यज्ञ ही हिंदू धर्मात केली जाणारी एक प्रमुख पूजन पद्धती आहे.
यज्ञ हा शब्द 'यज्' या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ 'देवपूजा, संगतीकरण, आणि दान' असा होतो. आपणापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांची पूजा करणे म्हणजे यज्ञ होय. आपणासमान जे आहेत त्यांच्याबरोबर स्वार्थ न करता उदार मानाने व एक विचाराने जगण्याची कला शिकणे हे संगतीकरण होय. जे आपल्यापेक्षा ज्ञान, बल आणि धनाने कमी आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे म्हणजे दान होय. या संपूर्ण क्रियेला यज्ञ अस म्हणतात.
व्यक्तीच्या स्वतःविषयीच्या कर्तव्यासोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवणे असा आशयही यज्ञ शब्दातून प्रतीत होतो असे मानले जाते. मीमांसकांनी देवतांच्या उद्देशाने केलेला द्रव्यत्याग अशीही यज्ञाची व्याख्या केलेली दिसते. {१ : भारतीय संस्कृती कोश खंड ७}
पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली एक धार्मिक व सामाजिक संस्था म्हणून यज्ञ किंवा यज्ञसंस्थेचा विचार महत्त्वाचा मानला जातो. विविध संकटांपासून सुटका किंवा काही मिळविण्याचा एक प्रमुख राजमार्ग म्हणून यज्ञाचा विचार केला जातो. ज्यामध्ये दुसऱ्याला काहीतरी देणे असे त्यागप्रधान कर्म म्हणजे यज्ञ असाही विचार यामागे आहे.{१}
अग्नीचा शोध हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. हिवाळ्यात उब देणारा, अंधारात प्रकाश देणारा आणि त्यात पडलेले अन्न रुचकर करणारा अग्नी हा मानवी आयुष्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. पण या अग्नीहून यज्ञीय अग्नीचे पावित्र्य वेगळे असावे असे मत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी नोंदविले आहे. ( भारतीय संस्कृती कोश, खंड सातवा, पृष्ठ क्र. ६००)
यज्ञ हा शब्द ऋग्वेदात अनेकदा आला आहे आणि त्याचा अर्थ बहुतेक ठिकाणे श्रेष्ठ कर्म असाच घेतला गेला आहे. संहितांचे जे ब्राह्मण्य ग्रंथ आहेत त्यामध्ये आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांसाठी यज्ञ करण्यास सांगितले आहेत. ब्राह्मण्य ग्रंथांचा समावेश श्रुतींमध्ये होतो म्हणून ब्राह्मण्य ग्रंथात सांगितलेल्या यज्ञाला 'श्रौतयज्ञ' असे म्हटले जाते.
यज्ञाचे तीन प्रकार मानल्या जातात.
कोणते यज्ञपात्र कोणत्या लाकडापासून तयार करावे, त्याचा आकार काय असावा यासंबंधीचे अनेक उल्लेख प्राचीन साहित्यामधून दिसून येतात. यज्ञास लाकडी पात्रे व मातीची पात्रे अगोदरच तयार करून घेतली जात होती. यज्ञास प्रारंभ करण्यापूर्वी जी सामग्री तयार केली जाते त्यास संभार म्हटल्या जात असे.
यज्ञ करतांना त्यात तूप, हविद्रव्य किंवा समिधा यांची आहूती दिल्या जात असे.
व्यक्तिगत सुखासाठी देवतांजवळ पशू, पुत्र, गृह,धन, पाऊस, अन्न, आरोग्य, इ. गोष्टींची याचना यज्ञांद्वारे केली जात असे. व्यक्तिगत सुखाबरोबरच समाजसुख व राष्ट्रकल्याण यांचाही विचार यज्ञसंस्थेद्वारा केला जात असे. यज्ञसंस्थेचा विस्तृत विचार यजुर्वेदात मांडला गेला आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. एकेकाळी यज्ञसंस्था ही समाजाचे केंद्र होते. यज्ञाच्या निमित्ताने लोक एकत्र येत. यज्ञासाठी जमलेल्या लोकांना धर्माचे महत्त्व सांगितल्या जात असे. यज्ञ फक्त ब्राह्मण पुरोहित करत असायचे, त्यामुळे ब्राह्मण पुरोहितांचे महत्त्व फार वाढलेले असायचे. ब्राह्मणग्रंथांमधे यज्ञाचे महत्त्व अनेक प्रकारांनी सांगितले आहे. जे लोक यज्ञ करत नाहीत त्यांना मुक्ती नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात कायमचे अडकून पडतील असे म्हटलेले आहे. ऋग्वेद, ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, भगवद्गीता, इ. ग्रंथात यज्ञसंस्थेचा विकास कसा झाला त्याबद्दल माहिती आहे, असे म्हणतात.
गृहस्थीने(गृहस्थाश्रमात राहणाऱ्याने) पाच यज्ञ करावेत.
ब्रह्मयज्ञामुळे देव, पिता, पशू, मनुष्य, समाज व गुरू या पाचही ऋणातून मुक्त होता येत होते. देवयज्ञामुळे देवांच्या ऋणातून मुक्त होता येत होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article यज्ञ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.