मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो.
छत्रपती संभाजीनगर शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो. कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. कोरडवाहू शेतीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, अंबाजोगाई, परळी आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्याची मराठी ही मुख्य बोलीभाषा आहे. मराठवाड्यास संतांची भूमी असे म्हटले जाते. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी ३ ज्योतिर्लिंग याच भागात आहे.
?मराठवाडा महाराष्ट्र • भारत | |
— विभाग — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ६४,८११ चौ. किमी |
जिल्हे | छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
लोकसंख्या • घनता साक्षरता | १,५५,८९,२२३ (2001) • २४१/किमी२ ६८.९५ % |
मराठवाडा हा सम्राट प्रसेनजित महाराजांचे राज्य म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान सम्राट प्रसेनजित महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. मराठवाडा संस्थापक सम्राट प्रसेनजित महाराज आहेत. माहूर ही मराठवाड्याची प्रथम राजधानी होती. विदर्भ, खानदेश,कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, तेलंगण, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्य केले. इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव, इक्ष्वाकू या सारख्या मराठी लोकांचे राज्य होते. तर ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते. नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत राज्य केले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला. १७ सप्टेंबरला मराठवाड्याला हैदराबाद संस्थानातून स्वातंत्र्य मिळाले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.
स्वातन्त्र्योत्तर काळात काँग्रेसचे नेते, शंकरराव चव्हाण यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमंत्री, अर्थमंत्री ईत्यादी केन्द्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता. विकास क्षेत्रातील.पैठणचा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान नरसी (नामदेव), संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आपेगाव, संत जनाबाईचे जन्मगाव गंगाखेड, शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव पाथरी, संत एकनाथांचे पैठण, समर्थ रामदासांचे जन्मगाव जांब, देवीचे शक्तिपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर, शीख धर्मीयांचा नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.
गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.
गोदावरी : मराठवाड्यातून गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यंत तिने छत्रपती संभाजीनगर बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिन्धफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
'मांजरा : पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहिल्यादेवीनगर-बीड, धाराशिव-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुण्डलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिन्धफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंतर पुन्हा उत्तरेकडे, किम्बहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिन्दुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिन्धफणा नदीस मिळते. कुण्डलिका ही सिन्धफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिन्धफणा नदीस मिळते.
सिना : जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अंतरापर्यंत तिने अहिल्यादेवीनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.[ संदर्भ हवा ]
कयाधू : नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनते.
मनकर्णिका - बीड व माजलगाव तालुक्यातील नदी. पुढे सिंदफनाला मिळते. आंबेसावळी ता बीड येथे मनकर्णिका १ प्रकल्प व लिंबारूई देवी येथे मनकर्णिका २ सिंचन प्रकल्प या नदीवर आहेत वाण वाण ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नद्यापैकी एक आहे. या नदीचा उगम धारुरच्या घाटातून होतो आणि ही नदी पुन्हा गोदावरीला जाऊन मिळते. या नदीवर नागापूर चे धरण आहे.
मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग तयार झाला आहे. विभागाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. विभागीय आयुक्त हा या महसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.
सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या अहिल्यादेवीनगर आणि जळगाव जिल्ह्यांमधून उच्च न्यायालयात आलेल्या खटल्यांचे कामकाज येथे चालते.
शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तांदुळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना आणि नांदेड शहरांच्या परिसरात उद्योगीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ. स. १९८० नंतर मराठवाड्यात वाढले. जालना हा जिल्हा बियाणे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
या भागात अधिक लोक हे ग्रामीण भागांत राहतात. तसेच ३०-४० टक्के लोक शहरी भागात राहतात. जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबून आहे.
छत्रपती संभाजीनगरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन शासननियंत्रित आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त सर्वसाधारण शिक्षणाची विद्यापीठे मराठवाड्यात आहेत. त्याशिवाय परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. औरंगाबादचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय प्रसिद्ध आहे. याशिवाय इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९५८ रोजी झाले. सुरुवातीला 'मराठवाडा विद्यापीठ' एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला. या प्रदेशातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. धाराशिव येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला.
नांदेड येथे मुख्यालय असलेल्या या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यन्त चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे. प्रदेशातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. लातूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी परभणीत मराठवाडा विभागातील कृषी क्षेत्राच्या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्यात आला.
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तन्त्र विद्यालये, ३३ संलग्न कृषितंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्नतंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषी शाखेच्या नऊ विषयांत, अन्नतंत्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषी अभियांत्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्यात येतो.
संशोधन – विद्यापीठात राज्य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना व २४ अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प कार्यरत असून आजपर्यंत सव्वाशेपेक्षा जास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्त कृषी औजारे व यन्त्रे विकसित करून शेतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारसी प्रस्तुत केल्या आहेत.
विस्तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट (१), कृषी तन्त्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषी विस्तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषी विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते.
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन) व १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्या बियाणाचे वाटप केले जाते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित होतो. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषी दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते.
१९७४ साली मराठवाड्याला स्वतंत्र शिक्षक मतदार संघ मिळाला.आजपर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे छ्त्रपती संभाजीनगर येथील उद्यान आहे, जे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे.
महाराष्ट्र |
---|
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ |
This article uses material from the Wikipedia मराठी article मराठवाडा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.