बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
बाळ ठाकरे | |
---|---|
जन्म | जानेवारी २३, इ.स. १९२६ पूना, बॉम्बे, ब्रिटिश राज |
मृत्यू | १७ नोव्हेंबर, २०१२ (वय ८६) मातोश्री, कलानगर, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मृत्यूचे कारण | हृदयविकाराचा झटका |
चिरविश्रांतिस्थान | शिवाजी पार्क, दादर, मुंबई, महाराष्ट्र |
निवासस्थान | मातोश्री, कलानगर, वांद्रे, मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | व्यंगचित्रकार, राजकारणी |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९५०-इ.स. २०१२ |
प्रसिद्ध कामे | शिवसेना पक्षाची स्थापना |
राजकीय पक्ष | शिवसेना |
धर्म | हिंदू |
जोडीदार | मीना ठाकरे |
अपत्ये | उद्धव, बिंदूमाधव, जयदेव |
वडील | केशव सीताराम ठाकरे |
आई | रमाबाई केशव ठाकरे |
नातेवाईक | राज ठाकरे (पुतण्या) |
संकेतस्थळ shivsena.org |
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.
बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. इ.स. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्याम" या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.[ संदर्भ हवा ]
ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.[ संदर्भ हवा ] या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळ ठाकरे यांचे अग्रलेख असे.[ संदर्भ हवा ]
झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती.[ संदर्भ हवा ] व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.[ संदर्भ हवा ]
ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणाही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.[ संदर्भ हवा ]
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले..
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला. याची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती, तर नवाजुद्दीन सिद्दिकी हे ठाकरेंची भूमिकेत होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article बाळ ठाकरे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.