नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी हे कृष्णा-पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते.
शहराच्या विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय आहे.
?नृसिंहवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | ४.१६ चौ. किमी • ५३२.६५ मी |
जवळचे शहर | कुरुंदवाड |
विभाग | पुणे |
जिल्हा | कोल्हापूर |
तालुका/के | शिरोळ |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर | ४,१६८ (2011) • १,००१/किमी२ ९५० ♂/♀ |
भाषा | मराठी |
नृसिंहवाडी (पर्यायी नावे: नरसोबावाडी/नरसोबाची वाडी) हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील ४१७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९३० कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या ४१६८ इतकी आहे. पैकी २१३७ पुरुष आणि २०३१ स्त्रिया आहेत. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. ह्या गावाच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे आहेत- पूर्वेस शिरढोण; पश्चिमेस औरवाड; उत्तरेस शिरोळ व दक्षिणेस कुरुंदवाड अशी गावे आहेत. या गावाचे मूळ नाव अमरापूर होय. श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या गावाला लोक नृसिंहवाडी म्हणू लागले. ह्याच्या सर्वात जवळचे शहर कुरुंदवाड हे २ किलोमीटर अंतरावर आहे.
ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६७३५९ हा आहे.
गावात पाच शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, पाच शासकीय प्राथमिक शाळा, दोन शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा व एक शासकीय माध्यमिक शाळा आहे.
सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा व पदवी महाविद्यालय कुरुंदवाड येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व पॉलिटेक्निक जयसिंगपूर येथे पंधरा किलोमीटर अंतरावर आहेत. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (शिरोळ) येथे पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र इचलकरंजी येथे बारा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठीची खास शाळा जयसिंगपूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र दहा किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र, एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, एक प्रसूतीकेंद्र, एक ]]बालकल्याण केंद्र]], एक क्षयरोग उपचार केंद्र आहे व एक ॲलोपॅथी रुग्णालय आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय पाच किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात एक दवाखाना आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय पाच किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात एक कुटुंब कल्याण केंद्र आहे.
गावात चार खासगी क्लिनिक्स व चार औषधाची दुकाने आहे.
गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा आणि हॅन्डपंपच्या तसेच ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात नदी/कालव्याच्या पाण्याचा पुरवठाही आहे.
गावात उघडी गटारव्यवस्था आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्जनिक न्हाणीघर नाही, पण सार्वजनिक संडास आहे.
कसे जायचे:- मिरज ते नृसिंह वाडी(अंतर-16 km):- मिरज जंक्शन रेल्वे स्थानक जवळ असणारे मिरज सिटी बस स्टँड येथून बस उपलब्ध तसेच मिरज येथे जवाहर चौक व शास्त्री चौक येथून रिक्षा व प्रवासी वाहने उपलब्ध आहेत. गावात उपपोस्ट ऑफिस आहे. गावाचा पिन कोड ४१६१०४ आहे. गावात दूरध्वनी सेवा आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र व मोबाईल फोन सुविधा आहेत. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. खाजगी कुरियर सेवा उपलब्ध आहे. गावात शासकीय बससेवा मिळते. सर्वात जवळील खाजगी बस सेवा मिरज व सांगली दहा किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात रेल्वे स्थानक नाही. सर्वात जवळील रेल्वे स्थानक मिरज जंक्शन दहा किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा, टमटम, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहेत.
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नसून तो जवळील मिरज येथे सोळा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील राज्य महामार्ग हा (दिघंची-हेरवाड) ह्या गावाला जोडलेला आहे.
गावात एटीएम आहेत. व्यापारी बँक, सहकारी बँक, शेतकी कर्ज संस्था आहेत. गावात स्वयंसहाय्य गट आहेत. गावात रेशन दुकान आहे. गावात दररोज बाजार असतो. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती नाही. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती पाच किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) आहे. गावात इतर पोषण आहार केंद्रही आहे. गावात 'आशा' कर्मचारी उपलब्ध आहे. गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय आहे. गावात वृत्तपत्र मिळते. गावात विधानसभा मतदान केंद्र आहे. गावात जन्म व मृत्यू नोंदणी केंद्र आहे.
हे गाव पंचगंगा-कृष्णा नद्यांच्या काठावर वसले आहे. गावाचे सांडपाणी थेट नद्यांत मिसळत आहे. तसेच वरच्या भागातील अनेक शहरांचा मैला, कत्तलखाने, चर्मोद्योग, औद्योगिक वसाहती, साखर उद्योग इत्यादींमुळे नदी प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक बनले आहे. नृसिंहवाडी व आसपासच्या ४० गावांना विविध आजाराच्या साथींना सतत तोंड द्यावे लागते. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असल्याने जास्त प्रमाणात पाणी साचून प्रदूषण आणखी वाढत आहे. पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना बनविण्यात आली असून त्यात या गावाचा समावेश केला आहे. मंदिरामुळे भाविकांची संख्या सतत असते त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. जलपर्णीमुळे होणारे नदीप्रदूषण, ही भावी काळामधील मोठी समस्या ठरू शकते.
नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे नदीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. वाळू माफिया व गावकरी यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. रात्री-अपरात्री निर्जन भागातही मोठ्या यंत्रांनी हा उपसा केल्याने मगरी खवळून दिवसा घाटावर व मानवी वस्तीत आढळण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे त्यांचे खाद्य असणारे मासे व इतर जलचर नष्ट होत आहेत. येथील सजग नागरिक गटाने जी पी एस सारख्या आधुनिक तंत्राने पहारा ठेवण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे.
नृसिंहवाडी हे सकस दुधापासून तयार होणाऱ्या खवा व बासुंदी या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. मागणी खूप वाढल्याने या व्यवसायात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. याचा फटका येथील पिढीजात, विश्वासाने व्यवहार करणाऱ्या उत्पादकांना बसत आहे शेजारी खूप छोटी छोटी गावे असल्यामुळे भाजीपाला जास्त पिकतो. तसेच नदी भागात ऊस शेती केली जाते.
कोल्हापूरपासून ५१ कि.मी. वर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी वसले आहे. दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांची इथे पूजा केली जाते. ऐन पावसाळ्यामध्ये कृष्णेला पूर येतो, तेव्हा मंदिर पाण्याखाली जाते. पुराच्या पाण्याच्या खुणा त्यानंतरसुद्धा मंदिर परिसरावर दिसत राहतात. इथूनच पुढे ३ कि.मी. वर कुरुंदवाड आहे. स्वातंत्र्यापूर्वी हे एक संपन्न संस्थान होते. कुरुंदवाडला नदीवर बांधलेला घाट आवर्जून पाहण्याजोगा आहे. इथून खिद्रापूर जेमतेम १५ कि.मी. वर आहे.
कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरू असते. दत्तसंप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले. [ संदर्भ हवा ] यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना 'मनोहर पादुका' असे नाव आहे. या पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते. नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते.[ दुजोरा हवा]. याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींचेही स्मृतिमंदिर आहे.
नदीचे पात्र, घाट, देऊळ, त्यामागचा औदुंबरचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातले शांत, काहीसे पारंपरिक, प्रसन्न वातावरण मनाला भावते.
या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी जेथे आसनस्थ होऊन पूजा करतात, त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते.
सांप्रत उभे असलेले नरसोबा वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. यापैकी औरवाड म्हणजेच पूर्वीचे अमरापूर. या गावाचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये येतो. या गावात अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
नसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही. हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच संथ वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे. नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. इथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाल स्वामी, मौनी स्वामी इत्यादींची समाधी मंदिरे आहेत.
गावात उन्हाळ्यात व हिवाळ्यात घरगुती, शेती व व्यापारी वापरासाठी प्रतिदिवशी २१ तासांचा वीजपुरवठा होतो.
नृसिंहवाडी ह्या गावात एकूण ४१६ हेक्टर क्षेत्रापैकी जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
This article uses material from the Wikipedia मराठी article नरसोबाची वाडी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.