अच्युत बळवंत कोल्हटकर (जन्म : वाई, ऑगस्ट १, १८७९; - १५ जून, १९३१), मूळ नाव - अच्युत वामन कोल्हटकर - हे मराठी पत्रकार होते.
१८७९">१८७९; - १५ जून, १९३१), मूळ नाव - अच्युत वामन कोल्हटकर - हे मराठी पत्रकार होते. ते 'संदेश' वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर हे एक वकील आणि नेमस्तपक्षीय सुधारक नेते होते. अच्युतरावांचे पालनपोषण त्यांचे चुलते बळवंतराव ह्यांनी केल्यामुळे अच्युतराव त्यांचे नाव लावीत.
बी.ए.एल्एल.बी. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कोल्हटकरांनी सातारा आणि नागपूर येथे अनुक्रमे शिक्षक व वकील म्हणून काम केले. १९०७ मध्ये देशसेवक ह्या पत्राचे संपादक होऊन जहाल राष्ट्रवादी राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्याबरोबरच त्यांची अनेक चढउतारांनी भरलेली राजकीय आणि वृत्तपत्री कारकीर्द सुरू झाली. ह्या कारकीर्दीत १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांच्या राजकारणाचा जहाल भाषेत पुरस्कार केल्याबद्दल आणि १९३० मध्ये गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला.
अच्युत बळवंत कोल्हटकरांनी १९१५ साली काढलेल्या संदेश ह्या पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीचा गंभीर चेहरामोहराच बदलून टाकला. भावनेला आवाहन करणारे, तसेच कल्पकतेने आणि विनोदाने प्रतिपक्षाची भंबेरी उडवून टाकणारे अग्रलेख, ‘संदेशचा अहेर’, ‘बेटा गुलाबच्या कानगोष्टी’, ‘चहा, चिवडा, चिरूट’, ‘संदेश दरबारचा पदवीदान समारंभ’ इ. चटकदार सदरे, चित्तवेधक, बातम्या, आकर्षक मथळे ह्यांमुळे मराठी वृत्तपत्रीय लेखनात बहुरंगीपणा आला व ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यांनी चालू केलेल्या मेसेज (१९१७) ह्या इंग्रजी वृत्तपत्राचा मात्र जम बसला नाही. संदेश लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच सरकारी अवकृपेस बळी पडले आणि बंद झाले
‘संदेश’ बंद पडल्यावर कोल्हटकरांनी संजय, चाबूक, चाबूकस्वार ह्यांसारखी अनेक पत्रे काढली. मुंबईच्या प्रभात वृत्तपत्राच्या संपादक मंडळातही ते होते.पटवर्धन व तुळजापूरकर ह्यांच्या साहाय्याने त्यांनी श्रुतिबोध (१९१२) आणि उषा (१९१३) ही मासिके चालविली. ‘सौ. वत्सलावहिनी यांचे प्रसिद्ध व अप्रसिद्ध लेख’ (१९१५), ‘चोरी कशी करावी? ’(१९२५), ‘अच्युतराव कोल्हटकर स्मारक ग्रंथ’ आदी पुस्तकांतून त्यांचे निवडक लिखाण संकलित झालेले आहे.
लोकमान्य टिळकांवरील मृत्युलेख, ‘मराठी काव्याची प्रभात’, ‘शेवटची वेल सुकली’, ‘दोन तात्या’, ‘पुणेरी जोडे’, ‘माधवाश्रमात शिवाजी’ ह्यांसारखे त्यांचे वेचक लेख वृत्तपत्रीय मराठी साहित्याची भूषणे आहेत.
अ.ब. कोल्हटकरांनी स्वामी विवेकानंद, नारिंगी निशाण (१९१७) व संगीत मस्तानी (१९२६) यांसारखी नाटकेही लिहिली. स्वतःची नाटक कंपनी काढून काही नाटकांतून भूमिका केल्या. काही कादंबऱ्या लिहिल्या, तथापि ‘संदेशकार’ हीच त्यांची जनमानसात विशेष रूढ झालेली प्रतिमा होती. .
अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे नाव मुंबई-गिरगावातील एका रस्त्याला दिले आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article अच्युत बळवंत कोल्हटकर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.