अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते.
राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्यला पक्वान्नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्यला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते, राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजी महाराजांंनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
“प्रधान अमात्य सचीव मंत्री,
सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री,
सेनापती त्यात असे सुजाणा,
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।
मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता.
This article uses material from the Wikipedia मराठी article शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.