वेताळ टेकडी ही पुणे शहरातील तील एक महत्त्वाचा डोंगर आहे.
पुण्याच्या पश्चिमेला वसलेला ही टेकडी जैवविविधता आणि सौंदर्याच्या दृष्टीने पुणेकरांच्या आकर्षणाचे स्थान बनली आहे. पुणे शहराचा सर्वोच्च बिंदू याच टेकडीवर समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर आहे. वेताळ टेकडीचा विस्तार सुमारे साडेदहा चौरस किमी क्षेत्रात आहे. वेताळ टेकडी हे नाव त्या टेकडीवर असलेल्या वेताळबाबाच्या देवळामुळे आले आहे. या देवळाजवळच वन विभागाने सद्ध्या एक उंच निरिक्षण मनोरा उभारला आहे. एस.एन.डी.टी,ला कॉ्लेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गोखले नगर, सिंबायोसीस, पंचवटी, पत्रकार नगर या भागांमधे टेकडीचा विस्तार आहे.
वेताळ टेकडीवरील हवामान हे पुण्यातील हवामानासारखेच आहे.
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन महत्त्वाचे ऋतू इथे अनुभवायाला मिळतात.
वेताळ टेकडीवरील वन हे शुष्क पानझडी प्रकारचे आहे. या वनामधे आढळ्णारे वृक्ष मुख्यतः उंचीने छोटे आहेत. तिथे गणेर, मोई आणि सालई या स्थानिक वृक्षांचा समावेश असलेला एक गट आहे. या वृक्षांच्या सोबतच मेडशिगी, हिवर, पांढरुख, बारतोंडी, पाचुंदा, पळस, पांगारा, सावर, वारस ही झाडेसुद्धा वेताळ टेकडीवर आहेत. याशिवाय काही परदेशी वृक्ष वन विभागाने इथे लावले आहेत. या वृक्षांमध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, निलगिरी, Australian acacia यांचा समावेश होतो. ही लागवड प्रामुख्याने 'महाराष्ट्र वानिकी प्रकल्प' व 'हरित पुणे प्रकल्प' या अंतर्गत करण्यात आली आहे. पण या परदेशी वृक्षांच्या अनियंत्रित वाढीमुळे टेकडीवर असलेले स्थानिक वृक्ष हळुहळू कमी होत आहेत. वृक्षांसोबतच वेताळ टेकडीवर छोट्या वर्षायु वनस्पतींचे प्रमाणही लक्षणीय आहे. पावसाळ्यानंतर टेकडीवर अनेक सुंदर पुष्पवंत वनस्पती पाहता येतात. यामध्ये एफिमेरल्स किंवा अशा अल्पजीवी वनस्पतींसुद्धा खूप प्रमाणात आहेत.
बांडगूळ, स्ट्रायगा सारख्या परजीवी वनस्पतीदेखील इथे वाढताना आपण पाहू शकतो.
या परिसरातील वनस्पतींचा शास्त्रीय धांडोळा घेण्याचे महत्त्वाचे काम आघारकर संशोधन संस्थेच्या (Agharkar Research Institute) श्री व्ही. एन. जोशी आणि डॉ मोहन कुंभोजकर यांनी केले. १९९७ साली त्यांनी वेताळ टेकडीवरून फुलणाऱ्या वनस्पतींच्या १०१ कुळांमधील सुमारे ४१६ जातींची यादी प्रकाशित केली. या यादीमध्ये दोन प्रकारच्या नेच्यांचाही समावेश आहे.
मानवी आक्रमणामुळे वेताळ टेकडीच्या जैवविविधतेची गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शहराची वाढ, निरनिराळ्या कारणांसाठी वृक्षतोड, वन विभागातर्फे लावण्यात आलेले परदेशी वृक्ष या कारणांमुळे वेताळ टेकडीच्या जैवविविधतेत बरेच बदल होत आहेत. वन विभागाने लावलेले परदेशी वृक्ष इथल्या नैसर्गिक परिसंस्थेंचे संतुलन बिघडवत आहेत.
बालभारती ते पौड फाटा हा नवा प्रस्तावित रस्ता वेताळ टेकडीवरूनच जाणार आहे. नळ स्टॉप चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा मार्ग योजला जात आहे. त्यामुळे टेकडीवरील अनेक वृक्ष तोडले जाणार आहेत. सुमारे दोन कि.मी.चा हा रस्ता झाल्यास वेताळ टेकडीचे निसर्गसौंदर्य तर नष्ट होइलच पण इथल्या पर्यावरणालासुद्धा हानी पोहोचेल असा इशारा तज्ञ लोक आत्ताच देउ लागले आहेत. पुण्यात थोड्याच राहिलेल्या हिरव्या जागांपैकी एक असलेली वेताळ टेकडी सुद्धा प्रदुषणाच्या विषारी विळख्यात अडकून आपले अस्तित्वच गमावून बसते की काय अशी भिती आता पर्यावरणप्रेमींना वाटत आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article वेताळ टेकडी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.