राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स.
१८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.
राम गणेश गडकरी | |
---|---|
जन्म नाव | राम गणेश गडकरी |
टोपणनाव | गोविंदाग्रज , बाळकराम, सवाई नाटकी |
जन्म | २६ मे १८८५ गणदेवी, जि. नवसारी , गुजरात |
मृत्यू | २३ जानेवारी १९१९ सावनेर ,जि. नागपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | नाटककार, कवी, लेखक |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, नाटके, विनोदी कथा |
विषय | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती | नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव भावबंधन |
वडील | गणेश वासुदेव गडकरी |
आई | सरस्वतीबाई गणेश गडकरी |
पत्नी | प्रथम पत्नी - सीताबाई गडकरी द्वितीय पत्नी - रमाबाई गडकरी |
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.
विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.
नागपूरला राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.
गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. रां ग गडकरी देखील अल्प आयुष्य लाभलेले ३४ वर्ष आयुष्य मिळाले. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.
महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या 'रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.
वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती राजहंस माझा निजला'ह्या कवितेत गडकऱ्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.
गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
याशिवाय, गडकरीणी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्यः-
भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :-
भांबूराव : आंबेमोहर काय भाव?
दाणेवाला : असडी सत्तविसाने दिला.
भांबूराव : बोला; एकच गोष्ट
दाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला.
भांबूराव : जातो.
दाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या.
भांबूराव : साडे पंच्विस द्या.
दाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा?)
भांबूराव : पल्ला.
दाणेवाला : चला माप घ्या.
हाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :-
आंबे॒मो | हर का | य भाव | असडी
सत्तावि |साने | दिला
बोला; | एकच गोष्ट |
हा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.|
जातो |
माल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या |
साडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा? |
पल्ला. || चला माप घ्या. ||
(अपूर्ण)
राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-
राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी उद्यानात उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तथाकथित गलिच्छ लिखाण केले असल्याचा निखालस खोटा आरोप ठेवून त्यांचा पुतळा ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी उचकटला व मुठा नदीत बुडवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केली.
या गुन्ह्यासाठी संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांना अटक झाली. त्यांनी सांगितल्या जागी नदीच्या पात्रातून पुतळा आणि पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हातोडी आणि अन्य अवजारे बाहेर काढण्यात आली.
काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी सन १९९८ मध्ये सावनेर तालुक्यात हेटीसुरला येथे राम गणेश गडकरी साखर कारखाना काढला.तो काही वर्षे चालला. पुढे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे त्यावरील कर्ज वाढत गेले. सन २००५मध्ये कर्जाची रक्कम ७१.४६ कोटी रुपयांवर पोहोचली. ६० दिवसांची जप्तीची नोटीस बजावायची आणि कारखान्याची संपत्ती विक्रीस काढायची, अशी कर्जवसुलीची पद्धत रूढ झाली होती. कारखाना विक्रीस काढण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन केले जाते. सावनेर तालुक्यातील या कारखान्याच्या ११०.८० एकर जमिनीचे मूल्यांकन के.आर.व्ही. चारी आणि व्ही.आर. देशकर यांनी २६ कोटी ३१ लाख रुपये इतके ठरवले. त्यात कारखान्याची यंत्रसामग्री, जमिनीची किंमत आणि इमारत अशा सगळ्यांचा समावेश होता. ही किमान रक्कम आल्याशिवाय कारखाना विक्री करू नये, असा नियम असला तरी या कारखान्याची केवळ १३ कोटी ३६ लाखांत विक्री करण्यात आली.
हा राम गणेश सहकारी साखर कारखाना सात वर्षे बंद होता. कसेबसे तीन उसाच्या हंगामांचे गाळप झाले होते. कारखाना बंद पडल्यावर तेथील यंत्र सामग्रीची चोरी झाली. कारखाना विकल्यावर तेथील यंत्रे राहुरीमध्ये आणून तो कारखाना सुरू करण्यात आला.
राम गणेश गडकरी यांच्या कारकिर्दीवर श्रीराम रानडे यांनी लिहिलेला आणि विजय गोविंद यांनी सादरीकरण केलेला हा श्राव्य कार्यक्रम आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article राम गणेश गडकरी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.