भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंग्रजी indian Institutes of Technology; संक्षेप: आय.आय.टी.) ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत.
भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आय.आय.टी. कार्यरत आहेत.
आय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्द्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.
भारतात पहिल्यांदा १९५१ साली पश्चिम बंगालमध्ये खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबई (१९५८), चेन्नई, कानपूर (१९५९), दिल्ली (१९६३) येथे आणि १९९४ साली गुवाहाटी येथेही आयआयटी उघडण्यात आली. २००१ मध्ये रूडकी विद्यापीठाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला. २००८-०९ दरम्यान गांधीनगर, जोधपूर, हैदराबाद, इंदोर, पाटणा, भुवनेश्वर, रोपड आणि मंडी याठिकाणी आठ नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. तेव्हाच बनारस हिंदू विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेला भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात आला. २०१५-१६ मध्ये तिरुपती, पालक्काड, भिलाई, गोवा, जम्मू आणि धारवाड येथे सहा नवीन आयआयटींची स्थापना करण्यात आली, तसेच आयएसएम धनबादलाही हा दर्जा देण्यात आला.
१९४६ साली व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषेदेचे सदस्य सर जोगिंदर सिंग यांनी एक समिती नेमली. युद्धानंतरच्या काळात औद्योगिक विकासासाठी "उच्च तांत्रिक संस्था" स्थापन करण्याचा विचार हे त्या समितीचे काम होते. नलीनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली त्या २२ सदस्य असलेल्या समितीने अशा प्रकारच्या संस्था भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थापन कराव्यात अशी शिफारस केली.
पहीली भारतीय तंत्रज्ञान संस्था ही खडगपूरमधल्या हिजली प्रतिबंध शिबिराच्या जागेवर मे १९५० मध्ये उघडण्यात आली. १९५१ मध्ये याठिकाणी पहील्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना झाली. १५ सप्टेंबर १९५६ रोजी भारतीय संसदेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (खडगपूर) कायद्यानुसार तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून जाहीर केलं. १९५६ साली आयआयटी खडगपूरच्या पहिल्या पदवीदान समारंभात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणात म्हणाले:
“ | हिजली प्रतिबंध शिबिराच्या ठिकाणी आज उभे असलेले हे स्मारक (ही संस्था) भारताच्या आकांक्षा आणि भारताच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करत आहे. हे चित्र मला पुढील काळात भारतात होणाऱ्या बदलांचं प्रतीक वाटते. | ” |
सरकार समितीच्या शिफारशीनुसार मुंबई, चेन्नई, कानपूर आणि दिल्ली येथे चार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. नवीन आयआयटीच्या स्थापनेसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. आसाम राज्यात झालेल्या विद्यार्थी चळवळीमुळे राजीव गांधी यांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे नवीन आयआयटीची घोषणा केली. भारताचे सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या रूडकी विद्यापीठाला २००१ साली आयआयटीचा दर्जा देण्यात आला.
This article uses material from the Wikipedia मराठी article भारतीय तंत्रज्ञान संस्था, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.