हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भर्तृहरी (मराठी नामभेद: भर्तृहरी, भर्तरी, भर्तरीनाथ) (जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे ५ वे शतक) हा उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याचा थोरला सावत्र भाऊ होता. नीतिशतक, शृङ्गारशतक व वैराग्यशतक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शतकत्रय या संस्कृत भाषेतील ग्रंथसंग्रहाचा रचनाकार म्हणून हा प्रसिद्ध आहे. याला पिंगला नामक पत्नी होती. नाथपंथीय आख्यायिकांनुसार गृहस्थाश्रम त्यजून याने संन्यासाश्रम स्वीकारला, अशी समजूत आहे[ संदर्भ हवा ]. नाथपंथीय सिद्धांच्या नामावलीतील भर्तरीनाथ म्हणजे हाच असल्याची सांप्रदायिक मान्यता आहे.
भर्तृहरीचा काळ आणि ग्रंथसंपदा शतकत्रयांखेरीज, भर्तृहरीने वाक्यपदीयम्' नावाचा व्याकरणावरील संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. वाक्यपदीय हा ग्रंथ लिहिणारा व्याकरणकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी असे एकाच नावाचे दोन ग्रंथकर्ते होऊन गेल्याचे दिसते. भारतात इ. स.च्या सातव्या शतकात आलेला चिनी प्रवासी इत्सिंग ह्याने भर्तृहरिनामक एका भारतीय विद्वानाचा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे. हा भर्तृहरी बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता आणि आपण भारतात येण्याच्या चाळीस वर्षे आधी ह्या भर्तृहरीचे निधन झाले होते, असे इत्सिंगने म्हटले आहे. इत्सिंगच्या ह्या लेखनाचा काळ इ. स. ६९१ हा असल्यामुळे त्याने उल्लेखिलेल्या ह्या भर्तृहरीचे निधन ६५१ मध्ये झाले असावे. वाक्यपदीय हा ग्रंथ ह्याच भर्तृहरीने लिहीला, असा स्पष्ट उल्लेख इत्सिंगने केलेला आहे. तथापि दिड़नागाच्या (४८०-५४०) त्रैकाल्यपरीक्षेच्या तिबेटी भाषांतरात भर्तृहरीचे काही श्लोक उदधृत केलेले असल्यामुळे चौथ्या शतकाचा शेवट किंवा पाचव्या शतकाची सुरुवात असा त्याचा काळ असावा, असे काही अभ्यासक मानतात. वाक्यपदीयकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी हे एकच असावेत किंवा काय, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि ते एक नसावेत, असे मानण्याकडे विद्वानांचा सर्वसाधारण कल आहे. शतकत्रयात व्याकरणाचे काही अपप्रयोग आलेले आहेत. ते लक्षात घेता, त्याचे कर्तृत्व महावैयाकरण असलेल्या वाक्यपदीयकार भर्तृहरीला देणे अवघड आहे. शिवाय, शतकत्रयातील काही उल्लेखांवरून त्याचा कर्ता शैव-वेदान्ती असावा, असेही दिसते. राजा भर्तृहरी बाबा बालकनाथ यांचे बरोबर एक तप राहिले तेंही गुरू गोरक्षनाथ यांची परवानगी घेऊन,बाबा बालकनाथ यांचे करंजी घाट जवळ बाळ नाथ गड या ठिकाणी समाधी(गुप्त)स्थान मंदिर आहें, तसेच अलवार नंतर बाबा भर्तृहरी नाथ हें हरंगूल(परळी वैजनाथ ते गंगाखेड रस्त्यावर 18 km अंतरावर) या गावी ध्यानस्थ बसलं त्या ठिकाणी मोठे वारूळ बनले, त्या जागेवर समाधी मंदिर असून नागपंचमीला मोठी यात्रा भरते.तसेच अलवार येथे समाधी मंदिर आहें असें ही समजते
या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष, त्या व्यक्तीच्या मनात कुठलेना कुठले तरी शल्य असते. अशा सात शल्यांविषयीचा भर्तृहरीचा एक श्लोक आहे.
शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरंस्वाकृते:
प्रभुर्धनपरायण: सततदुर्गत: सज्जन:
नृपाड्गणगत: खलो, मनसि सप्तशल्यानि मे ।
चंद्राला दिवसा प्रकाश नसणे हे पहिले शल्य. सुंदर स्त्रीला वृद्धत्व येणे हे दुसरे शल्य, एखाद्या स्वच्छ पाण्याचे सरोवर कमळाच्या फुलाशिवाय असणे हे तिसरे शल्य, एखादा मनुष्य चांगला असावा पण तो निरक्षर किंवा मूर्ख असावा हे चौथे शल्य, एखादा मनुष्य दानशूर असावा पण तो धनलोभी असावा हे पाचवे शल्य, विद्वान माणसे दरिद्री असावीत हे सहावे शल्य आणि, देशाच्या राज्यकारभारावर दुष्ट, नीच लोकांचा पगडा असावा हे भर्तृहरीचे सातवे शल्य आहे.
नवनाथ |
---|
मच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तृहरि • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ |
This article uses material from the Wikipedia मराठी article भर्तृहरि, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.