कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता म्हणून तो सूर्यपुत्र आणि कुंतीपुत्र या नावानेही ओळखला जातो.
कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राज्य दिले होते. राधा नावाच्या स्त्रीने त्याला लहानाचे मोठे केल्यामुळे तो राधेय ह्या नावाने ओळखला जात होता. तो आपल्या दानशूर पणा बद्दलसुद्धा प्रसिद्ध होता.
कुंतीभोज राजाची कन्या कुंती हिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषिंनी तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला, आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती.
कुमारी माता बनलेल्या कुंतीने घाबरून एका टोपलीत घालून त्या मुलाला गंगा नदीत सोडून दिले. अधिरथ नावाच्या हस्तिनापुरला सारथी म्हणून काम करणाऱ्या सूताला (रथचालकाला) ती टोपली मिळाली. त्याने आणि त्याची पत्नी राधा यांनी त्या मुलाचे पालन केले. त्यांनी त्या मुलाचे नाव "वसुसेन" ठेवले, कुंडलांमुळे तो "कर्ण" नावाने प्रसिद्ध झाला. राधेचा पुत्र म्हणून तो "राधेय" नावानेही ओळखला जात असे.
अधिरथ आणि राधा यांना शोण नावाचाही एक मुलगा होता.
अधिरथ हा कर्ण आणि शोण ह्यांना घेऊन हस्तिनापुरास आला आणि कृपाचार्यांकडे त्याचे शिक्षण सुरू झाले.
जेव्हा कौरव आणि पांडवांचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांच्यातील सर्वोत्कॄष्ट योद्धा ठरविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये अर्जुनाने सर्व युद्धप्रकारांमध्ये आपले प्रावीण्य दाखविले. हे बघून चिडलेल्या कर्णाने आपले अर्जुनापेक्षा वरचढ कौशल्य सर्वांना दाखविले, आणि स्पर्धेचा खरा जेता ठरविण्यासाठी अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले.
त्या काळातील नियमांनुसार केवळ समान अथवा तुल्यबळ कूळ असलेल्या योद्ध्यांमध्ये द्वंद्व होऊ शकत असे. या नियमाचा आधार घेऊन कृपाचार्यांनी कर्णाला आपले कूळ जाहीर करावयास सांगितले. हे ऐकून दुर्योधनाने कर्णाला राजपुत्र असलेल्या अर्जुनाच्या तुल्यबळ करण्यासाठी अंग देशाचा राज्याभिषेक केला. दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीची ही सुरुवात मानली जाते.
कर्णाला दोन बायका होत्या, पहिली वृषाली, ही दुर्योधनाचा सारथी सत्यसेन याची बहीण होती. दुसरी सुप्रिया (ऊर्फ उरुवी) ही पुकेय देशाची राजकन्या व दुर्योधनाच्या पत्नींची- भानुमती आणि मयुरी आणि कर्णाची पाचवी पत्नी वर्षाची मैत्रीण होती.
कर्णाची सहा मुले :- वृषसेन, सु़षेण (हे दोघेही युद्धात मारले गेले) आणि तिसरा वृषकेतू, याचा अर्जुनाने सांभाळ केला..शिवाय सत्यसेन, चित्रसेन (?), शत्रुंजय आणि विपथ. वर्षा सोबत त्याला रत्नमला नावाची एक मुलगी झाली आणि गीता सोबत त्याला श्रुतसेन नावाचा एक मुलगा झाला.
कर्णाचे भाऊ (राधा आणि अधिरथ यांची दोन मुले) : शोण आणि द्रूम .
द्रुपद राजाची कन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरासाठी त्याने धनुर्विद्येचा कठीण पण लावला होता. हा पण जिंकण्यासाठी दुर्योधन कर्णास घेऊन पांचाल राज्यात गेला. (पांडवांच्या वारणावतातील मृत्यूनंतर तो पण पूर्ण करू शकणारा कर्ण हा एकमेव योद्धा मानला जात होता) स्वयंवराच्या वेळी जेव्हा कर्ण पण पूर्ण करण्यासाठी पुढे आला तेव्हा द्रौपदीने "मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही" असे म्हणून त्याचा अपमान केला.
नंतर ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या अर्जुनाने तो पण जिंकला. ह्या घटनेनंतर पांडवांबद्दलचे (विशेषतः अर्जुनाबद्दलचे) कर्णाचे वैर आणखीनच वाढले.
पांडवांनी इंद्रप्रस्थात केलेल्या राजसूय यज्ञासाठी हस्तिनापुराहून गेलेल्या राजांमध्ये कर्णाचा समावेश होता. मयसभेत झालेल्या दुर्योधनाच्या अपमानाचा कर्ण साक्षीदार होता..
या मयसभेत कौरवांचा युवराज गदावीर दुर्योधन याचा त्या मायावी महालातील जमिनीसारख्या दिसणाऱ्या तळ्यात पाय पडला व तो तळ्यात पडला, त्याचा मुकुट नकळत तळ्याच्या तळला गेला. त्यावर द्रौपदीसकट सर्व स्त्रिया हसल्या व त्यांनी अंध पित्याचे पुत्रही अंधेच असतात काय असे खोचक उद्गार काढले. याचा दुर्योधनाला खूप राग आला व तो म्हणाला योग्य वेळ येताच पित्याचे पुत्र किती डोळस असतात ते तुला दाखवून देईन. हा त्याचा अपमान महाभारताच्या युद्धाला कारणीभूत झाला.
पांडवांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल मत्सरग्रस्त होऊन दुर्योधनाने आपला मामा शकुनी ह्याच्या सल्ल्याप्रमाणे युधिष्ठिराला विष्णूजित यज्ञाच्या निमित्ताने द्यूत खेळण्याचे आमंत्रण दिले. ह्या द्यूतात सर्व राज्य गमावलेल्या युधिष्ठिराने आपले बंधू, आपण स्वतः आणि अखेरीस आपली पत्नी द्रौपदी ह्यांना पणावर लावले.
हरलेल्या द्रौपदीला निर्वस्त्र करण्याची दुर्योधनाने आज्ञा दिली
वनवासात असलेल्या पांडवांना आपल्या वैभवाचे दर्शन करवण्यासाठी दुर्योधनाने आपल्या दासदासींसह पांडवांच्या पर्णकुटीजवळ असलेल्या तलावात जलक्रीडेसाठी जायचे ठरवले. तिथे गेल्यावार दुर्योधननी येका गंधर्व राजकुमारिशी जबरदस्ती करण्याचा प्रयात्न केला.हिच स्थिती राजकुमारी ने भावाला आनी वाडिलान्नाना सांगिताली.तर आंध्रवाणी दुर्योधनला पाकडुन नेले.त्यावेळी दुर्योधन, दुशासन आणि कर्ण मधिरात होते.कर्ण आणि दुशासन मधिरा मधुन बहेर येनार . अर्जुनाने युधिष्ठिराच्या आज्ञेवरून युद्धात चित्रसेनाचा पराभव करून दुर्योधनास मुक्त केले.
राजसूय यज्ञासाठी चार पांडवांनी एकेक दिशेला जाऊन चार वेळा दिग्विजय केला. त्यामुळे चिडून, आणि चित्रसेनाकडून झालेल्या अपमानकारक पराभवानंतर आपले शौर्य दाखविण्यासाठी कर्णाने हस्तिनापुराच्या सैन्याचा सेनापती बनून सर्व आर्यावर्तातील (चारी दिशांची) राज्ये जिंकली.
कृष्णाबद्दल असलेल्या आदराचे प्रतीक म्हणून कर्णाने त्याच्या मथुरा आणि द्वारका राज्यांवर ह्या दिग्विजयात चाल केली नाही.
दिग्विजयानंतर दानधर्माबाबत प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली, की त्याच्या दारातून एकही याचक परत जाणार नाही. आपला मुलगा अर्जुन ह्याच्या रक्षणासाठी इंद्राने एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच-कुंडलांचे दान मागितले. कवच-कुंडलांमुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत, हे माहीत असूनही कर्णाने आपली कवच-कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केली. त्याच्या ह्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखे केले, आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक अमोघ शक्ती (वैजयंती अस्त्र) कर्णाला दिली.
कवच-कुंडलांचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रह्मास्त्रप्राप्ती करण्याचे ठरवले. द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे गुरू असलेल्या परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवले.
परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला, आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली. परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना, एका भुंग्याने त्याची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या, परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही, हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कूळ विचारले. सत्य कळताच त्यांनी कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही.
ह्याच काळात शिकारीच्या वेळी, एका गरीब ब्राह्मणाच्या, चिखलात अडकलेल्या गायीची हत्या कर्णाच्या हातून घडली. त्याने कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याच्या रथाचे चाक असेच जमिनीत अडकेल.
वनवास आणि अज्ञातवास भोगून पांडवांनी आपले राज्य परत मागण्यासाठी दूत म्हणून कृष्णाला हस्तिनापुरास पाठविले. दुर्योधनाने जेव्हा त्याची मागणी नाकारली, तेव्हा परत जाताना कृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले, आणि पांडवांकडे चलण्याची विनंती केली. जरी कुंतीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणून कर्ण पांडवांच्या संपूर्ण राज्य आणि संपत्तीचा स्वामी झाला असता, तरीपण त्याने दुर्योधनाच्या मैत्रीस स्मरून युद्धकालात कौरवांची बाजू सोडून जाण्यास नकार दिला.
महायुद्धाच्या पहिल्या दिवशी कौरवांतर्फे भीष्मांना सेनापतीपद देण्यात आले. त्यांनी विविध सेनाप्रमुख नेमताना कर्णाचा "सूतपुत्र, कवच-कुंडले नसल्याने शापित" आणि अर्धरथी, म्हणून अपमान केला. हा अपमान सहन न होऊन कर्णाने भीष्म जिवंत असेपर्यंत रणभूमीवर न उतरण्याची प्रतिज्ञा केली.
युद्धाच्या १०व्या दिवशी भीष्म शरपंजरी पडले असता, भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून त्यांनी कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगितले, आणि पांडवांच्या (व धर्माच्या) बाजूने लढण्याचा सल्ला दिला. परंतु कर्णाने परत एकदा मित्रकर्तव्याला जागण्याचे ठरविले.
त्याच दिवशी कुंतीने स्वतः येऊन कर्णाची भेट घेतली, आणि त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले.
दुसऱ्या दिवशीच्या युद्धात कर्णाने प्रचंड पराक्रम गाजवला. सेनापती झालेल्या द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात तो इतर योद्ध्यांबरोबर सर्वात आतील कड्यात होता. चक्रव्यूह तोडून आत आलेल्या अभिमन्यूवर कर्ण, द्रोणाचार्य, जयद्रथ, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि लक्ष्मण ह्या ६ योद्ध्यांनी एकदम हल्ला केला. त्यानंतर दुर्योधनपुत्र लक्ष्मणाशी झालेल्या युद्धात अभिमन्यूचा मृत्यू झाला.
युद्धाच्या १५ व्या दिवशी शस्त्र खाली ठेवलेल्या द्रोणाचार्यांचा धृष्टद्युम्नाकडून शिरच्छेद झाल्याने चिडलेल्या कौरवांकडून रात्रयुद्धाला प्रारंभ झाला. त्या युद्धात भीमाचा पुत्र घटोत्कच याने कौरवांकडून लढणाऱ्या दोन राक्षसराजांचा वध केला. तेव्हा घटोत्कचाकडून कौरवसेनेचा पराभव होऊ नये म्हणून कर्णाने इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून त्याचा वध केला.
त्यानंतर दुर्योधनाने कर्णाला कौरवसेनेचा सेनापती म्हणून अभिषेक केला. कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला, परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले.
युद्धाच्या १७ व्या दिवशी कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले. परंतु, अखेरीस परशुरामाने दिलेल्या शापामुळे कर्णाच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले, आणि त्याचा रथ जागेवर स्थिरावला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला. निशःस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला, परंतु द्रौपदी-वस्त्रहरण आणि अभिमन्यूच्या मृत्यूप्रसंगीच्या कर्णाच्या सहभागाची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली, आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले. स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली, परंतु परशुरामांच्या शापाप्रमाणे त्याला मंत्रांचे स्मरण झाले नाही, आणि अर्जुनाचा आंजलिक बाण त्याच्या कंठात घुसला.
युद्धानंतर कृष्णाने युधिष्ठिराला कर्णाच्या आणि पांडवांच्या नात्याबद्दल सांगितले, त्यानंतर युधिष्ठिराने त्याची आई तमाम स्त्रियांना शाप दिला की आजपासून स्त्री आपल्याला माहीत असलेली कोणतीही गोष्ट लपवू शकणार नाही. युधिष्ठिराने इतर नातेवाइकांबरोबर कर्णाचे अंत्यसंस्कार केले.
पहिल्यापासून कर्ण दानधर्म करीत असे. परंतु इंद्राला दिलेल्या कवच-कुंडलांच्या दानामुळे "दानवीर कर्ण" म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. पाच दिशा जिंकणारा तो एकमेव दानवीर होता.
द्रोणाचार्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये कर्णाने आपल्या युद्धनैपुण्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेचा खरा विजेता ठरविण्यासाठी ठेवलेला पण पूर्ण करू शकणारे अर्जुन आणि कर्ण हे केवळ दोघे धनुर्धारी आर्यावर्तात आहेत असे मानले जाई. पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञासाठी एकेका दिशेचा दिग्विजय केला, त्यानंतर कर्णाने एकट्याने कौरवसेना घेऊन सर्व आर्यावर्तात दिग्विजय केला. भीष्मांनी जरी त्याचा अपमान केला असला, तरी त्यांनी कर्णाकडून त्याच्या बंधूंचा वध होऊ नये म्हणून, आणि त्यांच्या पांडवांवरील प्रेमामुळे त्यास युद्धामधून बाहेर ठेवण्यासाठी त्याला स्वतः शरपंजरी पडले असताना तसा सल्ला दिला.
महाभारतातील सर्वोत्कॄष्ट योद्धा म्हणून अर्जुनाचा लौकिक असला, तरी ह्या सर्व गोष्टींवरून, आणि अर्जुनाशी झालेल्या त्याच्या युद्धावरून ते दोघे तुल्यबळ योद्धे होते हे सिद्ध होते. जरी युद्धात अर्जुनाने कर्णाचा फसवणुकीने वध केला. मृत्युच्या वेळी कर्ण हा शापित आणि कवच-कुंडलविरहित आणि निशस्ञ होता.
This article uses material from the Wikipedia मराठी article कर्ण (महाभारत), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.