ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे.
नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणिपूर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.
Northeast India | |
---|---|
ईशान्य भारताचे भारतामधील स्थान | |
लोकसंख्या | ३,८८,५७,७६९ |
क्षेत्रफळ | २,६२,२३० चौ. किमी (१,०१,२५० चौ. मैल) |
लोकसंख्या घनता | १४८ /चौ. किमी (३८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०) |
राज्ये आणि प्रदेश | अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोरम सिक्कीम नागालँड त्रिपुरा |
मोठी शहरे (2012) | गुवाहाटी, आगरताळा, शिलाँग, ऐझॉल, इंफाळ |
बरमा आक्रमणामुळे १९ व्या शतकात प्राचीन अहोम साम्राज्य आणि मणिपूर राजसत्ता लयाला गेले. ब्रिटिश काळातील युद्धामुळे या प्रांतावर ब्रिटीशांचा अंमल प्रस्थापित झाला. वसाहत काळात (१८२६-१९४७) हा सर्व भाग बंगाल प्रांताचा भाग म्हणून ओळखला जात असे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश भारतात आसाम, मणिपूर, त्रिपुरा यांचा समावेश झाला. यानंतर १९६३ साली नागालँड, १९७५ साली अरुणाचल प्रदेश आणि १९८७ साली मिझोरम या राज्यांची निर्मिती झाली.
भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे आसाम, त्रिपुरा, मणिपूर,मिझोरम, नागालँड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश. यांना सप्त भगिनी असे संबोधले जाते. हा भाग चार बाजूंनी बांगलादेश, म्यानमार, चीन आणि नेपाळ या देशांनी वेढलेला आहे. भारताशी मात्र याचा संबंध एका ७० कि.मि.च्या बारीक रेषेनी कायम आहे. येथील लोक प्रामुख्याने गिरीजन म्हणजे डोंगरात राहणारे आणि आपापल्या अस्मिता जपणाऱ्या विविध स्थानिक जमातीचे आहेत. या भागात अंदाजे १६० पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत.
ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि स्थानिक गिरीजन नागरिकांचे ख्रिश्चन धर्मात रूपांतर झालेले आढळते. आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.
पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेला आहे. येथील सात राज्यांच्या संदर्भावरून 'सेव्हन सिस्टर' असे नाव या धबधब्याला मिळाले आहे. हा धबधबा डोंगर कड्यांवरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो. म्हणून देखील सेव्हन सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला संबोधले जाते. एक हजार फुटावरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावस माई या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.
आसाम मधील गुवाहाटी शहरातून मेघालय येथे जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहनेदेखील भाड्याने उपलब्ध असतात.
This article uses material from the Wikipedia मराठी article ईशान्य भारत, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.