पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूर या क्षेत्राचे नाव नाव 'पंडरगे' असे आहे. मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे.
?पंढरपूर महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | १,३०३.६ चौ. किमी • ४६५.१२ मी |
जिल्हा | सोलापूर |
तालुका/के | पंढरपूर |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर | ४,०२,७०७ (२०११) • ३०९/किमी२ ९१७ ♂/♀ |
संकेतस्थळ: vitthal Rukmini temple.com श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर संकेतस्थळ |
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात. .हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत
पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितांत पौंड्रीकपूर- पुंडरिकपूर- पंढरपूर- पंढरी- पंडरिगे- पंडरगे अशा विविध नावांनी ओळखले जाते.पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.
पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!) दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो. डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते. शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके ११११ मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. 'स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते.हा 'लानमडू' हळूहळू वाढत गेला. शके ११५९ मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव व त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली.आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शके १९२५ च्या सुमारास पुष्कळच झाला.विठ्ठलाला द्वैती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले. पण अद्वैती वारकरी मंडळींसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला, अशीही कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्त, तसेच इतर जातिधर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान्न ‘पुरणपोळी’च विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे.
भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णूपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.
भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड पासून ते पंढरपूरपर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 'नमामि चंद्रभागा अभियान' हाती घेतले आहे. यामध्ये भीमाशंकरपासून ते रायचूरपर्यत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वछता, नदीकाठी वृक्ष लागवड अश्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न आहे, अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे.
पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!) दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो.
पंढरपूरची लोकसंख्या २३७४४६ (२०११)[१] इतकी आहे.
पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणाऱ्या बस वाहतुकीची सोय आहे.
पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्र कुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.
देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैनधर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवतास सूर्याचा अंशही मानतात.
पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक जनाबाईच्या देवळातील घुसळखांब घुसळल्याशिवाय जात नाही. चार प्रमुख एकादश्यांना (आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री) आलेले भाविक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होणारा गोपाळकाला खाण्यासाठी येथे एकत्र जमतात.
या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात. येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या महिन्यात येथे भाविकांची खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे व गायीच्या खुरांचे ठसे दिसतात, असे सांगितले जाते. .विष्णूपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.
चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलीक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेलपट्टी वगैरे पुरातन चुनेगच्ची नक्षीकाम आहे .
मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओवऱ्यांत सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णूवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातास संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चौखांबीच्या दरवाजास चांदीचे नक्षीदार पत्रे लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असते.
विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबात व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे, बेणारे इत्यादींच्या ह्क्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत; आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय व्यवस्थेबाबत काही निर्णय केले होते, तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.
नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णूपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला (विष्णूपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. १९४६ मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती यांबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर ५१६ मध्ये जयद्विट्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून, होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठलदेवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामघील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कडूर तुलाक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर वा पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द व्युत्पादितात. 'चौऱ्याऐंशीच्या शिलालेखा'त (१२७३) पंढरपुरास फागनिपूर व विठेबास विठ्ठल किंवा विठल म्हटले आहे. १२६० ते १२७० च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. १२५८ च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचरिते ग्रंथात पंढरपूर, विठ्ठल मंदिर व तेथील गरुड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या १३११ च्या मराठी शिलालेखात पंडरिपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.
विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली.सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आत जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा सांधला जातो. विशेष म्हनजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेता येणारी विठ्ठलाची ही एकमेव मूर्ती होय.
टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते.
चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो.
संत भानुदासमहाराजांनी विजयनगरहून श्रीविठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिकी एकादशीचा होताया दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथ प्रदक्षिणा काढण्यात आली. याच दिवसाचे स्मरण म्हणुन कार्तिकीस एकादशीस रथ काढण्यात येतो. इ.स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.
या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’त आणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे हे श्रद्धास्थान आहे.गरिबापासून श्रीमान्तापायंत सार्वजन दरवर्षी मनोभावे इथे भेट देतात.
पंढरपुर हे महाराष्ट्रचे एक सुविख्यात तीर्थ आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे.भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णूपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. आषाढ महिन्यात इथे जवळ जवळ ५ लाखापेक्षा जास्त लोक पंढरपूर यात्रेमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून पताका घेऊन या ठिकाणी पायी चालत येतात. येथील नगरपालिका १८५८ मध्ये स्थापन झाली असून गावास शुद्ध पाणीपुरवठा, अग्निशामक सेवा, घरगुती, औद्योगिक, व्यापारी आणि सार्वजनिक उपयोगांसाठी वीज इ. सोयी आहेत. गटारे उघडी असून संडास सफाई भंग्यांमार्फत व मैलावाहतूक ढकलगाडी व ट्रॅक्टरमार्फत होते. यात्रेच्या दिवसांत सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखणे हे एक आव्हानच असते. सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळीही घाणेरड्या गल्ल्या साफ करवून घेण्याबद्दल व त्यासाठी हलालखोरांस घर पाहून दरमहा एक-दोन पैसे देण्याबद्दल हुकूम झाला होता. गावात नऊ रुग्णालये व २११ रुग्णशय्या, दोन शुश्रूषागृहे व ६० रुग्णशय्या, २० दवाखाने व कुटुंबनियोजन केंद्र आहे. यांशिवाय यात्रेच्या वेळी खास वैद्यकीय सोयी आणि रोगप्रतिबंधक व्यवस्था केली जाते. गावातील ५७-६ टक्के लोक साक्षर व शिक्षित असून पुरुषांपैकी ७० टक्के स्त्रियांपैकी ४४.१ टक्के साक्षर व शिक्षित आहेत. येथे वाङ्मय, विज्ञान व वाणिज्य शाखांचे एक महाविद्यालय, आठ माध्यमिक शाळा, २८ प्राथमिक शाळा, चार इतर (टंकलेखन, लघुलेखन व व्यावसायिक) शाळा, एक सार्वजनिक वाचनालय तसेच तीन चित्रपटगृहे आहेत. गावात १९७१ मध्ये ५,४०७ राहती घरे व ९,८३८ कुटुंबे होती. तसेच ५३,६३८ लोकसंख्येपैकी २७,९७२ पुरुष व २५,६५६ स्त्रिया, अनुसूचित जातींचे २,५६४ पुरुष आणि २,२,६७ स्त्रिया, अनुसूचित जमातींचे ४८ पुरुष व ४४ स्त्रिया होत्या.
गावात पक्के रस्ते ३४.५३ किमी. व कच्चे रस्ते १.५३ किमी. असून देवळाभोवतीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोळ आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व सेना महाराज, दामाजीपंत, संत गाडगे महाराज, बंकटस्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज रोहिदास, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, घाटगे महाराज इत्यादीचे मठ व धर्मशाळा आहेत.
गोरक्षण, अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालकाश्रम, फाउंडलिंग होम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय इ. संस्था येथे मोलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलिसठाणे आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्ये, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्या यांचा मोठा बाजार असतो. येथे आठ बँका व दोन कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळे, खण, बांगड्या, तुळशीमाळा, अष्टगंध यांचा चांगला खप होतो. वारकऱ्यांस लागणारे टाळ, मृदंग, चिपळ्या इ. वस्तूही येथे मिळतात.
(इ.५ वी ते १० वी )पर्यंतची शाळा. याची एक शाखा सुस्ते येथे आहे.( श्री दत्त विद्या मंदिर सुस्ते)
विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वात प्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदिर सुमारे २०० मीटरवर आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे १०७ मीटर व दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ५२ मीटर आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत.
पंढरपुरात गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सोप्याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशी विश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णूमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात. यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता; तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबहिर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेशमंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरी तसेच लक्ष्मीमंदिर आहे. ओवरीत नारदाची व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे. जन्ममरणांच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इत्यादी विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.
पंढरपूरचा वारसा जपणे, तेथील मठ, फड, मंदिरे यांचा इतिहास शोधणे यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. सदानंद मोरे आणि वा. ल. मंजूळ यांच्याकडे हा एक प्रकल्प सोपविला होता. २०१५ सालच्या जुलै महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याचे तपशील ग्रंथरूपाने लोकांसमोर येत आहेत.[ संदर्भ हवा ]
सर्वसामान्यांना पंढरपूर घरबसल्या दाखवणारी ‘पंढरपूर आणि श्री विठ्ठल’ ही दूरदर्शनवर नव्याने सुरू होणारी मालिका आकार घेत आहे. त्यामध्ये १) पुराणकालीन कथा भाग, २) संतांची कामगिरी, ३) सामाजिक प्रबोधन असे तिहेरी स्वरूप आहे. त्या दृष्टीने काही मंडळी काम करीत आहेत.[ संदर्भ हवा ]
भीमा की चंद्रभागा, तिचा इतिहास, आजचे स्वरूप, तीर्थस्वरूप होण्यासाठी काय करणे आवश्यक याचा सखोल विचार महाराष्ट्र सरकारच्या इरिगेशन खात्यातर्फे ‘भीमा सर्वेक्षण’ हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहे, त्यामुळे तिच्या काठावरची सर्व क्षेत्रे लोकांसमोर (क्रमशः उगमापासून कृष्णेला मिळेपर्यंतची) येणार आहेत. यासंबंधी प्राथमिक विचार चालू आहे.
या खेरीज पंढरपूरचा क्षेत्रीय वारसा, तेथील वास्तू, नगररचना, लोकजीवन, विविध कला आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या सिंहगड कॉलेजच्या पदव्युत्तर वास्तू विभाग (एम आर्किटेक्चर डिपार्टमेंट) आणि भोपाल - मध्य प्रदेशच्या एस.पी.ए. कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१५ हे चार महिने काम केले. अठरा विद्यार्थ्यांनी प्रा. वैशाली लाटकर (पुणे), प्रा. विशाखा कवठेकर (भोपाळ) आणि प्रा. रमेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अवघड काम केले. नाव ‘वास्तुशास्त्रीय अभ्यास’ असले तरी क्षेत्र पंढरपुराचा सर्वांगीण अभ्यास जो आजवर कधीच केला गेला नाही, तो या वर्षी त्यांच्या हातून घडला.[ संदर्भ हवा ]
या प्रकल्पामध्ये पंढरपुरास येणाऱ्या भाविकांची वाढलेली संख्या, त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, या सुविधा पुरविताना येणाऱ्या अडचणी, ते कार्य करताना क्षेत्राचा समृद्ध वारसा जपणे, केवळ ऐतिहासिक - धार्मिक - सामाजिक वास्तू, वाडे, बाजार, नदीवरचे घाट, परंपरा सांभाळणाऱ्या गल्ल्या-बोळ, तेथील लहान-मोठी मंदिरे या सर्वांचा वास्तुविषयक अभ्यास या विद्यार्थ्यांनी केला. जो लवकरच म्हणजे वारीच्या काळात प्रदर्शन रूपात पुणेकरांना पाहावयास मिळेल.
पंढरपुरातील छोटे उद्योग कुंकू-बुक्का-अष्टगंध, उदबत्ती तयार करणारे कारखाने, तुळशीच्या माळा आणि लाखेच्या बांगड्या तयार करणारे कारागीर, जुने ऐतिहासिक वाडे, जवळपासचे पंचक्रोशीतील मंदिरे, त्यांचा इतिहास, धार्मिक महत्त्व आदी गोष्टी महत्त्वाच्या मानून, त्याचा या प्रकल्पात सविस्तर अभ्यास केला गेला आहे.
वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असा बहुमान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरमधील मठ, फड आणि दिंड्यांचा ग्रंथबद्ध इतिहास प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांनी एका प्रकल्पाद्वारे केला असून त्यांना संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा मुख्य सोहळा, काíतकी एकादशी, चत्री आणि माघी एकादशीनिमित्त वारीच्या काळात येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी ज्या वास्तू अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, त्यांना ‘मठ’ अशी संज्ञा आहे. तसेच या भौतिक रचनेपलीकडे जाऊन, तत्त्वज्ञानाच्या आणि धार्मिक अंगाने विशिष्ट धर्माचरण करणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला ‘फड’ असे म्हटले जाते. पंढरपूरमध्ये असे अनेक मठ आणि फड अस्तित्वात आहेत. त्यांना संस्था आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे मठाधिपती आणि फडकरीही आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्टय़ा मठ, फड आणि दिंडय़ा यांचे महत्त्व आहे. त्यामुळे मठ-फडांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा, ही कल्पना सर्वप्रथम ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. ग. हर्षे यांना सुचली होती. तसा प्रकल्पही त्यांनी हाती घेतला होता. पण, त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. डॉ. हर्षे यांनी सुरू केलेल्या कामाचे तपशील वा.ल. मंजूळ यांना उपलब्ध झाले आणि त्यात मोलाची भर घालून त्यांनी पंढरपूरमधील मठ-फडांचा-दिंड्यांचा इतिहास शब्दबद्ध केला.
पुणेकर संशोधक डॉ. वैशाली लाटकर यांनी ‘आर्किटेक्चरल स्टडीज ऑफ पंढरपूर’ असा संशोधन प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करत आणला आहे. (मार्च २०१७ची बातमी).
डॉ. वैशाली लाटकर या कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट असून त्या या प्रकल्पावर पाच वर्षे काम करीत होत्या. त्या पाच वर्षांत त्यांनी पंढरपूरमधील शेकडो जुन्या वास्तू, मंदिरे, मठ, फड आणि घाट यांचा स्थापत्त्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास केला. पंढरपुरात यादवकाळापासूनच्या वास्तू आढळतात. कित्येक मंदिरे, मठ, वाडे, घाट आणि फड यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. तो जसा लिखित स्वरूपात आढळतो त्यापेक्षाही त्या काळाचे थेट साक्षीदार असणाऱ्या म्हणजे तत्कालीन वास्तूंच्या स्वरूपात आढळतो. वास्तुसंवर्धकतज्ज्ञ या नात्याने काम करताना डॉ. वैशाली लाटकर यांनी पंढरपुरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तूंचा प्रामुख्याने विचार केला. त्यांमध्ये मंदिरे, मठ, फड, जुने वाडे, घाट अशा वास्तूंचा समावेश आहे. त्यांच्या मते, फड ही वास्तू फक्त पंढरपूरमध्येच आढळते. पुराण वाङ्मयात येथील वास्तूंचे खूप संदर्भ आढळतात. ह्या वास्तूंमध्ये अनेक जुन्या वस्तू आणि हस्तलिखिते यांचे जतन केलेले आहे. हे सारे आपल्या सांस्कृतिक वैभवाचे स्रोत आहेत, मात्र ते कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत, असे त्या म्हणतात. त्या वास्तूंचा स्थापत्त्याच्या अंगाने अभ्यास आता झाला आहे.
पंढरपूरचे माहात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
आदि शंकराचार्यानी आठव्या शतकात ‘पाण्डुरंगाष्टक’ रचून- महायोग पीठे तटे भीमरथ्याम्। वरं पुण्डरिकाय दातुंमुनिंद्रै:।। विठ्ठलाला आठव्या शतकात नेले. त्यानंतर संस्कृतमधील ‘स्कंद’ आणि ‘पद्म’ पुराणातील पांडुरंग माहात्म्ये अभ्यासकांसमोर आली. या लोकप्रिय दैवतावर विविध भाषांतून माहात्म्ये लिहिण्याचा नंतर प्रघात पडला. त्यामध्ये आज उपलब्ध छापील हस्तलिखित स्वरूपामधील माहात्म्ये अशी-
१) गोपाळबोधाचे पंढरी माहात्म्य (काळ इ.स. १६५०/१७४०), २) बाळक व्यासकृत पांडुरंग माहात्म्य (कन्नड कवी; काळ मिळालेला नाही), ३) कन्नड कवी गुरुदास रचित पांडुरंग माहात्म्य (काळ इ.स. १६५० च्या सुमारास), ४) अनन्तदेव कृत (धुळ्यात हस्तलिखित, बारा अध्याय; काळ नाही), ५) रुद्रसुतरचित पंढरी माहात्म्य (काळ नाही, २३० ओव्या), ६) प्रल्हादबुवा बडवे विरचित पंढरी माहात्म्य (काळ शके १६४०पूर्वी) ७) तेनाली राम (आंध्रातील विकट कवी; तेलगू भाषेत, (काळ इ.स. १५६५ म्हणजे सर्वात जुने), ८) श्रीधरस्वामी नाझरेकर (मराठीतील विख्यात संतकवी रचना- इ.स. १६९०), ९) लोहदंड ऊर्फ पंढरपूरची कैफियत (मूळचे तमीळ भाषेतील, मद्रासच्या ओरिएंटल इन्स्टिटय़ूटमध्ये मिळाले. मोडी लिपीत लिहिलेले, काळ १८०७), १०) बाल मुकुंद केसरीचे पांडुरंग माहात्म्य (बडोद्याच्या प्राच्य विद्या संस्थेत आहे. काळ नाही.), ११) मराठीतील महिपतिबुवा ताहराबादकर (कांबळे) यांचे शके १६७८ मध्ये रचलेले, १२) संत नामदेवांचे अभंगात्मक पांडुरंग माहात्म्य, १३) दत्तवरदविठ्ठल (पेशवेकालीन कवी, नगर जिल्हा, जयकर ग्रंथालयात हस्तलिखित, काल १७४८-१७९८ इसवी), १४) हरि दीक्षित रचित पांडुरंग माहात्म्य (७ पृष्ठे फक्त उपलब्ध), १५) गिरीधर कवी रचित पंढरी माहात्म्य (८ पृष्ठे, अपूर्ण ग्रंथ), वगैरे.
पंढरपूर हे मराठी लेखक द. मा. मिरासदार आणि उल्लेखनीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचे जन्मस्थळ आहे.
११ नोव्हेंबर १९४७ रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त झाले. साने गुरुजींनी त्यासाठी महात्मा गांधीचा विरोध पत्करून सत्याग्रह केला.
पंढरपूर शहर हे महाराष्ट्राशी लोहमार्गाने व रस्त्याने जोडलेले आहे. पूर्वी येथे मीटरमापी लोहमार्ग होता. नंतर त्यावेळी मालगाडीतून वारकऱ्यांना आणले जाई. पुढे, मिरज-कुर्डुवाडी हा लोहमार्ग परिवर्तित होऊन रुंदमापी झाला. इ.स.२०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर-लोणंद रेल्वे fecocaofereaमार्गासाठी अर्थिक तरतूद केली गेली. प्रलंबित असलेल्या पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाचे कार्य आता सुरू होत आहे. पंढरपूर हे गाव सोलापूरला बसमार्गे जोडलेले आहे.पंढरपूरला जवळपास विमानतळ सोलापूर येथे आहे.
४.http://santeknath.org/palkhi%20sohala.html ५.https://pandharee.wordpress.com/ ६.https://warkari.wordpress.com/
This article uses material from the Wikipedia मराठी article पंढरपूर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.