शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे.
येथे एक शंभू महादेवाचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणुन पण हे मंदिर प्रसिद्ध आहे, स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबिय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत,तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दान पत्र दिलेले होते आणि मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपति घेत असत.....
?शिखर शिंगणापूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दहिवडी फलटण |
प्रांत | महाराष्ट्र |
विभाग | पुणे |
जिल्हा | सातारा |
तालुका/के | माण |
लोकसंख्या | ३,२७३ (२००१) |
भाषा | मराठी |
सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. ते फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांनाच शिवपार्वतीचे प्रतीक मानतात.
या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.
शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली (हवालदार म्हणून नियुक्ती होती)बांधकाम पूर्णत्वास आले, पुढे १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.
शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वऱ्हाडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर (बळी) मंदिराच्या शिखराला पागोटे (सुताची जाड दोरी) म्हणून बांधला जातो. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा "हर हर हर महादेव"च्या जयघोषात पार पडतो. एकेकाळी चैत्र शुद्ध एकादशीस इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत.
शिखर शिंगणापूर मंदिर | |||||||||
|
चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडिला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. . . . श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्या इतकीच जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भुतोजी महाराज कावडे यांचा कावडीची परंपरा आजही कायम आहे, चैत्र शुद्ध रम नवमी ला पवित्र कऱ्हा संगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्तांचा समवेत कावडीचे प्रस्तान होते... . . पुढे मुंगी घाटात कोणताही दोर न लावत मानवी साखळीचा साह्याने अवघड आसा मुंगी घाट सर केला जातो या कवडीस पहण्य करता शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबून आसतात व शिव नामाचा जयघोष करत आसतात . . . महादेवाला आव्हान (रागात ओरडा) करणारे म्हणुन देखील या कवडीची ओळख आहे माहाद्या धाव sss, माहाद्या धाव (अवघड आसा मुंगी घाट सर करताना भक्तांचा कस पणाला लागतो,आशा वेळी भुतोजीमहाराज व भक्तगण महादेवाला मदतीची हाक देतात) व शंभु कृपेने घाटातील अवघड टप्पे भिंती कावड भक्ती-शक्ती चा संगमात मुंगी घट सर करून वर याते, शिवभक्तांचा आनंद गगनात मावेनासा होतो . . मोठ्यमहादेवाला पवित्र कऱ्हा संगमाचा पण्यने सर्वात शेवटचा यात्रेतला अभिषेक केला जातो व शीखर शिंगणापूर येथिल यात्रेची सांगता होते.
1.अमृतेश्वर बळी मंदिर.
2.हत्तीची सोंड.
3.भागीरथी कुंड.
4.जटा आपटलेले स्थान.
5. गुप्तलिंग मंदिर.
6. शिवतीर्थ तलाव.
7.मुंगी घाट.
8.मोठा महादेव मुख्य मंदिर.
9. तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड, सासवड.यांचा विश्रांतीचा ओटा (चांदणी)
शंभू माझा नवसाचा या चित्रपटातील काही भाग हा शिखर श्शिंगणापूरच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रित झाला आहे. अलका कुबल-आठल्ये, मिलिंद गुणाजी, राजेश शृंगारपूरे , तेजा देवकर , हे त्या चित्रपटातले प्रमुख कलावंत आहेत.
★धज पदयात्रा , ★कावड यात्रा
This article uses material from the Wikipedia मराठी article शिखर शिंगणापूर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.