कोल्हापूर हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी व कर्नाटक बॉर्डरला लागून असल्याने काही भागात कन्नड बोलली जाते. येथील श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, इचलकरंजी जयसिंगपूर कुरुंदवाड नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी इत्यादी प्रमुख ठिकाणे आहेत. कोल्हापूरला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी म्हणूनही ओळखले जाते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला.
?कोल्हापूर महाराष्ट्र • भारत | |
— नगर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ• उंची | ६६.८२ चौ. किमी• ५६९ मी |
जिल्हा | कोल्हापूर जिल्हा |
लोकसंख्या• घनता | ३८,७६,००१ (महाराष्ट्रात ९वा) (२०११)• ५०४/किमी२ |
महापौर | |
कोड• पिन कोड• दूरध्वनी• आरटीओ कोड | • ४१६००१• +०२३१• MH-09 |
संकेतस्थळ: कोल्हापूर महानगरपालिका संकेतस्थळ | |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यांसोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते.
कोल्हापूरमध्ये मिळणारे प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ म्हणजे कोल्हापूरची मिसळ. महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते. उदा. बावडा मिसळ, फडतरे मिसळ, चोरगे मिसळ, हॉटेल साकोली मिसळ, खासबाग मिसळ वगैरे मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात कोल्हापुरातला तांबडा रस्सा (मटणाचे सूप), पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे), मटणाचे लोणचे, खिमा राईस बॉल्स प्रसिद्ध आहेत.
कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीत असलेली राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे. मिरजकर तिकटी, गंगावेस येथे दूध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दूध मिळते. इथले महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. कोल्हापूरची लवंगी मिरची प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्हा (जुना) शाहू महाराजांचा जिल्हा म्हणूनही सर्वपरिचित आहे.
एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडले होते म्हणून देवांच्या विनंतीवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते. आश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावे आहेत ती तशीच पुढेही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते.
कोल्हापूरचा पिवळाधमक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. सध्या भारतातल्या बहुतेक हॉटेलांत व्हेज कोल्हापुरी, कोल्हापुरी चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात; पण कोल्हापुरी म्हणजे तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचे. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो. हा रस्सा बाकी रश्श्यांप्रमाणे किंवा ग्रेव्हीप्रमाणे टिकाऊ नाही. तांबडा रस्सा तयार करताना कोल्हापुरी चटणी वापरावी लागते.
कोल्हापूरचा अजून एक प्रकार म्हणजे दावणगिरी लोणी डोसा. हा डोसा बऱ्याच ठिकाणी मिळतो. भरपूर लोणी आणि जाळीदारपणा ही त्याची खासियत. कोल्हापुरात मांसाहारी, शाकाहारी स्वयंपाकाची घराघरातली पद्धत जवळपास सारखीच असते. पांढरा तांबडा रस्सा, सुके मटण, खिमा हे प्रकार आख्ख्या कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्यांचीही (चपात्या) एक खासियत आहे. तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली ही गरम गरम चपाती अप्रतिम लागते. इथली आणखी एक खासियत म्हणजे ‘पोकळा’ नावाची पालेभाजी. तव्यावर केलेली ही भाजी, भाकरी आणि खर्डा यांना तोड नाही. याबरोबरच दूधकट्ट्यावर मिळणारे आणि ग्राहकासमोरच काढण्यात येणारे म्हशीचे धारोष्ण दूध. थेट पेल्यातच धार काढायची व पेला तोंडाला लावायचा! आणखी एक अफलातून प्रकार म्हणजे, ताज्या दुधात सोडा घालून प्यायची पद्धत अशा पद्धतीने दुधाचे निर्जंतुकीकरण होते.
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे अशा १०८ शक्तिपीठांची सूची तयार केली आहे. यामध्ये जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे, त्या करवीर क्षेत्राच्या महालक्ष्मीचे विशेष महत्त्व आहे. श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते. यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते.
क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रूपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे. या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते की श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात.
महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल की हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच इसवी सन ६०० ते ७०० काळातील असावे. मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रत्नांपासून बनवली आहे. हीसुद्धा जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते. महालक्ष्मीची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे. कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे. यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते.
इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२५ ते ५५० पर्यंत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स. ५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स. १२१० मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७ मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहेत्.
१ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले होते.
२ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे.
३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला.
४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली.
५ संभाजीराजास पकडणाऱ्या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली.
६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी या भूमीत घडला.
शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे झाले. कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या. पुढे जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटिश अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात विलीन झाले.
कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असल्यामुळे या संस्थानसाठी स्वतःची एक वेगळ्या प्रकारची व पर्यावरणपूर्वक सिंचन व्यवस्था वापरात होती. आज ही सिंचन व्यवस्था शहराच्या जुन्या भागात चालू असून त्याचा वापर खूप कमी प्रमाणात चालू आहे. या सिंचन व्यवस्थेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कात्यायनी देवाच्या मंदिरात कुंड आहे तीतून नेसर्गिक पाण्याच्य झऱ्याला सुरुवात होते, तीतून तो कळंबा तलाव येथे आणला. तलावाचा व्यास मोठा असल्यामुळे तेथील पाण्याचा वापर जवळपासच्या शेतीसाठी केला जात होता व अजूनही होतो. तिथे महाराजांनी बंधारा बांधला जो जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर ठेवला, जेणेकरून त्या पाण्यामधे पाला पाचोळा किंवा इतर काही जाऊन दूषित होऊ नये. कळंब तलावातील पाणी त्या बंधाऱ्याद्वारे पाण्याचा खजिना या ठिकाणी आणले. यासाठी भौगोलिक परीस्थिती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींचा विचार केला होता. पाण्याचा खजिना या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पूर्ण शहराला पुरवले जात होते.
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर असून ते मुंबईपासून ३७६ किमी, पुण्यापासून २३२ किमी, सांगली पासून ५० किमी, गोव्यापासून २२८ किमी आणि बंगलोरपासून ६६५ किमी अंतरावर आहे. कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फूट) इतकी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ इथून जातो.
कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. कोल्हापुराला तलावाचे शहर म्हणतात. कोल्हापुरात पूर्वी फिरंगाई, वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव अशी तळी होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. यातील फक्त रंकाळा आणि कोटीतीर्थ हे तलाव सध्या अस्तित्वात आहेत. १७९२ साली कात्यायनीहून नळ घालून शहरात पाणी आणून ते शहरातील निरनिराळया ठिकाणच्या ३२ विहिरींमध्ये सोडले गेले. १३० वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कळंबा तलाव बांधण्यात आला. ओघळणारे पावसाचे पाणी कळंबा गावाजवळ दगड मातीचा बंधारा घालून अडवण्यात आले. शहरापेक्षा उंच ठिकाणी हा तलाव असल्याने त्यातील पाणी नैसर्गिक उताराच्या साहाय्याने शहरात नळावाटे आणले.
[१] Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात कोल्हापूरने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. कोणतेही नव्याने होणारे बदल योग्य प्रकारे स्वीकारून आपल्या योग्य परंपरा पुढे ठेवण्याची कला कोल्हापूरला योग्य प्रकारे साधली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे मोलाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो. येथे गूळ संशोधन केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर, स्वाभिमानी इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी घेतली असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ४०० कारखाने इथे आहेत. कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे.
कोल्हापूर शहर रस्ते व रेल्वे मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कोल्हापुराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस असलेल्या उजळाईवाडी या ठिकाणी आहे. सध्या येथून विमानसेवा उपलब्ध आहे.
कोल्हापूर शहरात खालील काही नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. येथे दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामध्ये सायबर (छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन आणि रिसर्च, कोल्हापूर) गेल्या ४० वर्षापासून प्रसिद्ध आहे. ही एकमेव स्वायत्त संस्था आहे ज्याला NAAC A+ मिळाले आहे आणि ह्या ठिकाणी संशोधनपण होते. पर्यावरण व्यवस्थापन या विषयामध्ये एम.बी.ए. व पर्यावरण व सुरक्षा या विषयामध्ये एम.एस्सी. असे नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत. इ.स. १९६२मध्ये स्थापन झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.
कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र सरकारने शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील गारगोटी येथे परिपूर्ण शिक्षणाची सोय आहे. महावीर कॉलेज, श्रीमती ताराराणी ट्रेनिंग कॉलेज, राजाराम कॉलेज, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर हे देखील येथील अग्रगण्य शिक्षण केंद्र आहे.
कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती झाली. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी "जयप्रभा स्टुडिओ"ची निर्मिती केली. तसेच रंकाळा तलावाच्या पिछाडीस शालिनी सिने स्टोन हा स्टुडिओ होता. सध्या फक्त कोल्हापूर चित्रनगरी हेच शूटिंगसाठी ठिकाण उपलब्ध आहे.
मर्दानी कुस्ती हा कोल्हापुरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे स्वतः एक चांगले पैलवान होते. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या जातात. येथील राजे शाहू महाराज हे एक पैलवान होते जेव्हा ते युरोप सहलीला गेले होते त्यावेळी त्यांनी रोम येथील प्रसिद्ध ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात उभारायचे ठरवले आणि त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान उभारले. खासबाग हे भारतातील एकमेव कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ ६०,००० लोक पाहू शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे. एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :-
१. कसबा बावडा कुस्ती केंद्र
२. खासबाग
३. नवी मोतीबाग तालीम
४. पंत बावडेकर आखाडा
५. मोतीबाग तालीम
६. शाहू आखाडा, चंबूखडी
७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड
८. शाहूपुरी आखाडा
९. शाहू विजयी गंगावेस
१०.कालाईमाम तालीम.
कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत. चप्पल पूर्णपणे चामड्यापासून बनते. कोल्हापुरी चपलाला GI मानांकन मिळाले. (२०१९) कोल्हापुरी साज, चपलाहार इत्यादी दागिने प्रसिद्ध आहेत.
कोल्हापूर पासून २२ किमी अंतरावर श्री क्षेत्र जोतीबा (वाडीरत्नागिरी) हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ श्री जोतीबाच्या दर्शनाला येतात. जोतिबा चैत्र यात्रेला प्रसिद्ध अशी गर्दी असते आणि मंदिरावर गुलालाचा वर्षाव असतो.
ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तुतः साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच. छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी (खासबाग मैदान), गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी. आता उन्हाळ्याच्या कालावधीत शाळा, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर पर्यटनासाठी सहकुटुंब बाहेर पडण्याचा ट्रेंड रुळला आहे. याच काळात पर्यटकांना कोल्हापूर हे डेस्टिनेशनही खुणावते आहे. शहर परिसरातील, जिल्ह्यातील निसर्ग सर्वांना मोहात पाडतो. श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पंचगंगा नदीघाट ही नेहमीची ठिकाणे. इथल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला रंकाळा तलाव. तलावाच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर, एका बाजूला संध्यामठ, पश्चिमेस असलेली शालिनी पॅलेसची वास्तू म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. मग कलासक्त पर्यटकांना खुणावतात काही अनोखी ठिकाणे. राजारामपुरीतील मांडरे चित्रदालन, ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टे पहायलाच हवेत. कोल्हापुरातून बाहेर पडलं की जोतिबाचे तीर्थक्षेत्र. डोंगरावर भिरभिरणारा वारा आणि सुखद गारवा देणारा किल्ले पन्हाळा. ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग हेही पर्यटकांना खुणावतात.
निसर्ग पर्यटनाला बाहेर पडलं तर मग कोल्हापूरपासून जवळचे गव्यांसाठी आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण आहे. राधानगरी, चांदोली, आंबा, देवराई, मानोली, येळवण जुगाई, उदगिरी, दाजीपूर, बोरबेट, वाकीघोल, पेरणोलीचा सडा असे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत फिरता येते. पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड हे किल्ले इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत स्फुल्लिंग चेतवतात.
खासबाग मैदान :
कुस्ती म्हटले की कोल्हापूर ही संज्ञाच ठरलेली. खासबाग मैदान म्हणजे देशोदेशीच्या मल्लांच्या शिक्षणाचे माहेरघर, राजर्षि शाहू महाराजांनी दिलेली अनमोल भेट. 20 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतील इतके प्रशस्त मैदान. कुस्ती परंपरेत अजूनही या मैदानाला मानाचे स्थान आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बसेसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते राजर्षि शाहू जन्मस्थळ- लक्ष्मीविलास पॅलेस रष्टा राजा म्हणून ज्या राजाकडे पाहिजे जाते ते राजर्षि शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस, आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून शासन विकसित करीत आहे. शाहूकालिन कागदपत्रे, आरक्षणाचा जाहीरनामा, महाराजांच्या वापरातील वस्तू याठिकाणी आहेत. कोल्हापूर बसस्थानकापासून 3 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बस व रिक्षानेही जाता येते. कणेरी येथील सिद्धगिरी मठ करवीर तालुक्यात कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असणारे हॉस्पिटल येथे आहे. प्राचिन विद्वानांची शिल्पे आहेत. कोल्हापूर बसस्थानकातून 15 कि.मी. व 40 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी.ची सुविधा आहे. तसेच बस व अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे. दत्ताची वाडी अर्थात नृसिंहवाडी शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्री दत्ताचे 500 ते 800 वर्षांची परंपरा असलेले पुरातन व प्रशस्त देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते. श्री नृसिंह सरस्वती यांचे याठिकाणी 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते. त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. देशभरातून भाविक दत्त पादुकांच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रापर्यंत आहेत. कोल्हापूरपासून 55 ते 60 कि. मी. अंतर असून तेथपर्यंत जाण्यासाठी 1.30 ते 2 तास असा कालावधी लागतो. नजिकच्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी राहण्याची व जेवणाची स्वस्त दरात सोय होऊ शकते. याठिकाणी कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज आदी स्थानकांपासून बसची सुविधा उपलब्ध आहे. जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ही या ठिकाणाने दिलेली देणगी आहे. कमालीची स्वच्छता व निसर्ग सौंदर्य आणि भगवान श्री बाहुबलींची 28 फुटी संगमरवरी देखणी आणि भव्य मूर्ती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. सभोवताली 24 तीर्थकरांची लहान-लहान मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी याठिकाणी महामस्तकाभिषेक होतो. या ठिकाणी दुर्गामातेचे पठार व त्यावर दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे. जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संग्रहालय, कारंजे, रंगसंगतीचा नाविन्यपूर्ण अविष्कार, उद्यान, धबधबे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात. श्री आदिश्वर स्वामींची विशाल प्रतिमा परिवारासह आहे. श्री क्षेत्र बाहुबली हे आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचा परिसर आहे. कोल्हापूरपासून 27 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सुमारे एक तास लागतो. कोल्हापूर, हातकणंगले स्थानकापासून बसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते.
शाहू तलाव व पुरातन शिव मंदिर आणि जागृत हनुमान मंदिर (अतिग्रे) ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर. श्री व्यंकटेश मंदिर, रूई,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड (?) ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक प्रेक्षनिय स्थळ आहे. पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूरपासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटीपासून 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढऱ्याी रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.हा किल्ला रक्षन करणाऱ्याठ 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.शिवाजी महाराजांची आठवण करुण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे, सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातून सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिद्धी जोहारने त्यांचा पाठलाग केला, तेव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचू शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातीर्थी पडले व मरण पावले. किल्ल्यामध्ये अशाच प्रकारची आणखी एक इमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात, इसवी सन १५०० मध्ये ही इमारत इब्राहिम अदिल-शाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथून फरार झाले.
येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आश्चर्याची गोष्ट नाही आहे की, त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपल लहानपण घालवले, पन्हाळा हा असा गड आहे की, जेथे शिवाजी महाराजांनी 500 रहिवासी होते. ब्रिटीशांच्या काळात 1782 ते 1827 पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य आहे. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदिर, सोमेश्वर मंदिर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत.हा किल्ला कोल्हापूरच्या उत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. ऊंचीवर येतो.युद्धकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा पन्हाळा गड आहे, त्याच्यातील एक जो महत्त्वाची भुमिका निभावतो तो पश्चिम घाट आहे, जो मोठा व ईतिहासकालीन आहे. शिलहारा मुख्य राज्यकर्ता भोज II (1178 – 1209) यांच्या नंतर ही कारकीर्द यादवांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, बिदारचे बहामनिस; महमुद गवान जे एक हुशार सेनापती होते त्यांनी छावनीपासुन दुर सैन्य ठेवुन पावसाळ्याच्या कालावधीत 1469 मध्ये ह्या गडावर हल्ला केला. पुढे जाऊन 16 व्या शतकात हा किल्ला बिजापुर ह्यांनी काबीज केला. अदिल शाहा यांनी ह्या गडाचे काही चबुतरे व दरवाजे करून घेतले.त्यानंतर 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला, व पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत गडाच्या दुरुस्तीचे काम थांबवले.
1701 मध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला, आणि येथुन मग मुघल बादशाह यांच्याकडुन ईंग्रज राज्यकर्ता, सर विल्ल्यमनरिस यांच्या हाती हा गड सुफुर्त करण्यात आला. काही महिने पंत अमात्य रामचंद्र ह्यांच्या सेनांनी हा किल्ला काबीज केला, ज्यांचे स्पष्टीकरण स्वराज्य दंतपुस्तकांमध्ये आहे. 1782 मध्ये ह्याचा राज्यकारभार कोल्हापूर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला. 1844 मध्ये स्थायिक राज्यकर्त्यांकडून ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला.गडाच्या मुख्यालयापासून 7 कि.मी. पेक्षा जास्त त्रिकोणी लांबीपर्यंत ह्या गडाची लांबी वाढवण्यात आली. ऊतरण असलेल्या मोठ्या भींती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या, ह्या भिंतीमध्ये पाहणीकरिता काही ठिकाणी गोल रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. राहिलेल्या भागामध्ये 5 – 9 मी. मोठी तटबंदी, लांबीचे मोठे गोल बुरूज बांधले. पुर्वेकडील दरवाजाला चोर दरवाजा म्हणतात, ज्याच्यामधून गडामध्ये येण्यास मार्ग आहे, ह्याचा नाश ब्रिटिशांनी केला.
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला टाकिसारखे हिरवे आणि पांढरे दरगे पहायला मिळतात. तीन दरवजापर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ 400 मी. जातो.अदिलशाही पद्धतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण उदाहरण आहे. प्रवेशद्वारातील त्रिज्या खंड वर्तुळाकार आहे. नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडाच्या रेषेंची उपखंडे आहेत.ह्याच्या वरती गणपती व ईतर देवांच्या मुर्त्या आहेत.बाजूच्या जागेमध्ये क्लिष्टपणे कोरीव भाग एकमेकांशी दुव्याने जोडलेली मार्याची तटावरील भिंत आहे आणि सुधारीत पाने व फांद्या असलेली नक्षी आहे. सर्वात समोरची मार्यातची तटावरील भिंत वरती दिसते. पश्चिम बाजुच्या आंगणाच्या बाहेरील बाजूला एक सुरक्षा खोली आहे जिच्यामध्ये त्रिकोणी कडा असलेले खांब आहेत. दोनभिंतीच्या मधल्या भागांमध्ये बाहेरच्या बाजुने प्रवेश द्वार आहे. इब्राहीम अदिल शहा यांची आतील त्रिकोणी जागांमध्ये इराणची कोरलेली नाणी आहेत. पश्चिमेला थोड्या अंतरावर तीन दरवजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे.पन्हाळा टेकडीच्या मध्यावरती बालेकिल्ला येत नाही तोपर्यंत ऊत्तरेला जवळजवळ 1 कि.मी. पर्यंत हा मार्ग सलग्न आहे. हा किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे, आत्ता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे व काही पडला आहे. येथे तीन मोठ्या चौकोनी ग्यालरी आहेत, ह्यांच्यामध्ये संपूर्ण भूदलाची संरक्षण करण्याची क्षमता आहे. येथे सैनिक मोकळेणाने उभे राहू शकतात. मोठ्या, काही 40m by 10mचे 16 रिकाम्या जागा आहेत ज्या छताने झाकल्या आहेत ज्याच्यामध्ये वरती 8 मी. पर्यंत चौकोनी जागा आहेत.काही पायऱ्यांवरून बाहेरील छतावर जाता येते.
साचा:विश्वकोशीय परिच्छेद हवा
ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस लोहमार्गाने मुंबई, नागपूर, तिरुपती,सांगली, नांदेड आणि बंगळूर गोवा अक्कलकोट छत्रपती संभाजीनगर पुणे बेळगाव नाशिक अहमदनगर सातारा बारामती मिरज जत बीड सोलापूर लातूर कडे जाणाऱ्या गाड्या दररोज आहेत.
कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते. कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबरच्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से.च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते.
कोल्हापूर साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 31(88) | 33(91) | 36(97) | 37(99) | 33(91) | 29(84) | 27(81) | 26(79) | 28(82) | 30(86) | 29(84) | 29(84) | 30.7(87.2) |
सरासरी किमान °से (°फॅ) | 15(59) | 17(63) | 20(68) | 22(72) | 22(72) | 22(72) | 22(72) | 21(70) | 21(70) | 21(70) | 17(63) | 15(59) | 19.6(67.5) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 4.3(0.17) | 0.5(0.02) | 6.1(0.24) | 26.9(1.06) | 46.2(1.82) | 140(5.51) | 338.3(13.32) | 181.6(7.15) | 101.6(4.00) | 103.6(4.08) | 40.6(1.60) | 5.6(0.22) | 995.9(39.21) |
स्रोत: Government of Maharashtra |
This article uses material from the Wikipedia मराठी article कोल्हापूर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.