स्वतंत्र मजूर पक्ष (इंग्रजी: Independent Labour Party)ची स्थापना डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ साली केली. या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'
‘कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा- आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा ‘स्वतंत्र मजूर पक्ष' १९३६ साली स्थापन केला. जनता हे या पक्षाचे मुखपत्र होते
ब्रिटिश संसदेने १९३५ साली भारतासाठी पारित केलेल्या कायद्याने भारतीयांना विधीमंडळावर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले. त्यानुसार १९३७ साली निवडणूका होणार असल्याने, त्यासाठी तत्कालीन सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत होते. या निवडणुकीत भाग घेण्यासाठी अस्पृश्यांच्या राजकीय पक्षाची आवश्यकता होती. तसेच काँग्रेस पक्षाने अनेकदा अधिवेशनांमधून समाजसुधारणा घडवून आणण्याविषयी अनेक ठराव केले होते; परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. तसेच म. गांधीच्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांना १९३२ साली विरोध केला होता. त्यामुळे, अस्पृश्यांसाठी वेगळा पक्ष स्थापन करणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आवश्यक वाटत होते. म. गांधींनी, असहकार सत्याग्रह, सविनय कायदेभंग, बहिष्कार, खादीचा पुरस्कार यामार्फत काँग्रेस पक्षाला सामान्य जनतेपर्यंत पोहचविले होते. बाकी पक्ष त्या तुलनेत अत्यंत कमकुवत होते. अशाप्रसंगी काँग्रेसला विरोध करायला दुसरा पक्ष अस्तित्वात आला नाही तर, देशात काँग्रेसची एकपक्षीय हुकूमशाही प्रस्थापित होईल. असे होऊ नये यासाठी काँग्रेसला प्रतिस्पर्धी एखादा प्रभावी पक्ष निर्माण व्हावा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते.
१७ फेब्रुवारी १९३७ रोजी निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची मानली होती. या वेळी मजूर पक्षाने १५ उमेदवार उभे केले होते. व दोन उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः मुंबईमधून उभे होते. पक्षाने उभे केलेल्या उमेदवारांपैकी १३ उमेदवार व पाठिंब्याचे दोन असे १५ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत पक्षाला मिळालेले हे यश घवघवीत होते. १७ यावेळी निवडून आलेल्या काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांनी ब्रिटिश राज्याशी निष्ठेने वागण्याची शपत; भगवद्गीता हातात ठेवून घेतली आणि ते विधीमंडळातील खुच्र्यांवर जाऊन बसले; परंतु ‘विद्वान बुद्धिवादी व लोकशाहीनिष्ठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गीतेला हातात धरून शपत घेण्याचे नाकारले. कारण, त्यांना ज्या दलित श्रमिकांनी निवडून दिले होते त्यांच्याशी त्यांना प्रामाणिक व एकनिष्ठेने राहायचे होते. ‘गीते'सारख्या भोंगळ ग्रंथाला हातात धरून शपत ग्रहण करणे म्हणजे लोकशाहीवरील निष्ठा धुळीस मिळविणे व लोकांना बेईमान होणे होय.' असे त्यांचे म्हणने होते. म्हणून त्यांनी गीता हातात न घेताच शपतविधी उरकला व विधिमंडळात विरोधीगटात जाऊन बसले.
स्वतंत्र मजूर पक्षाने १९३७ ते १९३९ या दरम्यान महत्त्वाची कामगिरी केली. या पक्षाच्या प्रतिनिधींनी विधिमंडळात अनेक विधेयके मांडली. अनेक विधेयकांवर प्रभावीपणे मते मांडली. सर्वांनी विधीमंडळ कामकाजात भाग घेतला. त्यामुळे सरकार पक्षाला खरी भिती स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रतिनिधींची वाटत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दलित, शोषित, कष्टकरी समाजाला एका निश्चित मार्गावर आणून सोडले. त्यांना अनेक निष्ठावान कार्यकर्ते मिळाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या निष्ठा समर्पित करून एकाच ध्येयाने व त्यागाने आंबेडकरी आंदोलनाची ताकद उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला लाखोंच्या संख्येने दलित, कष्टकरी समाजाने उपस्थिती दर्शविली. कोणत्याही तथाकथित भारतीय नेत्याला मिळाले नसतील तेवढे हात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले. त्यावेळी स्वतंत्र मजूर पक्षासारखा सुसंघटित व नियमबद्ध असा एकही पक्ष नव्हता. हा भारतातील पहिलाच राजकीय पक्ष असा होता, की जो संपूर्ण समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सारखा धडपडत होता. या पक्षाची स्थापना वर्गीय जाणिवेतून झाली असल्याने सर्व कष्टक-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक समजले होते. तो दलित असो, श्रमिक असो, शेतमजूर असो अथवा लहान शेतकरी असो. या वर्गाच्या हितासाठी सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी या पक्षाचा लढा होता. म्हणूनच हा पक्ष अल्पावधितच मुंबई प्रांतातील शहरांपासून ते खेड्यांमधील कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत जाऊन पोहचला.
१५ सप्टेंबर १९३८ च्या ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉ. आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला. याच पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर १९३८ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्धार केला.
स्वतंत्र मजूर पक्ष हा अस्पृश्यांचा पहिला राजकीय पक्ष होता. यात सर्व अस्पृश्य, शेतकरी, शेतमजूर व कामगार सामील होणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. “पूर्वाश्रमीच्या महार समाजाने या पक्षाला सहकार्य केले त्याप्रमाणे अस्पृश्यांमधील चांभार व मातंग, या समाजाने फारसे सहकार्य केले नाही. आणि विविध जातिधर्मातील शेतकरी-शेतमजूर व कामगारवर्ग जातीच्या व धर्माच्या नावाखाली विभागला गेल्यामुळे या सर्वांचे फारसे सहकार्य लाभले नाही. त्यामुळे हा पक्ष शक्तीशाली होऊ शकला नाही. तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे भारतातील इतर सर्व पक्षांबरोबर स्वतंत्र मजूर पक्षाचेही कार्य मंदावले. त्यामुळे मुंबई प्रांताबाहेर हा पक्ष लोकप्रिय होऊ शकला नाही.
This article uses material from the Wikipedia मराठी article स्वतंत्र मजूर पक्ष, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.