महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे.
महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर) | ||
नाव: | करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई | |
---|---|---|
निर्माता: | चालुक्य राजा कर्णदेव | |
जीर्णोद्धारक: | चालुक्य राजा कर्णदेव | |
निर्माण काल : | ६३४ | |
वास्तुकला: | हेमाडपंथी | |
स्थान: | करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र | |
प्रधान देवता: | सर्वस्याद्या त्रिगुणात्मक महालक्ष्मी भगवती | |
हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.
पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स. ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.
पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.
मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे. नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.
कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो.
देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्रकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.
महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे (जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.
शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.
नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.
काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.
हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.
प्राध्यापक प्रभाकर माळशे म्हणतात, "करवीराचे नाव आजही स्थानिक पातळीवर कोल्हापूर शहर दर्शविण्यासाठी वापरले जाते".
प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, स्वामी समर्थ, विठोबा, काशीविश्वेश्वर, राम, कात्यायनी, पंचगंगा व साती आसरा आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.
देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :-
१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. २. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. ३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.
या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.
महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दृष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी.
नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणाऱ्या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणाऱ्या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे.
वरील दोन देवळांव्यतिरिक्त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्वर, मुक्तेश्वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात.
देवीची साडेतीन शक्तिपीठे :-
This article uses material from the Wikipedia मराठी article महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.