'वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वोच्च स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील 'व्याघ्र' या शब्दावरून आली आहे. इंग्रजीत वाघाला 'टायगर असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला 'ढाण्या' वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे.
वाघ | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
पँथेरा टायग्रिस (Linnaeus, 1758) | ||||||||||||
वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश(हलक्या पिवळ्या रंगात) २००६ मधील (हिरव्या रंगात). | ||||||||||||
इतर नावे | ||||||||||||
वाघ striatus Severtzov, 1858 |
इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.
एके काळी पश्चिमेस पूर्व अँटोलिया प्रदेश पासून अमूर नदी पात्रात आणि दक्षिणेस हिमालयाच्या पायथ्यापासून सुली बेटांपर्यंतच्या बालीपर्यंत सर्वत्र वाघ पसरले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस, वाघाची संख्या पूर्वीहून ९३% ने कमी झाली आहे तसेच पश्चिम आणि मध्य आशियात, जावा आणि बाली बेटांमधून आणि आग्नेय, दक्षिण आशिया आणि चीनच्या मोठ्या भागांतून लोप पावली आहे. सध्याची वाघ प्रजाती भारतीय उपखंड आणि सुमात्रावरील सायबेरियन समशीतोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. १९८६ पासून वाघाला आययूसीएन रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे. २०१५ पर्यंत जगातील प्रौढ वाघांची संख्या ३०६२ ते ३९४८ असावी असा अंदाज आहे. भारतात सध्या सर्वात अधिक वाघांची संख्या आहे. वाघांची संख्या कमी होण्याच्या मुख्य कारणांमध्ये त्यांचे प्राकृतिक आवास स्थान नष्ट करणे, खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे. काही देशांमधील अधिक दाट लोकवस्ती चे अतिक्रमण या ठिकाणी कारणीभूत आहे.
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मांचूरिया चीन, आग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ (पेंथेरा टायग्रिस) हा मांजर कुटुंब, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. २०२० साली जंगली वाघांतील ७० टक्के वाघ भारतात आहेत. भारतामध्ये २०१४ मध्ये २२२६ वाघ होते. ४ वर्षांनी २०१८ मध्ये ही संख्या वाढून २९६७ वर पोचली.
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत --
वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबनमधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले[ संदर्भ हवा ]. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले)
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता २९६७ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.[ संदर्भ हवा ]
वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात त्याचप्रमाणे यावरून वाघांना ओळखता येते. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात.
वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रीडा ही पहाणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो. समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३ ते ४ शावकांना जन्म देते. मराठीत शावकांना 'छावा' म्हणून ही संभोधले जाते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. शावक अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. शावक आई व भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे व्यतीत करतात. वाघाचे शावक लहानपणी अतिशय खेळकर असतात. शावक जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर शावक स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई शावकांना सोडून निघून जाते. नर शावकांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. बंदीवासातही वाघांची वीण चांगली होते.
वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचे ओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेलरने तसेच वाल्मिक थापर <. यांनी अश्या गोष्टी नोंदवल्या आहेत.
वाघ हा पूर्णतः मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पूर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: रानगवा, चितळ, भेकर व इतर हरणे, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत. पिल्ले आपल्या वाढत्या वयात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकार करतात.
वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगांच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत त्याला धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरून जाते. अतिशय छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो.
भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून झाडाखाली पडतात. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` चंगीज´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटांत आहेत.वाघ शिकार साधल्यावर ती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वले, तरस खासकरून गिधाडे इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून आतडी पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.
वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वांत स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडले आहेत. मुख्य फरक हा आकारमानात व थोड्याफार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादीत आहे.
पांढरा वाघ - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णतः प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत.
वाघाच्या नामशेष प्रजाती
भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारीसाठी मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहूबाजूने वेढा देऊन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामील होत तसेच बरेच हत्ती,घोडे असा ताफ्यांचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार ही फक्त राजे लोकांपुरती मर्यादित होती. भारताच्या ब्रिटिश राजवटीत वाघांच्या शिकारीत आमूलाग्र बदल झाला. बंदुकिसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दुरूनही वाघांना टिपता येऊ लागले व वाघांचा काळ सुरू झाला. ब्रिटिश काळात खास वाघाच्या शिकारीसाठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (so called) महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर मचाणवर बसून करत अथवा हाकारे देऊन साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिकाऱ्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतिस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, उद्योगीकरण, रस्ते, घरणे, गावे वसलेली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटिशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकासाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे, हीसुद्धा समाधानाची बाब आहे. तरीही अधून मधून संजय दत्त, सलमान खान सारखी प्रकरणे बाहेर येत असतात.
जो वाघ माणसांनाच आपले नेहमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. नरभक्षक वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण बऱ्याच काळापासून सतावत आहे. सुंदरबनातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खाऱ्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे.. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील भीमाशंकरच्या जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता.
चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा अनेक रोगांवर चांगला उपयोग होतो.. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही. वाघाच्या मांडीची हाडे, इतर हाडे, सुळे, वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे शिश्न हे नपुंसकतेसाठी औषध असल्याचे मानतात. चीनमध्ये वाघांच्या शरीराच्या भागांची खरेदी-विक्रीची कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
भारत, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंडमधील वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चिनी गिऱ्हाइकांसाठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैशाच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी चोरटी शिकार कमी होईल..
वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रूपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होऊ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिी असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष शिवसेनेचे प्रतीकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्दल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात.
भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. भारतातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे इत्यादी.
पहा व्याघ्रप्रकल्प
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत भारतात केवळ १८०० वाघ आढळले. काहींच्या अंदाजाप्रमाणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला १ लाख तर ब्रिटीश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. ब्रिटीशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली तोच प्रघात ब्रिटीश गेल्यानंतरही कायम राहिला. वाघाची कातडी, नखे हे काही प्रमाणात परकीय चलन मिळवून देत होते. परंतु वाघांची चिंताजनक परिस्थिती पाहून वन्यजीव रक्षकांनी या हौशी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्याच प्रमाणे कायद्यानेही साथ दिली. कातडी निर्यातदार याच्या विरोधात उभे राहिले. १९७२ मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललेल्या खटल्यामध्ये वाघांच्या चिंताजनक संख्येचा आढावा घेत वाघांच्या शिकारीविरुद्ध निकाल दिला[ संदर्भ हवा ]. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे असे या निर्णयात शिक्कामोर्तब झाले. या नंतर भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झाले जे लगेचच १९७३ मध्ये जारी झाले. या नुसार भारतात व्याघ्रप्रकल्पाला चालना मिळाली.
व्याघ्रप्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक उद्याने ही राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्रप्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ६० च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणाऱ्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पूर्वीच्या हाडाच्या शिकाऱ्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगिरी बजावली. १९९० पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले. भारतात वाघांची ४५०० ते ५००० पर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर भारतात वाढलेली संख्या व जगातील इतर भागात अजून कमी झालेली वाघांची संख्या यामुळे आंतराष्ट्रीय माफियांचे याकडे लक्ष वळले व चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले. २००३ ते २००८ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक झाले व भारतात २००८ मध्ये केवळ १३०० वाघ उरले आहेत. चोरट्या शिकारींच्या उपद्रवामुळे नुकतेच आसाम सरकारने याचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. .
भारतात २०१८ साली करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये भारतात करण्यात आलेल्या चौथ्या व्याघ्र गणनेत वापरण्यात आलेली साधने आणि संकलित करणारा डेटा या दोन्ही दृष्टीने आत्तापर्यंतची जगातील सर्वांत मोठी आणि सर्वसर्वसमावेशक गणना होती.या गणनेत १४१ वेगवेगळ्या जागी २६,८३८ ठिकाणी कमेरा ट्रप बसवण्यात आले. त्याद्वारे १२१,३३७ चौ.किमी भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राण्याची हालचाल दिसताच हे कॅमेरे छायाचित्रे घेतात. या कॅमेऱ्यांद्वारे ३४,८५८,६२३ छायाचित्रे घेण्यात आली. त्यातील ७६६५१ वाघांची, तर ५१,७७७ बिबट्यांची होती. सॉफ्टवेअरच्या मदतीने या छायाचित्रांमधून २४६१ वाघ (बछडे सोडून) ओळखण्यात आले. तसेच या सर्वेक्षणाच्या दरम्यान ५२२,९९६ किमी अंतर पायी काटण्यात आले आणि एकूण ३८१,२०० चौ.किमी. जंगल क्षेत्राची पाहणी करण्यात आली. डेटा गोळा करणे आणि त्याचा अभ्यास यासाठी ६२०,७९५ मानवी दिवस खर्च झाले.
रशियातील सायबेरीयन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन सोविएत संघाने संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरियातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरीयन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरीयन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे.
माओवादी धोरणे तसेच चिनी औषधे यांमुळे वाघांचे चीनमधील अस्तित्व संपुष्टातच आले. वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना साऊथ अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले. बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन सुरू होईल..
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत..
This article uses material from the Wikipedia मराठी article वाघ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.