रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म : २५ डिसेंबर, इ.स.
१९४०) हे मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार आहेत. इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत.
रावसाहेब रंगराव बोराडे | |
---|---|
जन्म नाव | रावसाहेब रंगराव बोराडे |
टोपणनाव | रा. रं. बोराडे |
जन्म | डिसेंबर २५, इ.स. १९४० काटगाव, लातूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | नाटक, साहित्य, विनोद, तत्वज्ञान, ब्लॉग |
साहित्य प्रकार | कथा, कादम्बरी, नाटक, समीक्षा, ब्लॉग |
विषय | सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ग्रामीण |
चळवळ | ग्रामीण साहित्य चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती | पाचोळा आमदार सौभाग्यवती नाती गोती बुरूज |
वडील | रंगराव भाऊराव बोराडे |
पत्नी | सुलभा |
अपत्ये | अरुणा, कल्पना, प्रेरणा, मंजूषा |
पुरस्कार | १.उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार(एकूण : ५ पुरस्कार) २. फाय फाउंडेशन पुरस्कार ३. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची सन्मानवृत्ती ४. यशवंतराव चव्हाण पुरस्कार,अंबाजोगाई ५. आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार ६. मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार ७. भैरूरतन दमाणी पुरस्कार ८. जयवंत दळवी पुरस्कार |
स्वाक्षरी |
रा. रं. बोराडे यांचा जन्म लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला. त्या काळी काटगाव हे अत्यंत मागासलेले खेडे होते. तेथे शाळाही नव्हती. खाजगी शिक्षक ठेवून मुलांना शिक्षण दिले जाई. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण असेच खाजगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले. पाचवीसाठी त्यांना बार्शीला यावे लागले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये त्यांचे १०वीपर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मराठीमध्ये एम.ए. केले.
१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्य राहिलेले आहेत. २००० साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.
त्याच वर्षी राज्य सरकारने बोराडे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामांत सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करविली.[ संदर्भ हवा ] खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला.
रा. रं. बोराडे यांच्या साहित्य लेखनाची सुरुवात अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली. १९५७ साली दैनिक सकाळला २५ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त सकाळने राज्यस्तरीय कथास्पर्धा जाहीर केली. रा. रं. बोराडे तेव्हा इयत्ता दहावीत होते. त्यांनी आपली एक कथा स्पर्धेला पाठवून दिली. या कथेला स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. या कथेचे नाव होते ‘वसुली’. दहावीला असणाऱ्या बोराडे यांचे नाव अचानक साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या तोंडी खेळू लागले. १९६२ साली त्यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला. याच वर्षी त्यांना सत्यकथा या मासिकाने लिहिण्यासाठी निमंत्रित केले. सत्यकथामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या.
बोराडेंच्या कथांमधल्या व्यक्ती ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केले. याशिवाय अत्यंत बेरकी आणि धोरणी माणसेही त्यांच्या कथांमधून भेटतात. रा.रं. बोराडे यांच्या कथा कादंबऱ्यांत महिलांची व्यक्तिचित्रणेही अत्यंत समर्थपणे आली आहेत. त्यांच्या ‘नाती-गोती’ या कथासंग्रहात अशा महिला जवळपास प्रत्येक कथेत वाचकांना भेटतात. ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही रा.रं. बोराडे यांनी लिहिल्या. या कथांतून ते ग्रामीण माणसांच्या मनाचा ठाव घेतात. या लेखनगुणांमुळे बोराडे यांना मोठा वाचकवर्ग लाभला. महाराष्ट्रातच नव्हे, तर मराठी भाषा जाणणाऱ्या भारतभरातील विविध प्रांतांत त्यांचा वाचकवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय भाषांत तसेच इंग्रजीत अनुवाद झाले. त्यात ‘पाचोळा’ या कादंबरीचा समावेश आहे. ‘पाचोळा’ ही कादंबरी मराठीतील अभिजात कादंबऱ्यांत समाविष्ट होते. मराठीतील वाचकप्रिय ‘टॉप टेन' कादंबऱ्यांतही तिची गणना केली जाते. ही कादंबरी लिहायला बोराडेंना तीन वर्षे लागली. त्यांच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीनेही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळविला. या कादंबरीचे नंतर बोराडे यांनी याच नावाने नाट्यरूपांतर केले. स्त्री-पुरुषांतील सत्तासंघर्षाचे अत्यंत थरारक चित्रण या कादंबरीत आणि नाटकात येते. ‘आमदार सौभाग्यवती' या नाटकाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो प्रयोग झाले. मराठीतील अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी या नाटकात नायिकेची भूमिका केली होती. 'राजकीय नाटक आणि आमदार सौभाग्यवती' या नावाचा एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. प्रा. त्र्यंबक महाजन यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. प्रा. दासू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. साध्या सोप्या मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी बोराडे आग्रही आहेत. सर्वसामान्यांना, अगदी निरक्षरांनाही कळेल अशी सोपी, अर्थपूर्ण भाषा प्रसारमाध्यमांनी वापरली पाहिजे. वाचक, श्रोता, प्रेक्षक बदलत आहे, त्यांच्या गरजाही बदलत आहेत. हे लक्षात घेऊन भाषाही बदलली पाहिजे, असे मत रा. रं. बोराडे यांनी वारंवार व्यक्त केले. लेखकाची जातीमध्ये विभागणी करून विशिष्ट गटामध्ये बंदिस्त करणे म्हणजे लेखणीला संकुचित व मर्यादा घालणे होय. त्यामुळे लेखकाला जातीचे कुंपण घालता कामा नये, ही भूमिका रा. रं. बोराडे यांनी आयुष्यभर जपली. पाचोळा या कादंबरीतील नायिका ही या कादंबरीचे निवेदन करते.
अनेक मासिकांतून रा.रं, बोराडे यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. उदा०
१९६७ साली मळणी हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला. तो मुंबईच्या मौज प्रकाशनाने काढला. मळणीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला राज्य पुरस्कार होय. त्यांना एकूण ५ राज्य पुरस्कार मिळाले. ही पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी : मळणी (कथा १९६८), पाचोळा (कादंबरी १९७१), पाच ग्रामीण नाटिका (नाटिका १९८८), कणसं आणि कडबा (कथासंग्रह १९९४), चोरीचा मामला (एकांकिका १९९७).
शिवाय,
कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, असा निश्चय रा. रं. बोराडे यांनी अगदी उमेदवारीच्या काळातच केला होता. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे चाहते गेली अनेक वर्षे त्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावीत आहेत. तथापि, त्यांनी आपला निर्णय बदललेला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या भूमिकवर ते आजही ठाम आहेत. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
५.https://moresangita.blogspot.com/2020/09/blog-post_18.html
This article uses material from the Wikipedia मराठी article रावसाहेब रंगराव बोराडे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.