इंग्लंडमध्ये प्रथम सुरू झालेल्या आणि नंतर सर्व युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियांत झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हणतात.
सर्वसाधारणपणे इ.स. १७५० ते इ.स. १८५० असा शतकभराचा कालखंड या क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात बाष्प शक्ती आणि जनशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्रांचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक होते वस्तूच्या किंमती कमी ठेवणे श्रमाचा मोबदला कमी देणे अधिक अधिक नफा मिळविणे अशी या भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये होती इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झालेली होती त्याठिकाणी लोखंड व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती कापड उद्योग याठिकाणी भरभराटीला आलेला होता इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश उपलब्ध होता उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले त्यानंतर मालवर प्रक्रिया करून पक्क्या स्वरूपात इंग्लंडच्या ताब्यातील वसाहतीत विकणे सुलभ झाले मिळणाऱ्या नफ्यातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले या सर्व पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली या औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले घरगुती उद्योगांचा त्रास झाला भारतातील कापड उद्योग मंदावला सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी नेणे सोपे झाले यातून भारताचे आर्थिक शोषण सुरू झाले
औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक इंग्लंडमध्ये अस्तित्वात होते. इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात दूरवर पोहोचले होते. भारतात साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेत इंग्लंडने फ्रान्सचा पाडाव केला. त्याचप्रमाणे अमेरिकेतील वसाहतींमधून इंग्लंडला आमाप नफा व लूट मिळाली होती. इंग्लडने वसाहतींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून भरपूर प्रमाणात संपत्ती मिळवली. या संपत्तीचा वापर इंग्लंडने आपल्या औद्योगिक विकासासाठी केला. ब्रुक ॲडम्स या इतिहासकाराच्या मते भारताच्या भांडवलावर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची उभारणी झाली होती.
याच सुमारास इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती सुरू झाली. इंग्लंडमध्ये उत्साही, धाडसी, कल्पक संशोधकांनी विविध शोध लावले. नवीन यंत्रे तयार केली. उदारणार्थ, जेम्स वॅटने बाष्पयंत्राचा शोध लावला, जॅार्ज स्टीफन्सनने रेल्वे इंजिनाचा शोध लावला. यांच्या शोधामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. इंग्लंडमध्ये घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीने संपूर्ण युरोप आणि आशिया खंडामध्ये परिवर्तनाला दिशा दिली औद्योगिक क्रांतीच्या परिणामस्वरूप वसाहतवादी स्पर्धा निर्माण झाली
औद्योगिकीकरणाला आवश्यक असणारी नैसर्गिक अनुकूलता इंग्लंडमध्ये होती. यंत्रे व कारखाने उभारण्यासाठी लागणारी खनिजे व दगडी कोळसा भरपूर प्रमाणात होता. त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून नवीन यंत्रसामग्री तयार करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरले.
कापड व्यवसाय हा इंग्लंडमधील प्रमुख व्यवसाय होता. सोळाव्या शतकाच्या माध्यापासून इंग्लंडमध्ये कापड उद्योगाला चालना मिळाली होती. इंग्लंडमधील हवामान हे कापड व्यवसायाला अनुकूल होते. इंग्लंडच्या अमेरिकेतील वसाहातींमधून लांब धाग्याच्या कापसाचा पुरवठा इंग्लंडला सहजपणे होत होता. इंग्लंडमध्ये विशेषत्वाने कापड क्षेत्रात क्रांती झाली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कापड व्यवसायापासून होणे अपरिहार्य होते.
इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपात पसरली. इंग्लंडनंतर फ्रान्स व जर्मनीत ही क्रांती घडून आली. फ्रान्स व जर्मनीने लोखंड, पोलाद व रासायनिक उद्योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. नेदरलॅंड, बेल्जियम, स्पेन या देशात उद्योगीकरणास सुरुवात होऊन तेथे औद्योगिकीकरणाचा वेग चांगलाच वाढला. युरोप बाहेर प्रथम अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. अमेरिका अल्पावधीतच एक उद्योगप्रधान अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास आली. रशियात औद्योगिक क्रांतीचा प्रसार उशिरा झाला.
आशिया खंडात ही क्रांती प्रथम जपान या देशात झाली. जपानने पोलाद, यंत्रे, रसायन उद्योगाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. आज औद्योगिक क्रांती साऱ्या जगभर जाऊन पोहचली आहे.
औद्योगिक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली. क्रांतीचे परिणाम इष्ट आणि अनिष्ट असे दुहेरी स्वरूपाचे आहेत.
औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारी उदयास आली. कारखानदारीमुळे जल प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण घडून आले. हवेच्या प्रदूषणामुळे लोकांना श्वसनांचे विकार जडले. काही कारखान्यातून विषारी वायूंची गळती होऊन अनेक माणसे मृत्युमुखी पडली, विकलांग झाली. कारखान्यातून व शहरातून सोडलेले सांडपाणी नद्या, नाले, समुद्राच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले. त्यातून लोकांना अतिसार (गॅस्ट्रो), कावीळ, अर्धांगवायू यांसारखे आजार होऊ लागले. जलचर प्राणी व जल वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले. शहरे व कारखान्यांच्या वाढीतून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले.
कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला. डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, हिवताप यांसारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. दरवर्षी अनेकांना प्राण गमवावे लागतात. कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या ज्वालाग्रही पदार्थांचे स्फोट होवून जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर घडून येते. औद्योगिक उत्पादनासाठी अणूऊर्जा वापरली जाते. अणुभट्यातून किरणोत्सर्गाची गळती झाल्यास त्याचे मानवी शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. शहरातील वाहने, आणि कारखन्यांतून यंत्रांच्या आवाजातून ध्वनी प्रदूषण होते. त्यातून अनेक लोकांना बहिरेपणा येतो. उद्योगीकरणांच्या विकासासाठी खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यांची टंचाई भविष्यात निर्माण होण्याचा धोका आहे. उद्योगीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. शेती उपयुक्त जमीन व शेतीचे पाणी वापरल्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्र कमी होऊ लागले. पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलने होऊन समाजात संघर्षाचे वातावरण निर्माण होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article औद्योगिक क्रांती, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.