भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण- समारंभ साजरे केले जातात.
त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. व एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात.
मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते 15 जानेवारीला येते, अन्यथा 14 जानेवारीला असते.
मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत्तर प्रदेश (खिचडी संक्रांती देखील म्हणतात), उत्तराखंड (ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात) किंवा सोप्या भाषेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती, माघे संक्रांती (नेपाळ), सोंगक्रान (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान (कंबोडिया), आणि शिशूर सेनक्राथ (काश्मीर).
मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे. हा सण रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते मघा मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात - जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे 60 ते 100 दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात, ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते.
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०
इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)
इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)
इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)
इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
१६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)
१७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)
१८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)
१९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)
२० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)
२१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)
२२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)
२३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही.
संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १४ जाने), संक्रांत (सामान्यतः १५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १६ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.
लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी कलकत्ता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात.
दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।
(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी.
मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे घालेले दिनमान जाणून लागते. पूर्वी इलेक्ट्रिीसिटी नव्हती. त्या वेळी माणसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार! म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. 'फरगीविह ॲन्ड फरगेट' हा संदेश या सणाद्वारे दिला जातो. जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो.
महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे.
बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्राना देतात. तसंच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक गंगास्नान करतात. दक्षिणेतही ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिरुवनवेल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात.
हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्याना खाऊ घालतात.
दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून साजरा करतात. या दिवशी अंगणात दुधातही तांदुळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी आली, की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे.
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो.
पहा : कर्कसंक्रांती
This article uses material from the Wikipedia मराठी article मकरसंक्रांत, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.