प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे.
दिनांक | नोव्हेंबर १० १६५९ |
---|---|
स्थान | प्रतापगड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र, भारत |
परिणती | मराठ्यांचा दणदणीत विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
मराठा साम्राज्य | आदिलशाही |
सेनापती | |
शिवाजी महाराज | अफझलखान |
सैन्यबळ | |
६००० घोडद्ळ, ३००० पायदळ, ४००० राखीव पायद्ळ | १२००० घोडदळ ११५०० पायदळ व बंदूकधारी ८५ हत्ती, १००० उंट ८०-९० तोफा |
बळी आणि नुकसान | |
१७३४ ठार ४२० जखमी | ५००० ठार ५००० जखमी ३००० युद्धबंदी सर्व हत्ती,उंट, तोफा मराठ्यांच्या हाती |
ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपानेआलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग आदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधू संभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. शिवाजींनी खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.
अफजलखानाच्य सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या. अफजलखानाने जंजिऱ्याच्या सिद्दीशी हातमि़ळ्वणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले.
छत्रपति शिवाजी महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलावणे धाडले, पण शिवाजी महाराजांनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्याबाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर १० इ.स. १६५९ रोजी ठरली.
भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजीने जाणूनबूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजी महाराजांनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्याखाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजी महाराजास अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांनवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजी महाराजांचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणाऱ्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजी महारखजांनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजी महाराजांनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.
मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने आपल्या पायदळ कडून बंदूकधाऱ्यांवर आक्रमण केले. स्वतः बाजी सर्जेराव अन् जावळीच्या खोऱ्यातील पिलाजी गोळे यांनी अफजल सैन्याला सळो की पळो केले, दुसऱ्या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्य सैन्याची वाताहत झाली. नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली.
आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले. छत्रपति शिवाजी महाराजांनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले.
पुढील १५ दिवसात छत्रपति शिवाजी महाराजांनी सातारा, कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्ल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांचा भारतभर लष्करी दरारा वाढला.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रत्येक चित्रपटात ही लढाई खासकरून महाराजांचे अफजलखानाबरोबरचे द्वंद्व दाखवतातच. लेखक रणजित देसाई यांची लक्ष्यवेध ही या लढाईवर आधारित कादंबरी आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article प्रतापगडाची लढाई, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.