कर्नाटक (कन्नड भाषेत :ಕರ್ನಾಟಕ, उच्चार (मदत·माहिती)) हे भारताच्या दक्षिणेकडील पाच राज्यांपैकी एक राज्य आहे.
राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.
?कर्नाटक भारत | ||
— राज्य — | ||
| ||
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) | |
क्षेत्रफळ | १,९१,७९१ चौ. किमी | |
राजधानी | बंगळूर | |
मोठे शहर | बंगळूर | |
जिल्हे | ३१ | |
लोकसंख्या • घनता | ६,१०,९५,२९७ (९ वा) (२०११) • ३१८.६/किमी२ | |
भाषा | कन्नड | |
राज्यपाल | हंस राज भारद्वाज | |
कर्नाटकचे मुख्यमंत्री | सिद्धारमैया | |
विधानसभा (जागा) | विधानसभा, विधान परिषद (२२४ + ७५) | |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-का | |
संकेतस्थळ: कर्नाटक सरकार संकेतस्थळ | ||
[[चित्र:Karnataka_emblem.png | कर्नाटक चिन्ह]]कर्नाटक चिन्ह |
कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे. उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,७९१ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात ३१ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू व तामिळ ह्याही काही भाषा बोलल्या जातात.
कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु = उंच अथवा उत्कर्षित व नाडू = भूमि. म्हणजेच उत्कर्षित भूमिचा प्रदेश. हा त्यांपैकी एक अर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु = काळा रंग + नाडू = भूमि. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.
कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळूर ही असून आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.
कर्नाटकाचा इतिहास पॅलिओथिक कालखंडापर्यंत सापडतो. मेगालिथिक व निओलिथिक संस्कृतींची मुळे कर्नाटकच्या पुरातत्त्व संशोधनात आढळतात. हराप्पामध्ये मिळालेले सोने कर्नाटकातील सोन्याच्या खाणींतून काढलेले असल्याचे जे पुरावे आहेत, ते हराप्पा संस्कृतीचा कर्नाटकाशी ५००० वर्षांपूर्वीही संपर्क होता हे दर्शवतात. बौद्ध कालात कर्नाटक मगध साम्राज्याचा भाग होता व नंतर मौर्य साम्राज्याचा भाग बनला. अशोकाचे अनेक शिलालेख कर्नाटकात आहेत. मौर्य साम्राज्याच्या घसरणीनंतर जुन्नरच्या सातवाहनांनी कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. कदंब व पश्चिमी गंगा ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती. पश्चिमी गंगा घराण्याने तलक्कड येथे राजधानी स्थापली होती.
[[चित्र:Ugranarasimha statue at Hampi dtv.JPG|175px|thumb|left|हंपी येथील उर्गसिंहाचा पुतळा (युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ सूचीतील वारसास्थळ) घराण्याने कन्नड भाषेला राज्यभाषा म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पाचव्या शतकातील बनावसी येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवरून त्याबद्दल पुरावा मिळतो. ह्या राज्यानंतर कर्नाटक बदामी येथील चालुक्यांच्या राज्याचा भाग बनले. the Rashtrakuta Empire of Manyakheta and the Western Chalukya Empire, चालुक्यांनी दख्खनच्या पठारावरील मोठ्या भागावर राज्य केले. यांत महाराष्ट्रातील मोठा भागही येत होता. या राज्याची राजधानी कर्नाटकातील बदामी येथे होती. चालुक्यांची चालू केलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली..
दक्षिणेकडील चोल साम्राज्य ९ व्या शतकात अतिशय शक्तिशाली बनले. आजचा जवळपास संपूर्ण कर्नाटक चोलांच्या अधिपत्याखाली होता. राजाराज चोलाने (इस. ९८५-१०१४)सुरू केलेला विस्तार राजेंद्र चोलाच्या (१०१४-१०४४) अधिपत्याखाली चालू राहिला. सुरुवातीस गंगापदी, नोलंबपदी ही म्हैसूरनजीकची ठिकाणे काबिज केली. राजाराज चोलने बनावसीपर्यंत विस्तार केला. १०५३ मध्ये राजेंद्र चोल दुसरा याने चालुक्यांचा पराभव केला. त्याच्या स्मरणार्थ कोलार येथे स्तंभ उभा केला होता.
११ व्या शतकात होयसाळांचे राज्य उदयास आले, ह्या राज्यात कन्नड साहित्याने शिखर गाठले. तसेच शिल्पकलांने भरलेली अनेक मंदिरे त्यांच्या काळात बांधली गेली. कन्नड संगीत व नृत्यही याच काळात विकसित झाले. एकंदरीतच होयसाळांची कारकीर्द ही कन्नड संस्कृतीचा सुवर्णकाळ मानली जाते. होयसाळांनी आपल्या राज्यविस्तारात आंध्र व तमिळनाडूचेही भाग काबिज केले होते. चौदाव्या शतकात हरिहर-बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. या राज्याची राज्याची राजधानी तुंगभद्रेच्या काठी होशपट्टण येथे केली. याच गावाचे नाव नंतर विजयनगर म्हणून रूढ झाले. विजयनगरच्या साम्राज्याने उत्तरेकडून येणाऱ्या इस्लामी आक्रमणांना बऱ्याच काळापर्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले. राजा रामदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावी सम्राट होऊन गेला. जवळपास संपूर्ण दक्षिण भारतावर विजयनगर साम्राज्याची सत्ता होती. बेल्लारीजवळ मध्ययुगीन विजयनगर शहराचे अवशेष आहेत.
सन १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा तालिकोटा येथील लढाईत इस्लामी सुलतानांच्या युतीविरुद्ध पराभव झाला व विजयनगर साम्राज्याचे अनेक इस्लामी शाह्यांमध्ये (निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही) विभाजन झाले. विजापूरस्थित आदिलशाही सलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. १६८७ मध्ये औरंगजेबाने आदिलशाही संपुष्टात आणली. बहामनी व आदिलशाही स्थापत्याची चुणूक उत्तर कर्नाटकातील शहरांमध्ये पहावयास मिळते. गोल घुमट हे त्यातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्य आहे. [[चित्र:Tipu Sultan BL.jpg|right|thumb|175px|ब्रिटीशांचा कट्टर शत्रू टिपू सुलतान हा ब्रिटीश साम्राज्याच्या उदयाच्या आधी भारताच्या सर्वांत शक्तिशाली राज्यकर्त्यांपैकी एक होता|दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Tipu_Sultan_BL.jpg]]
मराठा साम्राज्याच्या विस्तारकालात पूर्वी विजयनगर साम्राज्याचे विभाग असलेली दक्षिण कर्नाटकातील अनेक छोटी राज्ये अजूनही स्वतंत्र होती. म्हैसूरचे वडियार, मराठे व निझाम यांच्या ताब्यात कर्नाटक होता. म्हैसूर राज्याचा सेनापती हैदर अली याने (....साली) म्हैसूर राज्यावर ताबा मिळवला व स्वतः राज्यकर्ता बनला. त्याचा मुलगा टिपू सुलतान हा भारतीय इतिहासातील एक शूर योद्धा मानला जातो. त्याने इंग्रजांशी चार युद्धे केली. १७९९ मधील चौथ्या युद्धात त्याचा म्रुत्यू झाला व इंग्रजांनी म्हैसूरचे संस्थान काबिज केले व नंतर वडियार घराण्याला पुन्हा म्हैसूरच्या गादीवर बसवले.
संस्थाने खालसा करण्याच्या धोरणांमुळे इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले. कित्तुर चिन्नमा ह्या राणीने दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये अनेक क्रांतीकारकानी प्रभाव टाकला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूरच्या महाराजांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. म्हैसूर संस्थान व आजूबाजूचा विलीन झालेला प्रदेश यांचे म्हैसूर राज्य झाले. पुढे १९७३ साली राज्याचे नाव अधिकृतरीत्या बदलले आणि कर्नाटक असे झाले.
कर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. किनारपट्टी लगतचा कोकण अथवा करावली. सह्याद्रीने व्यापलेला मलेनाडू, व दख्खनच्या पठाराचा बयलूसीमे. राज्याचा बहुतांशी भाग बयलूसीमेत मोडतो. त्यातील उत्तरेकडच्या भागाचा अंतर्भाव भारताच्या कोरड्या प्रदेशांमध्ये होतो. कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मलयनगिरी. त्याची उंची १,९२९ मीटर (६,३२९ फूट) इतकी आहे. कावेरी कृष्णा, मलप्रभा, तुंगभद्रा व शरावती ह्या राज्यातल्या प्रमुख नद्या आहेत.
भूस्तरशास्त्रीयदृष्ट्या कर्नाटकाचे चार भाग आहेत.
राज्यातील अंदाजे ६०% भूभाग आर्चियन कॉम्प्लेक्सने बनलेला असून त्यान नाइस, ग्रॅनाईट आणि चार्नोकाइट खडक आढळतात. जांभ्या दगड हा सुरुवातीच्या टर्शियरी कालखंडातील ज्वालामुखी उद्रेक संपल्यावर तयार झाला.
कर्नाटकात अकरा प्रकारच्या माती आढळतात. यांचे शेतकीशास्त्रानुसार सहा प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे - लाल माती, जांभी माती, काळी माती, ॲलुव्हियो-कॉलुव्हियल, जंगलमाती आणि किनारी माती.
कर्नाटकात चार प्रमुख ऋतू आहेत. सौम्य हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी), उन्हाळा (मार्च ते मे), पावसाळा (जून ते सप्टेंबर) व उत्तर पावसाळा (ऑक्टोबर ते डिसेंबर). हवामानाच्या दृष्टीने कर्नाटकाचे चार भाग पाडता येतील. पहिला, समुद्रकिनाऱ्यालग दमट हवामानाचा. या किनारपट्टीच्या भागात पावसाळ्यात जबरदस्त पाऊस पडतो. इथली पावसाची वार्षिक सरासरी ३६३८ मिलीमीटर इतकी आहे. हे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या कितीतरी पटीने अधिक आहे. अगुंबे हे कर्नाटकातले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. कर्नाटकाचा पूर्व भाग अतिशय शुष्क आहे. रायचूर येथे सर्वाधिक ४५.६° सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यातील सर्वात कमी तापमान बिदर २.८° सेल्सियस येथे नोंदवले गेले आहे. उत्तरेकडचा भाग व दक्षिणेकडचा भाग हे सौम्य प्रकारच्या हवामानात मोडतात. कर्नाटक हे एक सांस्कृतिक वारसा असलेल राज्य आहे
कर्नाटकची २२% टक्के जमीन ही जंगलांनी व्यापली आहे. बहुतांश जंगल किनारपट्टी व सह्याद्रीच्या क्षेत्रात येते. याशिवाय म्हैसूर शहराच्या दक्षिणेला एक मोठे जंगल आहे. त्याची गणना भारतातल्या मोठ्या जंगलक्षेत्रांत होते.
यावरील विस्तृत लेख पहा - कर्नाटकातील जिल्हे.
कर्नाटक हे भारताच्या एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटक राज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross Domestic Product) जवळपास २.१५२ लाख कोटी रुपये इतके आहे. कर्नाटकाच्या अर्थवाढीचा वेग २००७ साली ७ टक्के होता.
वार्षिक उत्पन्न विचारात घेतले तर कर्नाटक राज्य हे भारतातले, २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होणारे राज्य आहे, असे दिसते आहे. सद्यस्थितीत कर्नाटक आर्थिक बाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर महाराष्ट्र व गुजरात आहेत. सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी गुंतवणूक मिळवण्याऱ्या भारताच्या राज्यांत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणापेक्षा(५.९९ टक्के) थोडेसे कमी आहे. २००६-०७ या आर्थिक वर्षात राज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता. कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.
राज्यातील ५६% जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडित आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी १.२३१ कोटी हेक्टर शेती-वापरासाठी आहे. राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही ओलिताखाली आहे.
कर्नाटकात भारत सरकाचे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेवी इलेट्रिकल्स लिमिटेड, भारत अर्थ मूव्हर्स, हिंदुस्तान मशीन टूल्स ह्या कंपन्यांचे महत्त्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. इस्त्रो, राष्ट्रीय ऊर्जा संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी भारताच्या सर्वात नावाजलेल्या महत्त्वाच्या संशोधन संस्था कर्नाटकात आहेत.
कर्नाटकने १९८० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली, त्यामुळे कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. सध्या कर्नाटकात २००० पेक्षाही जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत, अथवा त्यांची कार्यालये आहेत. इन्फॉसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूरमध्ये आहेत. तसेच सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यालये आहेत. या कंपन्यांकडून होणाऱ्या संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त रुपये असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील एकूण निर्यातीच्या साधारणपणे ३८ टक्के एवढी आहे. सॉफ्टवेर क्षेत्रातील या प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.
कर्नाटक हे जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहेत. तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे.
देशातील काही बँकाची मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत. कॅनरा बँक, सिंडीकेट बँक, वैश्य बँक, कर्नाटक बँक ह्या काही प्रसिद्ध बँका मूळच्या कर्नाटकमधील आहेत. उडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत भारताच्या बँकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बँकेची एक शाखा असे समीकरण आहे.
रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारताच्या एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो.
कर्नाटक मध्ये इतर राज्यांप्रमाणेच विधानसभा अस्तित्वात आहे. तसेच विधान परिषद ही आस्तित्वात आहे. विधानसभा हे कनिष्ट सभागृह तर विधान परिषद हे वरिष्ट कायम-सभागृह आहे. विधानसभेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका होतात व एकूण २२४ आमदार निवडले जातात. विधान परिषदेत ७५ आमदार असून १/३ आमदारांची दर दोन वर्षांनी नियुक्ती होते. विधान परिषदेतील आमदाराचा कार्यकाल एकूण ६ वर्षाचा असतो.
कर्नाटकातील हवाई वाहतूक फारशी विकसित झालेली नाही. बंगळूरचा केंपेगौडा विमानतळ राज्यातील सर्वात मोठा विमानतळ आहे. मंगळूर, हुबळी, बेळगांव, हंपी व बेळ्ळारी येथेही विमानतळे आहे व बंगळूरहून बहुतेक जोडली आहेत. भारताच्या खाजगी विमान कंपन्यांपैकी किंगफिशर व एर डेक्कन ह्या बेंगलोरमधल्या कंपन्या आहेत.
कर्नाटक मध्ये ३०८९ किमी लांबीचे लोहमार्ग आहेत. किनारपट्टीच्या भागातील रेल्वे कोकण रेल्वेच्या अंतर्गत येते तर बहुतेक इतर भाग नैरुत्य विभागात येतात. रेल्वेचा काही भाग दक्षिण रेल्वे मध्येही मोडतो. बंगळूरचे इतर शहरांशी लोहमार्गाचे जाळे विस्तृत आहे. परंतु इतर शहरांचे एकमेकांशी जाळे तेवढे विकसित झालेले नाही.
कर्नाटकात एकूण ११ बंदरे आहेत. मंगळूर हे सर्वात महत्त्वाचे बंदर आहे.
राज्याची मुख्य वाहतूक राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होते. राज्यात एकूण १४,००० किमी लांबीचे रस्ते आहेत. कर्नाटक राज्य परिवाहन ही राज्यातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक संस्था असून २५,००० लोक काम करतात. जे दिवसाला सरासरी २२ लाख प्रवाशांची वाहतूक करतात.
कर्नाटकातील भौगोलिक वैविध्य, राज्याचा प्राचीन कालापासूनचा इतिहास व इथली असंख्य ऐतिहासिक स्थळे, यामुळे कर्नाटक राज्य हे पर्यटकांना आकर्षित करते. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे येथे पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो., राज्य सरकारने आत्तापर्यंत ७५२ स्थळे संरक्षित केली आहेत. या स्थळांव्यतिरिक्त आणखी २५००० स्थळे संरक्षित करण्याजोगी आहेत.
राज्याच्या पश्चिम घाटावरच्या आणि दक्षिणेकडच्या जिल्ह्यांत कुद्रेमुख, मडिकेरी आणि अगुंबे यांसारखी सृष्टीसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. कर्नाटकात २५ अभयारण्ये आणि ५ राष्ट्रीय उद्याने आहेत. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बणेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोळ राष्ट्रीय उद्यान ही सर्वात जास्त लोकप्रिय उद्याने आहेत. हंपी येथील विजयनगर साम्राज्याचे अवशेष व पट्टडकल येथील स्मारके यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे. बादामीच्या गुहांमधली मंदिरे आणि ऐहोळे येथील बदामी-चालुक्यीय ढंगात असलेल्या वास्तू पर्यटकांना आकर्षून घेतात. क्लोरिटिक खडक वापरून बांधलेली बेलूरची आणि हळेबीडची होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत येण्याची शक्यता आहे. विजापूरचा गोलघुमट हा दख्खनी सल्तनतींच्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. श्रवण बेळगोळा येथील मूर्तीस अभिषेक घालण्यास हजारो जैन धर्मीय भेट देतात.
भारताच्या दोन सर्वात जास्ती उंचीचे धबधबे कर्नाटकातच आहेत. जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारताच्या सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत. जोग धबधबा हा भारताच्या सर्वाधिक उंचीचा धबधबा आहे. इतर धबधब्यांमध्ये गोकाक, उन्चाली, मगूड हे येतात. पावसाळ्याच्या दिवसात यांना पहाण्यास पर्यटकांची पसंती असते.
अलीकडेच कर्नाटकने आरोग्य पर्यटनात आघाडी घेतली आहे. केरळ मधील आयुर्वेदिक उपचार केंद्रांच्या धर्तीवर कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू झाले आहेत. देशातून तसेच परदेशातून अनेक पर्यटक अशा प्रकारच्या उपचार केंद्रांमध्ये हवापालट व उपचारांसाठी येतात.
कर्नाटकातील पुरातत्त्वीय ठिकाणे | |||||
---|---|---|---|---|---|
|
This article uses material from the Wikipedia मराठी article कर्नाटक, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.