पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल.
देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.
पु.ल. देशपांडे | |
---|---|
बडोदे, गुजरात | |
जन्म नाव | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे |
टोपणनाव | पु.ल., भाई |
जन्म | नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ मुंबई |
मृत्यू | १२ जून, २००० (वय ८०) पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | नाटककार, साहित्यकार, संगीतकार विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक |
वडील | लक्ष्मण त्रिंबक देशपांडे |
आई | लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे |
पत्नी | सुनीता देशपांडे |
अपत्ये | मानसपुत्र दिनेश ठाकूर |
पुरस्कार | पद्मश्री सन्मान महाराष्ट्र भूषण साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मभूषण |
स्वाक्षरी |
पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.
त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले. अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.
पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस.बी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.[ संदर्भ हवा ] त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.[ संदर्भ हवा ]
पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी पुणे येथे पार्किन्सन्स आजाराच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. ते तेव्हा ८० वर्षांचे होते. हा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस होता.
देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.[ संदर्भ हवा ]
देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काहीना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.[ संदर्भ हवा ]
पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.[ संदर्भ हवा ] वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.[ संदर्भ हवा ]
कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.[ संदर्भ हवा ]
१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भट्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये 'जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. २०१४ मध्ये[ संदर्भ हवा ] प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]
१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.[ संदर्भ हवा ]
१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे (सबकुछ पु.ल!) होते.[ संदर्भ हवा ]
भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती.
१९४७सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली.[ संदर्भ हवा ]
पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल.
'गुळाचा गणपती'मधील 'इंद्रायणी काठीं' ह्या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचे होते.
१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.[ संदर्भ हवा ]
१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.[ संदर्भ हवा ]
वर्ष-इसवी सन | चित्रपटाचे नाव | भाषा | कामगिरी |
---|---|---|---|
१९४७ | कुबेर | मराठी | अभिनय |
१९४८ | भाग्यरेषा | मराठी | अभिनय |
१९४८ | वंदे मातरम् | मराठी | अभिनय |
१९४९ | जागा भाड्याने देणे आहे | मराठी | पटकथा, संवाद |
१९४९ | मानाचे पान | मराठी | कथा-पटकथा-संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); संगीत |
१९४९ | मोठी माणसे | मराठी | संगीत |
१९५० | गोकुळचा राजा | मराठी | कथा, पटकथा, संवाद |
१९५० | जरा जपून | मराठी | पटकथा, संवाद |
१९५० | जोहार मायबाप | मराठी | अभिनय |
१९५० | नवरा बायको | मराठी | कथा, पटकथा, संवाद, संगीत |
१९५० | पुढचं पाऊल | मराठी | पटकथा, संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); अभिनय |
१९५० | वर पाहिजे | मराठी | कथा (अच्युत रानडे यांच्यासह); संवाद |
१९५० | देव पावला | मराठी | संगीत |
१९५२ | दूधभात | मराठी | कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत |
१९५२ | घरधनी | मराठी | पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत |
१९५२ | संदेश | हिंदी | कथा, पटकथा, संवाद (संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली) |
१९५३ | देवबाप्पा | मराठी | पटकथा, संवाद, संगीत, गीतरचना(ग.दि.माडगूळकरांसह) |
१९५३ | नवे बिऱ्हाड | मराठी | संवाद, संगीत |
१९५३ | गुळाचा गणपती | मराठी | कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन |
१९५३ | महात्मा | मराठी, हिंदी, इंग्रजी | कथा |
१९५३ | अंमलदार | मराठी | पटकथा, संवाद, संगीत, अभिनय |
१९५३ | माईसाहेब | मराठी | पटकथा, संवाद |
१९६० | फूल और कलियॉं | हिंदी | कथा, पटकथा |
१९६३ | आज और कल | हिंदी | कथा, पटकथा |
गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)[ संदर्भ हवा ]
This article uses material from the Wikipedia मराठी article पु.ल. देशपांडे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.