गर्भपात ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची क्रिया आहे.
गर्भपात तांत्रिक गुंतागुंतींमुळे नैसर्गिकपणे देखिल घडू शकतो परंतु बव्हंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन सहा महिने (२४ आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला 'गर्भपात' म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते. म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.)
सूचना |
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा. |
वैद्यकीय चिकित्सा वापरून व वैधपणे केला गेला तर गर्भपात ही वैद्यकशास्त्रातील सर्वात सुरक्षित क्रिया आहे. परंतु जगातील अनेक भागांमध्ये विविध कारणांस्तव असुरक्षित गर्भपात केले जातात ज्यांमध्ये दरवर्षी अंदाजे ६८,००० स्त्रिया मृत्यूमुखी पडतात. ह्यांपैकी ९७ टक्के स्त्रिया विकसनशील वा अविकसित देशांमधील आहेत.
गर्भपात हा अनेक समाजांमध्ये मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. पारंपारिक विचारांचे लोक गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात तर उदारमतवादी लोकांच्या मते गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असावी. जगात अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे परंतु तो व्यावसायिक डॉक्टरकडूनच घडवून घेणे बंधनकारक आहे.
भारतामध्ये गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते. तसेच मूल होऊ नये म्हणून एखादे जोडपे कुटुंब नियोजनाच्या पद्धती वापरतात. परंतु त्या पद्धती अपयशी झाल्याने गर्भधारणा राहते. एखादी विधवा किंवा कुमारिका अतिप्रसंगाने गर्भवती होते. अशावेळी अशिक्षित किंवा वैदूकडून गर्भपात करवून घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या जीवास धोका होऊन बरेचदा स्त्रिया प्राणास मुकत असतात. पूर्वी भारतात गर्भपातास कायद्याने मान्यता नव्हती. त्यामुळे हजारो माता गर्भपातामुळे मुत्युमुखी पडत. यावर उपाय म्हणून वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ केला गेला व तो १ एप्रिल, इ.स. १९७२ रोजी लागू झाला.
वैद्यकीय गर्भपात कायदा इ.स. १९७१ अंतर्गत पुढील प्रकरणी वैद्यकीय गर्भपाताची मुभा आहे.
वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ मधील कालापव्यय करणाऱ्या पद्धती काढून टाकून ही सेवा अधिक तत्परेतेने उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात नियम १९७५ साली बनवण्यात आले.
२००३ साली या कायद्यात अधिक सुधारणा करून वैद्यकीय गर्भपात नियम २००३ तयार करण्यात आले. यात वैद्यकीय गर्भपात केंद्रांना मंजुरी देण्याचे काम राज्य पातळीऐवजी जिल्हा पातळीवर आणण्यात आले. सुरक्षित वैद्यकीय गर्भपात सेवांचे जाळे वाढवण्याचा उद्देश यामागे होता.
भारतामधील गर्भपाताचे आकडे | |
वर्ष | नोंदणी झालेले गर्भपात |
---|---|
१९७२ | २४,३०० |
१९७५ | २,१४,१९७ |
१९८० | ३,८८,४०५ |
१९८५ | ५,८३,७०४ |
१९९० | ५,८१,२१५ |
१९९५ | ५,७०,९१४ |
२००० | ७,२३,१४२ |
This article uses material from the Wikipedia मराठी article गर्भपात, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.