अटलबिहारी वाजपेयी ( २५ डिसेंबर १९२४; - १६ ऑगस्ट २०१८) हे भारताचे १० वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.
अटलबिहारी वाजपेयी | |
११ वे भारतीय पंतप्रधान | |
कार्यकाळ मे १६, इ.स. १९९६ – जून १, इ.स. १९९६ | |
राष्ट्रपती | शंकर दयाळ शर्मा |
---|---|
मागील | पी. व्ही. नरसिंहराव |
पुढील | एच. डी. देवेगौडा |
कार्यकाळ मार्च १९, इ.स. १९९८ – मे २२, इ.स. २००४ | |
राष्ट्रपती | शंकर दयाळ शर्मा व अब्दुल कलाम |
मागील | इंद्रकुमार गुजराल |
पुढील | डॉ. मनमोहन सिंग |
कार्यकाळ मार्च १९, इ.स. १९९८ – डिसेंबर ५, इ.स. १९९८ | |
मागील | इंद्रकुमार गुजराल |
पुढील | जसवंत सिंग |
कार्यकाळ मे १६, इ.स. १९९६ – मे २१, इ.स. १९९६ | |
मागील | प्रणव मुखर्जी |
पुढील | सिकंदर बख्त |
कार्यकाळ मार्च २७, इ.स. १९७७ – जुलै २८, इ.स. १९७९ | |
मागील | यशवंतराव चव्हाण |
पुढील | श्यामनंदन मिश्रा |
जन्म | डिसेंबर २५,इ.स. १९२४ ग्वाल्हेर, ग्वाल्हेर राज्य, ब्रिटिश भारत |
मृत्यू | १६ ऑगस्ट २०१८ एम्स हॉस्पिटल, दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
व्यवसाय | राजकारणी, कवी |
धर्म | हिंदू |
सही |
अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते.
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरुणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला.[ संदर्भ हवा ] त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.[ संदर्भ हवा ]
भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तदनंतर १९७५ साली इंदिरा गांधी यानी देशात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली.
या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२ च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. १९७१ च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषदे)मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७ च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला.
जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी भाजपावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विश्व हिंदू परिषदेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपाने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.
तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५ च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५ च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
१९९६ च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्तावाच्या चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.
१९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८ च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance),ची स्थापना केली. अखेर १९९८ च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेस वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते.
मे १९९८मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.[ संदर्भ हवा ] पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या.
विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले 'कर्जबाजारी' हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.
१९९८ च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. देव आनंद यांचाही त्यात समावेश होता. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी " खेल भी जीतो और दिल भी" हा संदेश दिला होता.[ संदर्भ हवा ] यानंतर अण्णाद्रमुकने पाठिंबा काढल्यावर त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ऑक्टोबरपर्यंत काम पाहिले.
कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० अंशापर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून त्या चौक्या खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौक्यांवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.
उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. चीनला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला.
१९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि अटलबिहारी वाजपेयींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
सन १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी IC - ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले . हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली .
२००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला . या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढे RDX होते.
वाजपेयी यानी राष्ट्रधर्म (मासिक), पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहिले. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.
दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.त्यांनी ५:०५ म.उ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता 'एम्स'च्या मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून ५:३५ म.उ जाहीर करण्यात आली.
मागील पी. व्ही. नरसिंहराव | भारतीय पंतप्रधान मे १६, इ.स. १९९६ – जून १, इ.स. १९९६ | पुढील एच. डी. देवेगौडा |
मागील इंद्रकुमार गुजराल | भारतीय पंतप्रधान मार्च १९, इ.स. १९९८ – मे २२, इ.स. २००४ | पुढील डॉ. मनमोहन सिंग |
मागील इंद्रकुमार गुजराल | भारतीय परराष्ट्रमंत्री मार्च १९, इ.स. १९९८ – डिसेंबर ५, इ.स. १९९८ | पुढील जसवंत सिंग |
मागील प्रणव मुखर्जी | भारतीय परराष्ट्रमंत्री मे १६, इ.स. १९९६ – मे २१, इ.स. १९९६ | पुढील सिकंदर बख्त |
मागील यशवंतराव चव्हाण | भारतीय परराष्ट्रमंत्री मार्च २७, इ.स. १९७७ – जुलै २८, इ.स. १९७९ | पुढील श्यामनंदन मिश्रा |
This article uses material from the Wikipedia मराठी article अटलबिहारी वाजपेयी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.