६ आणि बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात नाबाद ४१ धावा केल्या.
कोहलीने त्याची विजयी घोडदौडीतील कामगिरी भारतातील २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेतही सुरूच ठेवली. त्याने पाकिस्तानविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करताना नाबाद ५५ धावा केल्या. विजय आवश्यक असलेल्या गटातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५१ चेंडूंत ८२ धावांची प्रेक्षणीय खेळी केली. त्याच्या ह्या खेळीमुळे भारताने सामना सहा गडी राखून जिंकला आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले; कोहलीच्या मते ही त्याची टी२० मधील सर्वोत्कृष्ट खेळी होती. उपांत्य सामन्यात, कोहली ४७ चेंडून ८९ धावा करून, पुन्हा एकदा सामन्यात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता, पण वेस्ट इंडीजने भारताची १९२ धावसंख्या पार केली आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. पाच सामन्यांमध्ये १३६.५० च्या सरासरीने त्याने २७३ धावा केल्या आणि विश्व ट्वेंटी२० मध्ये सलग दुसऱ्यांदा सामनावीर होण्याचा मान मिळवला.
पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजमध्ये खेळताना त्याने अँटिग्वा येथील पहिल्या कसोटी सामन्यात २०० धावा केल्या. भारताने वेस्ट इंडीजचा एक डाव आणि ९२ धावांनी पराभव करून आशिया बाहेरील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. प्रथम वर्गीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिलेच द्विशतक आणि भारतीय कर्णधारातर्फे भारताबाहेरचेसुद्धा पहिलेच द्विशतक. भारताने मालिका २-० अशी जिंकली आणि पाकिस्तानने मागे टाकण्याआधी काही वेळासाठी कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवला. न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....
कोहलीच्या ट्वेंटी२० सामन्यांतील खेळी | ||||||
---|---|---|---|---|---|---|
सामने | धावा | सर्वोच्च | १०० | ५० | सरासरी | |
आंतरराष्ट्रीय टी२० | ४८ | १७०९ | ९०* | ० | १६ | ५३.४० |
आयपीएल | १४९ | ४४१८ | ११३ | ४ | ३० | ३७.४४ |
चँपियन्स लीग | १५ | ४२४ | ८४* | ० | २ | ३८.५४ |
मार्च २००८ मध्ये, कोहलीला इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३०,००० अमेरिकी डॉलर्स किंमतीत यूथ कॉन्ट्रॅक्ट विकत घेतले. त्याच्यासाठी २००८चा मोसम खूपच वाईट गेला, त्याने १२ डावांमध्ये १०५.०९चा स्ट्राईक रेट आणि १५ च्या सरासरीने १६५ धावा केल्या. दुसऱ्या मोसमात त्याच्या कामगिरीमध्ये थोडी सुधारणा झाली. त्याने ११२चा स्ट्राईक रेट आणि २२.३६ च्या सरासीने २४६ धावा केल्या, आणि त्याचा संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला. २०१० च्या मोसमात, त्याच्या संघातून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने २७.९० च्या सरासरीने ३०७ धावा केल्या. तसेच त्याच्या स्ट्राईक रेट मध्ये १४४.८१ अशी कमालीची सुधारणा झाली.
२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल. ह्या मोसमात कोहली त्याचा संघमित्र ख्रिस गेलनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. ह्या आयपीएल मध्ये बंगलोरच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. कोहलीने १२१चा स्ट्राईक रेट आणि ४६.४१ च्या सरासरीने ५५७ धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएल २०१२ मध्ये त्याला बेताचेस यश मिळाले. त्याने २८ च्या सरासरीने ३६४ धावा केल्या.
२०१३ च्या मोसमात कोहलीची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्या वर्षी रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला क्रमवारीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु फलंदाज म्हणून कोहलीला बऱ्यापैकी यश मिळाले. १३८पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि ४५.२८ च्या सरासरीने त्याने ६३४ धावा केल्या, त्यामध्ये सहा अर्धशतके आणि सर्वोच्च धावसंख्या ९९ यांचा समावेश होता. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरा होता. पुढच्या मोसमात बंगलोरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, ज्यामध्ये कोहलीने २७.६१ च्या सरासरीने ३५९ धावा केल्या. २०१५ आयपीएल मध्ये त्याच्या फलंदाजीतील यशाने त्याचा संघ प्ले ऑफ पर्यंत पोहोचला. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत ५व्या स्थानावर होता. त्याने १३०.८२चा स्ट्राईक रेट आणि ४५.९० च्या सरासरीने ५०५ धावा केल्या.
आयपीएल २०१६, विराट कोहलीच्या दृष्टीने फारच फलदायी ठरली. स्पर्धेत स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन घडवताना, कोहलीने १६ सामन्यांमध्ये ४ शतके, ६ अर्धशतके यांसह ८३ चौकार आणि ३८ षट्कारांसह ९७३ धावा केल्या. त्याची सरासरी होती ८१.०८ आणि स्ट्राईक रेट १५२.०३. स्पर्धेत त्याने सर्वाधिक षट्कार मारले, सर्वाधिक धावा केल्या. त्याची सरासरी सर्वात जास्त होती आणि २५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्ट्राईक रेटचा विचार करता, तो दुसऱ्या क्रमांकावर होता. स्पर्धेत त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
कोहली नैसर्गिकरित्या मजबूत तांत्रिक कौशल्यासह एक आक्रमक फलंदाज आहे.. बहुतेक वेळा तो मधल्या फळीतील फलंदाज आहे, परंतु बरेचदा त्याने संघासाठी डावाची सुरुवातही केली आहे. तो थोडासा छाती पुढे काढलेल्या पावित्र्यात आणि खालच्या हाताची मजबूत पकड घेऊन फलंदाजी करतो, आणि तो पायाची हालचालसुद्धा चपळतेने करतो. तो त्याच्या फटक्याची विविधता, डावाची गती वाढवणे आणि दबावाखाली फलंदाजीबाबत ओळखला जातो. मिड-विकेट आणि कव्हर क्षेत्रात त्याचे खास सामर्थ्य आहे. त्याच्या मते कव्हर ड्राइव्ह हा त्याचा आवडता फटका आहे, आणि त्याला फ्लिकचा फटका नैसर्गिकरित्या येतो. तो सहसा स्वीपचा फटका खेळत नाही म्हणून त्याला "नॉट अ नॅचरल स्वीपर ऑफ क्रिकेट बॉल" असे म्हटले जाते. त्याचे संघ सहकारी त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता आणि नीतितत्त्वे याबद्दल त्याची प्रशंसा करतात. कोहली एक खूप "शार्प" क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.
कोहलीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक सर्वोत्तम फलंदाज मानले जाते, मुख्यत्वे धावांचा पाठलाग करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाठलाग करताना त्याची सरासरी आहे ६१.२२, आणि त्याच्या विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आहे ४१.२३] त्याची २५ पैकी १५ शतके धावांचा पाठलाग करताना आली आहेत, जी सचिन तेंडूलकरपेक्षा फक्त दोनने कमी आहेत, ज्याच्या नावावर दुसऱ्या डावातील सर्वाधिक एकदिवसीय शतके आहेत. दुसरी फलंदाजी करताना त्याच्या प्रभावी फलंदाजी बद्दल कोहली म्हणतो "धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जी एकंदरीत परिस्थिती असते ती मला आवडते. केव्हा एकेरी धाव घ्यायची आणि केव्हा चौकार-षटकार मारायचा ह्याबाबात मला स्वतःची परीक्षा घेण्याचं आव्हान आवडतं"
फलंदाजी करण्याच्या एकसारख्या शैलीमुळे कोहलीची तुलना नेहमी तेंडूलकरबरोबर होते, आणि कधीकधी तर त्याला तेंडूलकरचा "वारसदार" असेही म्हटले जाते. अनेक माजी क्रिकेट खेळाडू त्याच्याकडून तेंडूलकरचे विक्रम मोडण्याची अपेक्षा करतात. वेस्ट इंडीजचा माजी सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्स, ज्याला क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज म्हटले जाते, तो सुद्धा म्हणतो कोहली मला माझी आठवण करून देतो. २०१५ च्या सुरुवातीला, रिचर्ड्स म्हणाले, कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये "आत्ताच विख्यात" आहे, तसेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू डीन जोन्स कोहलीला "क्रिकेट विश्वाचा नवा राजा" म्हणाले.
कोहली त्याच्या मैदाना मधील आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्याचे वर्णन प्रसार माध्यमांनी "उतावीळ" आणि "उद्दाम" असे केले होते. तो बरेचदा खेळाडू आणि पंचांशी वादात पडला आहे. बऱ्याच माजी क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या आक्रमकतेला पाठिंबा दिला आहे, आणि काहींनी त्याची टीका सुद्धा केली आहे. २०१२ मध्ये, कोहली नमूद करतो की तो त्याच्या आक्रमकतेला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे परंतु "खेळतील ताण आणि काही विशिष्ट प्रसंगी आक्रमकतेला आवर घालणे अवघड जाते."
डिसेंबर २०१५ पर्यंत, कोहलीचे बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंध होते. त्यांच्या संबंधांना प्रसारमाध्यमांनी खूप जास्त प्रसिद्धी दिली. त्याने ११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्का शर्माशी लग्न केले.
कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो; आधी तो ज्या ग्लोव्ह्ज घालून जास्त धावा होतील त्याच वापरत असे. २०१२ पासून तो धार्मिक काळ्या धाग्याशिवाय तो उजव्या हातावर कडे सुद्धा घालतो. विराट कोहलीच्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली आहे आणि तो सुधा क्रिकेट खेळत होता परंतु त्याने खेळणे सोडून दिले .
कोहलीच्या सांगण्यांनुसार, फुटबॉल हा त्याचा दुसरा आवडता खेळ आहे. २०१४, मध्ये विराट कोहली इंडियन सुपर लीगच्या क्लब एफसी गोवाचा सह-मालक झाला. “फुटबॉलच्या उत्सुकतेपोटी” आणि “भारतात फुटबॉल वाढीस लागावा” म्हणून त्याने क्लब मध्ये गुंतवणूक केली असे तो म्हणतो. त्या शिवाय तो असेही म्हणतो की "हा माझ्यासाठी एक व्यावसायिक उपक्रम आहे, ज्याकडे मी भविष्याच्या दृष्टीने पाहत आहे. क्रिकेट शेवट पर्यंत राहणार नाही म्हणून, जेव्हा मी निवृत्त होईन, त्यावेळेसाठी मी माझे पर्याय खुले ठेवतोय.”
नोव्हेंबर २०१४ मध्ये, कोहली आणि अंजना रेड्डीचे युनिव्हर्सल स्पोर्टझबिझ (USPL) यांनी मिळून 'WROGN' हा तरुणांसाठीचा फॅशन ब्रँडची सुरुवात केली. २०१५ मध्ये ह्या ब्रँडने पुरूषांसाठी कॅज्युअल कपडे बनवण्यास सुरुवात केली, आणि मायंत्रा तसेच शॉपर्स स्टॉप यांच्याशी हातमिळवणी केली.
२०१५ मध्ये कोहलीने देशभरात व्यायामशाळा आणि स्वास्थ केंद्र यांची साखळी सुरू करण्यासाठी ९० कोटी (US$१९.९८ दशलक्ष)ची गुंतवणूक केली. "Chisel" नावाची व्यायामशाळाची साखळी विराट कोहलीच्या संयुक्त विद्यमाने मालकीची आहे. CSE (कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँड एंटरटेन्मेंट), नावाची एजन्सी कोहलीची व्यावसायिक हितसंबंध पाहते.
सप्टेंबर २०१५, मध्ये कोहली इंटरनॅशनल प्रीमियर लीगची फ्रँचायझी युएई रॉयल्सचा सह-मालक झाला.
कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँड एंटरटेन्मेंटचे बंटी सजदेह ह्या स्पोर्टस् एजंटने २००८, १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर कोहलीला करारबद्ध केले. सजदेह सांगतात "मी, ते सितारे झाल्यानंतर त्यांच्यामागे जात नाही. खरंतर मी कौलालंपूरमधल्या २००८, आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये विराटला पाहिलं. आणि त्याची वर्तणूक आणि तो ज्याप्रकारे त्याच्या संघावर नियंत्रण ठेवत होता, ते पाहून मी फार प्रभावित झालो. त्याच्यात ती ठिणगी होती. आणि मी युवीला भेट घडवून द्यायला सांगितली. " शिखर धवन, रोहित शर्मा आणि मुरली विजय सोबत सजदेह कोहलीच्या एनडोर्समेंट्स सांभाळतो. २०१३ मध्ये कोहलीची ब्रँ एनडोर्समेंट्स १०० कोटी इतकी होती. २०१४ मध्ये, अमेरिकन अप्रेजल ने ब्रँड कोहलीचे मूल्य US$५६.४ दशलक्ष इतके दाखवून त्याला भारताच्या सर्वात महागड्या ख्यातनाम व्यक्तींच्या यादीत चवथे स्थान दिले त्याची बॅट संबंधीचा एमआरएफ बरोबरचा करार हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वात महागडा करार समजला जातो. २०१४ मध्ये, इंग्लंडमधील एक नियतकालिक स्पोर्ट्सप्रो ने कोहलीला लुईस हॅमिल्टन नंतर दुसरा सर्वात जास्त मार्केटेबल खेळाडू म्हटले होते, ज्याला त्यावेळी क्रिस्तियानो रोनाल्डो, लायोनेल मेस्सी, आणि उसेन बोल्टच्या ही वर मानांकन दिले गेले.
जानेवारी २०१५ पर्यंत, कोहलीला एकूण ११ ब्रँड ने करारबद्ध केले आहे. ज्या मध्ये पेप्सिको, बुस्ट, मंच (नेस्ट्लेद्वारा), क्लियर हेयर केयर (युनिलिव्हर), रॉयल चॅलेंज (युनायटेड स्पिरीट्सद्वारा), आदिदास, एमआरएफ, मॅटरेल, ओकले, टीव्हीएस् मोटर्स आणि विक्स यांचा समावेश आहे. याआधी कोहलीने फास्ट्रॅक (टायटनद्वारा), संगम सुटिंग्स, फेअर अँड लव्हली, हर्बलाईफ, फ्लाईंग मशीन, रेड चीफ शुज, टोयोटा मोटर्स, सेलकॉन मोबाईल्स, सिंथॉल (गोदरेजद्वारा) आणि ३सी कंपनी या ब्रँडसोबतही करार केले होते.
मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत. कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील" मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.
फलंदाजीकसोटी क्रिकेट
संदर्भ: | एकदिवसीय क्रिकेट
संदर्भ: |
वर्ष | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
---|---|---|---|---|---|---|
२०१० | २ | २६ | - | ० | ० | २६* |
२०११ | ४ | ६१ | १५.२५ | ० | ० | २८ |
२०१२ | १४ | ४७१ | ३९.२५ | ० | ४ | ७८* |
२०१३ | १ | २९ | २९.०० | ० | ० | २९ |
२०१४ | ७ | ३८५ | ९६.२५ | ० | ५ | ७७ |
२०१५ | २ | ४४ | २२.०० | ० | ० | ४३ |
२०१६ | १५ | ६४१ | १०६.८३ | ० | ७ | ९०* |
२०१७ | ३ | ५२ | १७.३३ | ० | ० | ९०* |
ठिकाण | सामने | धावा | सरासरी | १०० | ५० | सर्वोच्च |
---|---|---|---|---|---|---|
मायदेशी | १७ | ५७८ | ४१.२८ | ० | ४ | ८९* |
परदेशी | १६ | ५६३ | ६२.०० | ० | ६ | ९०* |
तटस्थ | १५ | ५६८ | ६३.११ | ० | ६ | ७८* |
संदर्भः
स्वरूप | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | बरोबरी | रद्द | वि/प |
---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | १९ | ११ | २ | ६ | ० | ० | ५.५० |
ए.दि. | १७ | १४ | ३ | ० | ० | ० | ४.६६ |
क्र. | विरुद्ध | ठिकाण | तारीख | सामन्यातील कामगिरी | निकाल | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|
१ | न्यूझीलंड | एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर | ३१ ऑगस्ट–३ सप्टेंबर २०१२ | १ला डाव: १०३ (१९३ चेंडू: १४x४ १x६) २रा डाव: ५१ (८२ चेंडू: ९x४) | विजयी | |
२ | दक्षिण आफ्रिका | न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग | १८-२२ डिसेंबर २०१३ | १ला डाव: ११९ (१८१ चेंडू: १८x४) २रा डाव: ९६ (१९३ चेंडू: ९x४) | अनिर्णित | |
३ | इंग्लंड | एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् | १७–२१ नोव्हेंबर २०१६ | १ला डाव: १६७ (२६७ चेंडू: १८×४) २रा डाव: ८१ (१०९ चेंडू: ८×४) | विजयी | |
४ | इंग्लंड | वानखेडे मैदान, मुंबई | ८-१२ डिसेंबर २०१६ | १ला डाव: २३५ (३४० चेंडू: २५×४, १x६) | विजयी | |
५ | बांगलादेश | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद | ९-१३ फेब्रुवारी २०१७ | १ला डाव: २०४ (२४६ चेंडू: २४×४) २रा डाव: ३८ (४० चेंडू: २×४, १×६) | विजयी |
क्र. | विरुद्ध | ठिकाण | तारीख | सामन्यातील कामगिरी | निकाल | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|
१ | वेस्ट इंडीज | वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग | ३० सप्टेंबर २००९ | ७९* (१०४ चेंडू: ९x४, २x६) | विजयी | |
२ | बांगलादेश | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका | ११ जानेवारी २०१० | १०२* (९५ चेंडू: ११x४) | विजयी | |
३ | ऑस्ट्रेलिया | एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् | २० ऑक्टोबर २०१० | ११८ (१२१ चेंडू: ११x४, १x६) | विजयी | |
४ | न्यूझीलंड | नेहरू स्टेडियम, गुवाहाटी | २८ नोव्हेंबर २०१० | १०५ (१०४ चेंडू: १०x४) | विजयी | |
५ | वेस्ट इंडीज | क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन | ८ जून २०११ | ८१ (१०३ चेंडू: ६x४, १x६) | विजयी | |
६ | इंग्लंड | फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली | १७ ऑक्टोबर २०११ | ११२* (९८ चेंडू: १६x४) | विजयी | |
७ | वेस्ट इंडीज | एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् | २ डिसेंबर २०११ | ११७ (१२३ चेंडू: १४x४) | विजयी | |
८ | श्रीलंका | बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट | २८ फेब्रुवारी २०१२ | १३३* (८६ चेंडू: १६x४ २x६) | विजयी | |
९ | श्रीलंका | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका | १२ मार्च २०१३ | १०८ (१२० चेंडू: ७x४) | विजयी | |
१० | पाकिस्तान | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका | १८ मार्च २०१२ | १८३ (१४८ चेंडू: २२x४ १x६) | विजयी | |
११ | श्रीलंका | महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा | २१ जुलै २०१२ | १०६ (११३ चेंडू: ९x४) | विजयी | |
१२ | श्रीलंका | रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो | ३१ जुलै २०१२ | १२८* (११९ चेंडू: १२x४ १x६) | विजयी | |
१३ | इंग्लंड | जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, रांची | १९ जानेवारी २०१३ | ७७* (७९ चेंडू: ९x४ २x६) | विजयी | |
१४ | वेस्ट इंडीज | क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन | ५ जुलै २०१३ | १०२ (८३ चेंडू: १३x४, २x६) | विजयी | |
१५ | झिम्बाब्वे | हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे | २४ जुलै २०१३ | ११५ (१०८ चेंडू: १३x४, १x६) | विजयी | |
१६ | ऑस्ट्रेलिया | विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर | ३० ऑक्टोबर २०१३ | ११५* (६६ चेंडू: १८x४, १x६) | विजयी | |
१७ | वेस्ट इंडीज | जवाहरलाल नेहरू मैदान, कोची | २१ नोव्हेंबर २०१३ | ८६ (८४ चेंडू: ९x४, २x६) | विजयी | |
१८ | बांगलादेश | खान साहेब ओस्मान अली मैदान, फतुल्ला | २६ फेब्रुवारी २०१४ | १३६ (१२२ चेंडू: १६x४, २x६) | विजयी | |
१९ | वेस्ट इंडीज | हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, धरमशाला | १७ ऑक्टोबर २०१४ | १२७ (११४ चेंडू: १३x४, ३x६) | विजयी | |
२० | पाकिस्तान | ॲडलेड ओव्हल, ॲडलेड | १५ फेब्रुवारी २०१५ | १०७ (१२६ चेंडू: ८x४) | विजयी | |
२१ | दक्षिण आफ्रिका | एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई | २२ ऑक्टोबर २०१५ | १३८ (१४० चेंडू: ६x४, ५x६) | विजयी | |
२२ | न्यूझीलंड | पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली | २३ ऑक्टोबर २०१६ | १५४* (१३४ चेंडू: १६×४, १×६) | विजयी | |
२३ | वेस्ट इंडीज | सबाइना पार्क, जमैका | ६ जुलै २०१७ | १११ (११५ चेंडू: १२×४, २×६) | विजयी |
क्र. | मालिका | मोसम | मालिकेतील कामगिरी | निकाल | संदर्भ |
---|---|---|---|---|---|
१ | भारताचा श्रीलंका दौरा | २०१२ | ७४.०० च्या सरासरीने २९६ धावा (५ सामने) | भारत मालिकेत ४-१ ने विजयी | |
२ | वेस्ट इंडीजचा भारत दौरा | २०१३-१४ | ६८.०० च्या सरासरीने २०४ धावा (३ सामने) | भारत मालिकेत २-१ ने विजयी | |
3 | श्रीलंकेचा भारत दौरा | २०१४-१५ | ८२.२५ च्या सरासरीने ३२९ धावा (५ सामने) | भारत मालिकेत ५-० ने विजयी |
क्र. | विरुद्ध | स्थळ | तारीख | सामन्यातील कामगिरी | निकाल | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|
१ | अफगाणिस्तान | रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो | १९ सप्टेंबर २०१२ | ५० (३९ चेंडू: ४x४, २x६) | विजयी | |
२ | पाकिस्तान | रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो | ३० सप्टेंबर २०१२ | ७८* (६१ चेंडू: ८x४, २x६) | विजयी | |
३ | दक्षिण आफ्रिका | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका | ४ एप्रिल २०१४ | ७२* (४४ चेंडू: ५x४, २x६) | विजयी | |
४ | ऑस्ट्रेलिया | ॲडलेड ओव्हल, ॲडलेड | २६ जानेवारी २०१६ | ९०* (५५ चेंडू: ९x४, २x६) | विजयी | |
५ | ऑस्ट्रेलिया | मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न | २९ जानेवारी २०१६ | ५९* (३३ चेंडू: ७x४, १x६) | विजयी | |
६ | पाकिस्तान | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका | २८ फेब्रुवारी २०१६ | ४९ (५१ चेंडू: ७x४) | विजयी | |
७ | श्रीलंका | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका | १ मार्च २०१६ | ५६* (४७ चेंडू: ७x४) | विजयी | |
८ | पाकिस्तान | इडन गार्डन्स, कोलकाता | १९ मार्च २०१६ | ५५* (३७ चेंडू: ७x४, १x६) | विजयी | |
९ | ऑस्ट्रेलिया | पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली | २७ मार्च २०१६ | ८२* (५१ चेंडू: ९x४, २x६) | विजयी |
क्र. | मालिका | मोसम | मालिका कामगिरी | निकाल | संदर्भ |
---|---|---|---|---|---|
१ | भारताचा श्रीलंका दौरा | २०१२ | ६८.०० च्या सरासरीने ६८ धावा (१ सामना) | भारत मालिकेत १-० ने विजयी | |
२ | २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ | २०१३-१४ | १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा (६ सामने) | भारत उपविजेता | |
३ | भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा | २०१५-१६ | १९९.० च्या सरासरीने १९९ धावा (३ सामने) | भारत मालिकेत ३-० ने विजयी | |
४ | २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६ | २०१६ | १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा (५ सामने) | भारत उपांत्य सामन्यात पराभूत |
मागील: महेंद्रसिंग धोणी | भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार इ.स. २०१४-१५ – सद्य | पुढील: - |
विराट कोहलीची माहिती[permanent dead link]
This article uses material from the Wikipedia मराठी article विराट कोहली, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.