महाकवी कालिदास हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून व्यापकपणे ओळखले जाते.
त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत .  कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. त्यांना भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाते.
संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात.
सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृत भाषेचेचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीविषयी उत्सुकता असते. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांच्या 'मेघदूता’मुळे त्यांची आषाढाच्या पहिल्या दिवशी आठवण होतेच होते.
कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे. त्यांच्या ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम्, मेघदूत या काव्य रचना, तसेच मलाविकाग्नीिमित्र, विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील नाटक-वजा-महाकाव्य रचनांमुळे त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली. तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्वात अजरामर झाली. त्यामधील कुमारसंभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये, तर मेघदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत. या काव्यात उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकारांची रेलचेल आहे.
ऋतुसंहार हे काव्य त्यांच्या इतर साहित्यकृतीच्या तुलनेने फार लहान आहे. त्या त्यांच्या दीर्घ निसर्गकाव्याचे सहा भाग आहेत. रायडर(??) हे ऋतुसंहारला सवअमे बंसमदकंत(??) म्हणतात. निसर्गसौंदर्यामुळे तरुण मनाला भुरळ पडते. जो तरुण प्रेमाचे स्वप्न बघतो त्याला या जादुभऱ्या ऋतुचक्राच्या प्रेमात पडल्याशिवाय राहता येत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आहे.
कुमारसंभवम् हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी ‘शिवाला’ वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. काव्यात शिव आणि उमा-पार्वती यांच्या प्रेमाचे परिणामकारक तसेच सुदंर शृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते.
रघुवंशम् ही कालिदासांच्या महान काव्यांमधील एक महान रचना आहे. या काव्याचे १९ विभाद आहेत. काव्यात रघु, अजा, दशरथ, राम, आणि सीता यांच्या आदर्शवादाचे वर्णन आहे. ही रचना मानविमता(??) व सत्यता याच्या जवळची आहे. या काव्याच्या सुरुवातीलाच कालिदास रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकीचे आभार मानतात.
मेघदूतम् हे महाकाव्य इतर महाकाव्यांच्या तुलनेत फारच लहान काव्य आहे. मेघदूतम हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासांनी अशी रचली आहे, की रामगिरीतील शापित यक्षाची पत्नी अलका ही विरहाने व्याकुळ झालेली आहे. तेव्हा हा यक्ष पत्नीला आषाढातील मेघालाच पत्नीला प्रेम संदेश पाठविण्यासाठी दूत बनवितो. या काव्यात शंभरच्यावर कडवी आहेत. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणाऱ्या मानवाची ही कथा मेघदूतममध्ये विस्तारितरीत्या अधोरेखित केली आहे.
मेघदूत हे काव्य मंदाक्रांता वृत्त वापरून लिहिले गेले आहे. ते गेय म्हणजे गाता येण्यासारखे आहे. मेघदूताच्या पहिल्या भागात भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे. तर दुसरा भाग आशा, भीती, विरह आणि इच्छापूर्ती या विषयांवर आहे. यामध्ये माणूस प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही हे दाखविले आहे. ही रचना काव्यप्रेमींच्या नजरेतून सुटू शकत नाही. सिंहली भाषांतही मेघदूताचे अनुवाद झालेले आहेत. काव्यावर ५० टीकाग्रंथ आहेत. मराठी भाषेत या काव्याचे सुमारे २८ अनुवाद झाले असून या अनुवादकांमध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर, चिं.द्वा. देशमुख, रा.ची. श्रीखंडे, ना.ग. गोरे, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट व शांता शेळके यांचाही समावेश आहे.
मालविकाग्निमित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक आहे. एखाद्या नामवंत नाटककारांपेक्षा कालिदास हे काही कमी नव्हते. त्याचबरोबर ते महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे ठरवणे मालविकाग्निमित्रम् वाचल्यावर फारच कठीण आहे असे वाटते. एवढे निश्चित आहे की कालिदास हे ते संस्कृतमधील महान कवी होते. आनंदी कवी आणि प्रतिभावंत नाटककार, रचनाकार हे गुण क्वचितच एका ठिकाणी दिसतात.
कालिदास हे राजकवी असल्यामुळे त्यांनी राजेशाही, राजदरबारी घरातील प्रेमाचे नाटकीय सादरीकरण मोठ्या गमतीदारपणे या रचनाकृतीत सादर केलेले आहे.या नाटकातून प्रणय, स्पर्धा, राग, अनुनय, वंचना, फजिती अशा अनेक भावनांचे चित्रण आलेले आहे. प्रेमात प्रावीण्य असलेल्या अग्निमित्र राजावर ही नाट्यकृती आधारित आहे. कालिदासा रचना पाहता पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रेम वात्सल्य यांचे अतूट नाते आहे, असे वाटू लागते...
कालिदासाच्या आयुष्याबद्दल जास्त काही माहीत नाही, फक्त त्याची काव्ये आणि नाटकांमधूनच काय ते अनुमान काढले जाऊ शकते. त्यांचे साहित्य कधी लिहिले गेले हे अचूकपणे सांगितले जाऊ शकत नाही, परंतु बहुधा ते चौथ्या किंवा पाचव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले.
अभ्यासकांचा असा होरा आहे की कालिदासाचे वास्तव्य हिमालयाच्या परिसरात असावे कारण त्यांच्या साहित्यात उज्जैन, आणि कलिंग यांचे वर्णन आहे. कुमारसंभव या नाटकामध्ये त्यांनी हिमालयाचे तपशीलवार वर्णन केले आहे. तसेच त्यांच्या मेघदूत या नाटकामध्ये त्यांचे उज्जैनवरील प्रेम प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या रघुवंश या नाटकामध्ये कलिंग साम्राज्याचे वर्णन आढळते.
संस्कृत अभ्यासक आणि काश्मिरी पंडित लक्ष्मी धर कल्ला (१८९१-१९५३) यांनी 'कालिदासाचे जन्मस्थान' नावाचे पुस्तक सन १९२६ साली लिहिले. त्या पुस्तकात कालिदासाच्या जन्मस्थळाबद्दलचे लेखकाचे संशोधन आहे. कालिदासाचा जन्म काश्मीरमध्ये झाला असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला, परंतु तो दक्षिणेकडे सरकला आणि समृद्ध होण्यासाठी त्याने स्थानिक राज्यकर्त्यांची पाठराखण केली. कालिदासाच्या लेखनातून त्यांनी नमूद केलेल्या पुराव्यांमधे हे समाविष्ट आहे, असे लेखकाने नमूद केले आहे. या पुस्तकानुसार,
तर काहीजण उत्तराखंडातील गढवाल हे कालिदासाचे जन्मस्थान असल्याचे सांगतात.
लोककथेेनुसार, विद्योत्तमा नावाचा एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह कालिदासाशी लावून दिला जातो. जेव्हा तिला हे कळते तेव्हा ती कालिदासाचा अपमान करते. ती म्हणते, 'अस्ति कश्चित् वाग्विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषतः आहे?' त्यानंतर कालिदासाने खूप अभ्यास करून आपल्यावरचा मूर्ख हा शिक्का काढून टाकला, आणि अस्ति, कश्चित् आणि वाग् या शब्दांनी सुरू होणारी तीन काव्ये रचली. ती काव्ये अशी : अस्त्युत्तरस्याम् दिशि देवातात्मा हिमालयो नाम नगाधिराज:। (कुमारसंभवची सुरुवात); कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत:। (मेघदूताची सुरुवात) आणि वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिप्रत्तये । जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥(रघुवंशाची सुरुवात).
This article uses material from the Wikipedia मराठी article कालिदास, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.