पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील राहाता तालुकात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा नगर जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नाशिक |
मुख्यालय | पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर |
तालुके | १. अकोले २. कर्जत ३. कोपरगाव ४. जामखेड ५. नगर ६. नेवासा ७. पाथर्डी ८. पारनेर ९. राहाता १०. राहुरी ११. शेवगांव १२. श्रीगोंदा १३. श्रीरामपूर १४. संगमनेर |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १७,४१३ चौरस किमी (६,७२३ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ४५,४३,०८० (२०११) |
-लोकसंख्या घनता | २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | १७.६७% |
-साक्षरता दर | ८०.२२% |
-लिंग गुणोत्तर | ९३९ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | सिद्धाराम सलिमाठ |
-लोकसभा मतदारसंघ | १.अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ) २.शिर्डी |
-खासदार | १.सुजय विखे पाटील. २. सदाशिव लोखंडे |
प्रमुख_शहरे | पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, , श्रीरामपूर , शिर्डी, संगमनेर श्रीगोंदा |
संकेतस्थळ |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा महाराष्ट्रराज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी२ असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व छत्रपती संभाजी नगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व धाराशिव आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. अहिल्यादेवी नगर जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे.भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून अहिल्यादेवीनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्वरसागर असे म्हटले जाते. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्रगड यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत.कळसूबाई,जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे,१६४६ मीटर याच भागात आहे.
पारनेर तालुका आणि नगर तालुका आणि संगमनेर तालुक्याचा, श्रीगोंदा तालुक्याचा व कर्जत तालुक्यांचा काही भर यात मोडतो.
यात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव तालुक्याचा उत्तरेकडील प्रभाग येतो.या भागात गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा आणि सीना नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा घोड, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील संंगमनेर तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. अहिल्यादेवीनगर मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहिल्यादेवीनगर - पुणे या मार्गावर. अहिल्यादेवी नगर रेल्वे स्थानक हे दौंड - मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहिल्यादेवीनगर - बीड - परळी आणि पुणतांबा- शिर्डी हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. संंगमनेरहून भंडारदरा धरणाकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहिल्यादेवी नगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहिल्यादेवी नगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०), आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले.
तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले होते. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर (आताच्या अहिल्यादेवीनगर) जिल्ह्याची स्थापना केली.
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
हा मतदारसंघ अहिल्यादेवीनगर शहर विधानसभा मतदारसंघ, कर्जत-जामखेड,पारनेर,राहुरी,शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
हा इ.स. २००९पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले भंडारदरा धरण, राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील मुळा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा कर्जत उपविभाग) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहिल्यादेवीनगर येथे स्थापण्यात आले आहे.
अहिल्यादेवीनगर शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे,तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत छत्रपती शाहू महाराज यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी अहिल्यादेवीनगर शहरात वास्तव्य केलेले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव पारनेर तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे.
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढ्वली होती.
जायकवाडी धरण हे अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.