जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये निसर्गतः नसणारे घन किंवा घन कण तसेच जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांची हानीकारक किंवा अत्याधिक प्रमाणात वाढ होते ह्याला वायू प्रदूषण असे म्हणतात.
यामुळे मानवांमध्ये रोग, ॲलर्जी आणि मृत्यूदेखील होऊ शकतात. हे इतर प्राणी,अन्न, पिके अश्या इतर सजीवांना तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पर्यावरण वातावरणास हानी पोहोचवू शकते. मानवी क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रिया ह्या दोन्ही वायू प्रदूषण निर्माण करू शकतात. केवळ बाहेरील वायू प्रदूषणामुळे २.१ ते ४.२१ दशलक्ष अकाली लोकांचा मृत्यू होतात.
२०१४ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१२ मधील वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता.
मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळल्याने त्रास होतो, तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायू प्रदूषणास जबाबदार आहेत असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायू प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.
निसर्गात हवेतील जे पदार्थ अथवा घटक मानवी, प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच जे हवामान बदलास कारणीभूत आहेत त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात.
जेव्हा कोळसा किंवा रॉकेल जळते तेव्हा त्यांमध्ये असणाऱ्या गंधकाचे(सल्फर) ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होतो. सल्फर डायॉक्साईड पाण्यात लवकर विरून जातो. जर हवेत सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण जास्त झाले व त्या काळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून सल्फ्यूरिक आम्ल तयार होते व या घटनेला "आम्लधर्मी पाऊस" म्हणतात. आम्लधर्मी पावसाने पिकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमीन आम्लयुक्त होते व हळूहळू नापीक बनते. असल्या पावसाने त्यातल्या गंधकाची इमारतींच्या मटेरिअलवर रासायनिक क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. सल्फर डायाक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातो तेव्हा श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुफ्फुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील पाण्यात विरून टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व सर्दी होते.
सल्फर डायॉक्साईड हा कोळशाच्या ज्वलनाने निर्माण होत असल्याने त्याचे प्रमाण वीटभट्या, वीजनिर्मिती प्रकल्पांजवळ जास्त असते. परंतु वाऱ्याबरोबर लांबवर वाहून जाण्याची क्षमता असल्याने अतीदूरवरही सल्फर डायॉक्साईडचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. सल्फर डायॉक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरी वस्तींमध्ये रॉकेलचा कमी वापर, वीजनिर्मिती प्रकल्पात गंधकरहित कोळसा वापरणे व धूर हवेत सोडण्यापूर्वी सल्फर स्क्रबरमधून त्याचे शुद्धीकरण करणे इत्यादी उपाय आहेत. जर हे उपाय अमलात आणले तर सल्फर डायॉक्साईड व आम्लधर्मी पावसावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायॉक्साईड असतो.
अतिउच्च तापमानावर (१००० अंश सेल्शियस अथवा त्यापेक्षा जास्त) जेव्हा ज्वलन प्रक्रिया होते त्यावेळेस हवेतील नायट्रोजनचेही ज्वलन होऊन त्याचे नायट्रोजन ऑक्साईड व नंतर नायट्रोजन डायॉक्साईड बनते. मुख्यत्वे दुचाकी-चारचाकींच्या इंजिनमध्ये तापमान १००० अंश सेल्शियस पेक्षाही जास्त असते त्यामुळे नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती होऊन वाहनांच्या धुराड्यांमार्फत वायू प्रदूषण होते. नायट्रोजन डायॉक्साईडसुद्धा सल्फर डायॉक्साईडप्रमाणे श्वसननलिकेत प्रवेश करतो परंतु ह्याची पाण्यात विरण्याची क्षमता कमी असते व तो फुफ्फुसापर्यंत बराचसा पोहोचतो. यामुळे जास्तीत जास्त कफनिर्मिती होऊन सर्दी होते. इतर लक्षणांमध्ये त्वचा कोरडी पडणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार घडतात. वाहतुकीच्या वर्दळीमध्ये नायट्रोजन डायॉक्साईडमुळेच सर्दी वाढण्याचे प्रकार घडतात. दीर्घकालानंतर सातत्याच्या सर्दीमुळे दमा, ताप हे नेहेमीचे आजार बनून जातात.
नायट्रोजन डायॉक्साईड कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असणे गरजेचे आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नायट्रोजन डायॉक्साईडचे पुन्हा ऑक्सिजन व नायट्रोजनमध्ये रूपांतर करतो. यासाठी ज्यात कन्व्हर्टर नाहीत अशा जुन्या गाड्या निकालात काढणे गरजेचे आहे. सध्या शास्त्रज्ञ कमी तापमानावर ज्वलन करून नायट्रोजन डायॉक्साईडचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर काम करत आहेत.
ओझोन शरीरास चांगला असतो हा एक चुकीचा समज आहे. ओझोनमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असतात यातील तिसरा अणू अतिशय आक्रमक असतो व मिळेल त्या गोष्टीचे ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. ओझोनची खरी गरज वातावरणातील वरच्या भागात आहे. तिथला ओझोन सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण करतो. परंतु आपल्या नजीकच्या वातावरणातील ओझोन एक आक्रमक रसायनाचे काम करत असतो. ओझोन श्वसननलिकेत कफामध्ये अजिबात न विरघळता सरळ फुफ्फुसांपर्यंत जाऊन पोहोचतो व फुफ्फुसांतील पेशींवर अतिशय संहारक पद्धतीने हल्ला चढवतो यामुळे जेव्हा हवेत ओझोनचे प्रमाण जास्त असते तेव्हा छातीत कळ येण्यासारखे प्रकार घडतात. ओझोनच्या सततच्या माऱ्यामुळे कालांतराने फुफ्फुसे दुर्बल होऊन दम्यासारखे रोग वाढीस लागतात. याआधी नमूद केलेल्या नायट्रोजन ऑक्साईडची ऑक्सिजनशी रासायनिक क्रिया होऊन ओझोन तयार होतो, तसेच ओझोनचीही नायट्रोजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड बनते. दिवसभर हवेत ओझोन व नायट्रोजन ऑक्साईडचा कमी जास्त होण्याचा खेळ चाललेला असतो.
जर नायट्रोजन ऑक्साईड व व्हीओसींचे प्रमाण कमी राहिले तर ओझोनचे प्रमाण मर्यादित राहण्यास मदत होते. ओझोनमुळे केवळ मानवी शरीरावरच नव्हे तर रबर, प्लॅस्टिक, कपडे यांच्यावरही परिणाम होतो. ओझोनच्या संपर्कात येऊन रबराची लवचिकता कमी होते, कपड्यांचे रंग उडतात, इत्यादी ओझोनचे दुय्यम परिणाम आहेत.
विविध रसायने व रासायनिक उत्पादने यांच्या वापराने या उत्पादनांचे बाष्पीकरण होते व व्हीओसी तयार होतात. यातील काही घटक हे मानवी आरोग्यास सरळपणे घातक असतात तर काही सुरक्षितसुद्धा असतात. बहुतांशी व्हीओसींचे सूर्यप्रकाशात ओझोनमध्ये रूपांतर होऊन जाते व ओझोन अंततः घातक प्रदूषक घटकाचे काम करतो. पेट्रोलपंपावरील गाडी भरताना उडणारे पेट्रोल, घराला रंग देताना थिनर व ऑईलपेंटचा वापर इत्यादी गोष्टी वातावरणातील व्हीओसी वाढवतात.
वातावरणातील व्हीओसी कमी करण्यासाठी उघड्यावरील रसायनांचा वापर टाळणे, इमारतींसाठी व घरांमध्ये पाण्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे.
आरोग्यास अत्यंत घातक असा हा वायू अपूर्ण ज्वलनाने तयार होतो. वीटभट्या, छोटे छोटे तसेच मध्यम व मोठे वीजनिर्मिती संच, वाहनांची इंजिने यांमधून हा बाहेर पडतो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणाऱ्या हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजनऐवजी हा वायू मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. त्यामुळे हा वायु अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. हे अतिटोकाच्या परिस्थितीत होऊ शकते, परंतु कमी संपर्कात किंवा हवेतील कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड असल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, विचारक्षमता अथवा कार्यक्षमता कमी होणे असे प्रकार घडतात.
कमी तापमानावरील (७०० अंश से. किंवा त्यापेक्षा कमी) ज्वलन, तसेच ज्वलनासाठी पुरेशा ऑक्सिजनची कमतरता ही कार्बन मोनॉक्साईड तयार होण्याची कारणे आहेत.
हवेत ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण असतात : श्वसनामार्फत शरीरात जाणारे अतिशय लहान धूलिकण व श्वसनातून शरीरात न जाणारे धूलिकण. १० मायक्रोमीटर (PM10)पेक्षा लहान आकारमानाचे धूलिकण हे श्वसनामार्फत शरीरात जाऊ शकतात. हवेत धूलिकणांचे प्रमाण केवळ रहदारीमुळेच होते असे मानणे चुकीचे आहे. धूलिकण मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मितही असू शकतात. मानव निर्मित धूलिकण हे ज्वलन व तत्सम प्रक्रियांतून निर्माण होतात. तसेच कुठेही चालणारी बांधकामे, विविध प्रकारचे कारखाने, शेतीतील विविध प्रकारची कामे हे मानवनिर्मित धूलिकणांचे स्रोत आहेत. निसर्गही हवेतील धूलिकण कमी अथवा जास्त करण्यात मोठा हातभार लावत असतो. फुलांच्या बहार येणाऱ्या मोसमात काही ठिकाणी हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढते. तसेच कोरड्या प्रांतातून वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ येऊ शकते. आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून येणारी धूळ स्पेन, इटली, ग्रीस, स्वित्झर्लंड, सायप्रस इत्यादी देशांत मोठ्या प्रमाणात येऊन तेथील हवेत धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवते.
अतिसूक्ष्म धूलिकण २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान आकारमानाचे (PM2.5) : हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत साठून राहतात. हे सूक्ष्मकण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असल्यास रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करतात व आरोग्यावर अतिशय घातक परिणाम करतात. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अती-अतीसूक्ष्म (नॅनो आकारात) काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन अतिसूक्ष्म कण बनतात व वातावरणातील प्रदूषण वाढवतात. दोन स्ट्रोक इंजिन असलेल्या वाहनांमुळे, तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे, शहरांमध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. भारतातील शहरांमध्ये प्रामुख्याने अतिसूक्ष्म कणांचा प्रादुर्भाव जास्त आहे.
मुख्य लेख जागतिक तापमानवाढ
वरील प्रदूषक घटकांचे वातावरणातील वाढलेल्या प्रमाणाला बहुतांशी मानव जबाबदार आहे. या घटकांचा प्रभाव मानवी आरोग्यावर पटकन दिसून येतो. मात्र निसर्गातील काही घटक या प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यात सातत्याने मदत करत असतात. वरील सर्व घटकांचा वातावरणात टिकून रहाण्याची क्षमता काही मिनिटांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असते. याचा अर्थ प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना योजल्यास त्याचे परिणाम काही महिन्यातच दिसून येतात. परंतु खालील घटक हे वातावरणात कित्येक वर्षे, दशके, किंबहुना शतके टिकून रहातात व हेच घटक मुख्यत्वे हवामान बदलास जवाबदार आहेत. हवामान बदलामध्ये जागतिक तापमानवाढ ही सर्वात चिंताजनक बाब आहे व इतर बदल हे सयुक्तिकपणे अपेक्षित आहेत.
कार्बन डायॉक्साईडचे वातावरणातील प्रमाण ०.३ टक्के इतके अपेक्षित आहे. निसर्गातील अनेक प्रकियांमध्ये (जीवसृष्टीतील श्वासोछ्वास) कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होत असतो. परंतु निसर्गाने वनस्पतींना प्रकाश संश्लेषणातून कार्बन डायॉक्साईडला पुन्हा कार्बन व ऑक्सिजन वेगळे करण्याची क्षमता प्रदान केली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली व त्याच वेळेस मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीने पृथ्वीवरील वनस्पतींची कार्बन डायॉक्साईडला ऑक्सिजनमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता कमी झाली. परिणामी वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले व वाढत आहे. सध्याचे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.३८५ टक्के इतके आहे.
वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड.हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो..
केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात. सल्फर डायॉक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईडमुळे अम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचे विपरीत परिणाम जमीनीवर व पिकांवर होतो.शेतातील पिक उदा. गहू ज्वारी इतर खराब होतात असे निदर्शनात आले आहे.
वायुप्रदूषण कमी जास्त होण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान, वातावरणातील वरच्या भागातील तापमान इत्यादी प्रदूषण पसरवण्यात किंवा एकवटण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. वाऱ्याचा वेग व दिशा हे त्यांत महत्त्वाचे घटक ठरतात.
उदा० मुंबईमध्ये प्रदूषक घटकांची निर्मिती जास्त असूनही प्रदूषणाची पातळी पुण्यापेक्षा बरीच कमी असते. मुंबईतील प्रदूषण समुद्रावरील वाऱ्यांमुळे बऱ्याच प्रमाणात वाहून जाते तर पुण्याच्या सभोवतालच्या टेकड्यांमुळे वाहून जाण्यात अडथळा येत असल्याने पुण्यात प्रदूषणाची पातळी जास्त असते. तसेच काही ठिकाणी प्रदूषण होत नसतानाही वाऱ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणांहून प्रदूषण वाहून येते व स्रोताची जागा प्रदूषणमुक्त राहून सभोवतालचा परिसर प्रदूषणमय होऊन जातो. उदा: साखर कारखान्यांजवळचा परिसर.
सामन्यतः वातावरणातील वरच्या भागात तापमान कमी असते व जमिनीवर जास्ती. काही वेळेस वातावरणातील वरच्या भागातील तापमान (जमिनीपासून १-३ किमी वर) हे जमिनीवर तापमानापेक्षा जास्त होण्याच्या घटनेस इंग्रजीत इन्व्हर्जन (Inversion)अशी शास्त्रीय संज्ञा आहे. असे झाल्यास प्रदूषके वाहून जाण्यात अडथळा येऊन अचानक प्रदूषण पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. या परिस्थितीत धुके साठणे, कोहरा (हिंदीमध्ये) होणे असे प्रकार होतात. . साधारणपणे उत्तर भारतात हा प्रकार नेहेमी अनुभवावयास मिळतो. हा प्रकार कित्येक दिवस टिकून रहातो.
अलीकडच्या काळात घरात होणाऱ्या वायुप्रदूषणावर महत्त्वाचे संशोधन चालू आहे. बहुतांशी व्यक्ती दिवसाचा बराच वेळ कार्यालये व कामाची ठिकाणे, घरांत, अथवा प्रवासात घालवतात. यांपैकी घरांत होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम जास्त असतो. गृहांतर्गत प्रदूषणावर प्रबोधन होणे सर्वात जास्त गरजेचे आहे. कारण यावरील उपाय केवळ व्यक्तिगत प्रयत्नातून होऊ शकतात. स्वयंपाक करताना फोडणीमुळे उडणारे विविध पदार्थ खायला चांगले असले तरी श्वसनास हानिकारक असतात. खूप वेळ दारे खिडक्या बंद ठेवल्याने घरात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते व त्यामुळे मेंदूची कार्य क्षमता कमी होते व झोपेचे प्रमाण वाढते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. भिंतींना व फर्निचरला रंग दिल्यानंतर घरातील व्हीओसींचे प्रमाण काही दिवसांसाठी बरेच वाढलेले असते..
गृहांतर्गत प्रदूषण कमी करण्यात घरातील हवा खेळती राहण्याची व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. स्वयंपाकघरात खास करून गृहरचना करताना यास महत्त्व दिले गेले पाहिजे. ग्रामीण भागात नवीन रचनेच्या चुली वापरल्या गेल्या पाहिजेत.
कारखान्यात होणाऱ्या वेल्डिंग सारख्या प्रक्रियेत निर्माण होणारा धूर, धूल इ. प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येते.
भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शास्त्रीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील १० मायक्रोमीटर पेक्षा लहान कणांत २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण ७० टक्यांपेक्षाही जास्त आहे. हे प्रमाण दोन तीन दशकांपूर्वी ५ टक्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असून दिल्ली, कानपूर, पुणे, बंगलोर ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी ५० पीपीएम इतकी आहे. परंतु वर नमूद केलेल्या शहरात जवळपास वर्षातील सर्वच ३६५ दिवस ही मर्यादा ५० पीपीएम पेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. नायट्रोजन ऑक्साईड, व्ही.ओ.सी. व ओझोनवर भारतातील शहरातून फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर यांचे प्रमाण वाढणे अपरिहार्य आहे. यावरून भारतातील नागरिक अत्यंत घातक हवा श्वसन करत आहेत हे लक्षात येते. याचा परिणाम एकूणच सामाजिक आरोग्यावर होत आहे. डॉक्टरांकडे येत असलेली सर्दी, ताप, पडसे, दमा इत्यादी तक्रारींकरितार वाढलेली गर्दी हे याचे प्रतीक आहे. हे रोग अतिघातक नसले तरी सातत्याच्या प्रादुर्भावाने माणसाची शारीरिक व मानसिक क्षमता कमी करण्यात हातभार लावतात.
वायू प्रदूषणात प्रदूषके केंद्रीय उत्सर्जन पद्धतीने (Point sources) एकाच जागी तयार होतात अथवा सार्वत्रिक उत्सर्जन पद्धतीने(Diffused sources) सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात तयार होतात. केंद्रीय उत्सर्जन होण्याचे उदाहरण म्हणजे औद्योगिक ठिकाणे, वीजनिर्मिती कारखाने, तर सार्वत्रिक उत्सर्जनाचे उदाहरण म्हणजे वाहतूक व्यवस्था धरता येईल. जर प्रदूषण एकाच जागी होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे असते, परंतु सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात होणाऱ्या सार्वत्रिक उत्सर्जन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे खूपच अवघड आहे. विविध प्रकारचे कडक नियम व कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणाऱ्या प्रदूषणावर विकसित देशात बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. परंतु भारत व इतर विकसनशील देशात अजूनही म्हणावे इतके यश मिळालेले नाही. कायद्याच्याकडक अंमलबजावणीमधील त्रुटी, तंत्रज्ञान वापरण्याबद्दल असलेली आर्थिक उदासीनता (तंत्रज्ञान महाग पडते म्हणून न वापरणे) व माहितीचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. सार्वत्रिक उत्सर्जनाच्या प्रदूषणावर तंत्रज्ञानातील सुधारणा व ऊर्जेचा कमी वापर यातूनच सुधारणा करता येते. सध्याच्या विकसनशील देशांची वाढती अर्थव्यवस्था व ऊर्जेचा वाढता वापर तसेच विकसित देशातील दरडोई असलेला मोठ्या प्रमाणावरील वापर यामुळे ऊर्जेचा वापर कमी होणे सध्यातरी अशक्य दिसत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानातील सुधारणा किंवा प्रदूषणरहित नवीन व स्वस्त ऊर्जास्रोताचा शोध यावर अवलंबून राहणे आवश्यक आहे.
वाहनांमध्ये तंत्रज्ञान सुधारण्यास मोठा वाव आहे. विविध प्रकारचे कॅटॅलिटिक कन्व्हहर्टर, फिल्टर यांच्या वापराने वाहनातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते. वाहन रचनेत सध्या होणाऱ्या आमूलाग्र बदलांमुळे, वाहनातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून येईल. परंतु कोणत्या प्रकारच्या ऊर्जास्रोताने जागतिक तापमान वाढ रोखता येईल, यावर अजूनतरी समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. आपण कमी वीज वापरून किंवा कमीत कमी उर्जेचा वापर करून सुधारणा करता येईल.
This article uses material from the Wikipedia मराठी article वायू प्रदूषण, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.