भालचंद्र वनाजी नेमाडे ( २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत.
१९३८">२७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत.
भालचंद्र वनाजी नेमाडे | |
---|---|
जन्म नाव | भालचंद्र वनाजी नेमाडे |
जन्म | २७ मे १९३८ सांगवी ता.यावल जि.जळगाव, खानदेश, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी,कविता,समीक्षा |
प्रसिद्ध साहित्यकृती | कोसला |
वडील | वनाजी |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार -१९९१ ज्ञानपीठ पुरस्कार-२०१५ |
भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.
इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of Oriental and African studies, London (१९७१-?), आणि १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुंबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर अध्यासनावरून निवृत्त झाले. तसेच नेमाडे यांनी गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला...
नेमाडे ’वाचा‘ या अनियतकालिकाचे संपादक होते.
भालचंद्र नेमाडे यांची ’कोसला’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्या कविता ’छंद‘, ’रहस्यरंजन‘, ’प्रतिष्ठान‘, ’अथर्व‘ यामधून प्रसिद्ध झाल्या होत्या.
देखणी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे.
कोसला ही कादंबरी त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाली. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.
’कोसला‘चा नायक पांडुरंग सांगवीकर या नैतिकतेच्या आधारावर बाप, गाव, सगेसोयरे यांना नाकारतो. अशा व्यक्तिमत्त्वावरील कथा असलेली ’कोसला‘ ही कादंबरी प्रस्थापित कांदबऱ्यांचे स्वरूप, विषय, भाषाशैली, संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली. ’कोसला‘ने मराठी कादंबरीला नवी दिशा देत ती अधिक खुली व लवचिक केली. आत्मचरित्रात्मक मांडणी हे नेमाडेंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.
कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१०ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली. कादंबऱ्यांशिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. १९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.
नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली. रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणाऱ्याया नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. व "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.
सातत्याने देशीवादाची संकल्पना मांडणाऱ्या नेमाडे यांनी त्याचा आग्रहही धरला. जागतिकीकरणाचा रेटा वाढला आणि देशीवादाला गती आली. ईशान्येत जंगले टिकून आहेत ती देशीवादाने आणि पुण्या-मुंबईचा ऱ्हास झाला तो जागतिकीकरणाने, अशी त्यांची भूमिका होती. पाश्चात्त्यांच्या नादी लागून त्याचे अंधानुकरण करण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत सुधारणा करून त्या अधिक विकसित कशा करता येतील, यावर त्यांनी भर दिला.
सर्व क्षेत्राप्रमाणे साहित्यातही पाश्चात्त्य प्रवाह शिरले असताना नेमाडेंनी त्यावरच प्रहार केल्यानंतर इतर लेखक अंतर्मुख झाले आणि त्यांनी आपल्या लेखनाची कूस बदलली. नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.
’हिंदू’ लिहिण्यापूर्वी नेमाडे यांनी तब्बल ३० वर्षे लेखन विश्रांती घेतली होती. ’हिंदू‘ प्रकाशनापूर्वीच भरघोस चर्चा घडवणारी ठरली. ’हिंदू‘वर प्रचंड टीकाही झाली आणि भरभरून स्वागतही झाले. पिढ्यांमागून आलेल्या पिढीमध्येही लोकप्रियता टिकवून असलेले नेमाडे हे त्यांच्या साहित्यातील बंडखोर वृत्ती, साक्षेपी आणि परखड लेखन, वस्तुनिष्ठतेला अग्रक्रम आणि लोकभाषेतून साहित्यरचना यामुळेच वाचकांना आपलेसे वाटतात.
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने त्यांनी मातृभाषांवरील इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, हिंदुत्व, साहित्य संमेलन अशा अनेक विषयांवर आपले परखड विचार मांडले.
दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी नेमाडेंच्या जीवन व साहित्यावर आधारित "उदाहरणार्थ नेमाडे". हा मराठीतला पहिलावहिला डॉक्युफिक्शन चित्रपट काढला आहे. (डॉक्युफिक्शन म्हणजे डॉक्युमेंट्री म्हणजेच माहितीपट आणि कल्पना यांना एकत्र साधून केलेले सिनेचित्रण.) चित्रपट दीड तासाचा असून तो २७ मे २०१६ रोजी प्रदर्शित झाला.
This article uses material from the Wikipedia मराठी article भालचंद्र वनाजी नेमाडे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.