शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती असते.
शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. 'गावगाडा'कार त्रि.ना.आत्रे 'गाव वसविण्याचे आणि जमीन वहीतीला आणण्याचे' श्रेय शेतकऱ्यांना देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो वा कुळ, मिरासदार असो वा बटाईदार. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.प्रसिद्धी माध्यमे शेतकऱ्यांच्या समस्येवर बोलत नाहीत.खरे तर राजकीय क्षणचित्रे जनतेसमोर आणण्यापेक्षा शेतकरी अडचणीत कसा येतो ते टी.व्ही. माध्यमाने पुढे आणले पाहिजे.
रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात.कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जिवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्याला 'जगाचा पोशिंदा' म्हटल्या जाते. समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां आपदांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय. या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना अर्थात जगाच्या पोशिंद्याला सन्मानाचा दर्जा दिला जावे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी. या शेतकरी निष्ठेने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' ही अभिनव संकल्पना शेतकरीपुत्र, प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनी सर्वप्रथम सुरू केली. आज ही एक प्रथा ,पर्व म्हणून रुढ झालेली आहे. यातूनच आज थेट बांधावर शेतकरी सन्मान, शेतकरी कृतज्ञता व शेतकरी समुपदेशनाचे उपक्रम मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. जगाच्या पोशिंद्याला अर्थात शेतकऱ्यांना थेट बांधावर आत्मबळ देत कृतज्ञता व्यक्त करणारा व त्यांचा सन्मान करणारा राज्य म्हणून महाराष्ट्र हे कृषीप्रधान भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे.
शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून आणि स्रियांच्या लागवड तंत्रातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला 'कृषी प्रधान' देश म्हटले जाते. मान्सूूनवर आधारित शेेती ही एक नैसर्गिक जीवनपद्धती आहे.महाराष्ट्रातील शेतकरी इतिहास लिहिणे, अभ्यासणे आणि जतन करणे आवश्यक आहे. जगाचा पोशिंदा प्राचीन काळापासूनच व्यवस्थेचा बळी आहे.
कृषी प्रधान देश आणि कृषीप्रधान महाराष्ट्र म्हणून आपल्या देशाची व महाराष्ट्राची ओळख आहे. देशाचा कणाच शेती आणि शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे शेतात राबराब राबणारा, शेती कसणारा वर्ग. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर व भाषावार प्रांत रचनेनुसार राज्य स्थापना झाली. त्यानुसार महाराष्ट्र राज्याची देखील सन १९६० मध्ये विदर्भ, मराठवाडा मिळून निर्मिती झाली. याच महाराष्ट्रातून देशाला वसंतराव नाईक याांच्या रूपाने पहिला शेतकरी मुख्यमंत्री मिळाला. वसंतराव नाईक हे हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा मान त्यांनाच मिळाला. यामागे त्यांची शेतकरी प्रति असलेली निष्ठा आणि लोककल्याणकारी धोरणांची उभारणी हे कारणीभूत असल्याचे मानले जाते. हरितक्रांती, श्वेतकक्रांती वसंतराव नाईक यांनी घडवून आणली. शेतकरी समृद्ध व सन्मानाने जगावा यावर त्यांचा अधिक भर होता. शेतकरी कल्याणकारी धोरणांचा महामेरू म्हणून ओळख असली तरी शेतकरी कष्टकरी वर्ग त्यांना आपला कैवारी मानतात. महाराष्ट्र शासन कृषी प्रधान असणाऱ्या महाराष्ट्राचा पावन पर्व म्हणून मानला जाणारा 'कृषी दिन' हा दिवस हरितक्रांती व श्वेत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती म्हणून सर्वत्र साजरा केला होतो. आधुनिक गीत रामायणकार, प्रख्यात कवी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांनी तर शेतकऱ्यांचे कैवारी मानले जाणारे वसंतराव नाईक यांच्या शेती व शेतकरी निष्ठा, हरितक्रांती बाबत सुंदर वर्णन केले आहे., "वसंतराव नाईक यांनी उघडया जमिनीला सन्मानाने हिरव्या पाचूचे वस्त्र नेसवले आहे. "
शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी" लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.
शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने शास्वत कमाईचा नक्की अंदाज बांधणे कठीण असते तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची समस्या आहे
गाय, बैल, म्हैस, रेडा, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या गांडूळ असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.
पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी 'कॅरोलविना पॅराकीट' या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पिकाचे उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.
•शरद जोशी •
This article uses material from the Wikipedia मराठी article शेतकरी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.